Sangli News : जिल्हा प्रशासनाने ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी साखर कारखाना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेत आणि पदाधिकारी यांच्यात बैठक घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बैठकीबाबत प्रशासन आणि साखर कारखानदारांकडून कसल्याही हालचाली झाल्या नाहीत.
त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून रविवारी (ता. १०) दत्त इंडिया म्हणजेच वसंतदादा पाटील साखर कारखान्यावर आंदोलन करत वजन काटा बंद पाडणार आहेत.जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला.
बुधवार (ता. ६) ते शुक्रवार (ता. ८) या तीन दिवसांत जिल्ह्यातील साखर कारखान्याचे अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे नियोजन केले होते.
त्यानुसार शुक्रवार (ता. ८) पर्यंत बैठकीचे नियोजन झाले नव्हते. परंतु शनिवारी (ता. ९) बैठक होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शनिवारीही बैठकीबाबत प्रशासन, कारखानदारांकडून कसल्याही हालचाली झाल्या नाहीत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीची वाट न पाहता कोल्हापूरप्रमाणे दर जाहीर करावा, अशी मागणीही केली आहे. अन्यथा कोणत्याही क्षणी वजन काटा बंद आंदोलन करू असा इशारा दिला आहे. ‘स्वाभिमानी’ने यापूर्वी दत्त इंडिया प्रशासनाला निवेदन दिले आहे.
दत्त इंडियाने मागील वर्षी गाळप झालेल्या उसाचे शंभर रुपये द्यावेत, अशी मागणी आहे. परंतु अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. राजारामबापू कारखान्याचे नाव पुढे करून दत्त इंडिया दुटप्पी भूमिका घेत आहे. त्यामुळे रविवारी (ता. १०) दत्त इंडिया कारखान्याचा वजन काटा बंद पाडणार आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.