राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी निर्णयाचा सपाटा लावण्यात आला आहे. राज्य सरकारने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली आहे. राज्यातील ६ हजार ९५९ गावांची या प्रकल्पात निवड करण्यात आली आहे. तसेच प्रकल्पाच्या टप्पा १ मधील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांना प्रकल्प टप्पा दोनमध्ये समाविष्ट करण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकार नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यासंदर्भात सोमवारी (ता.१४) मान्यता दिली आहे.
या योजनेतून राज्यातील २१ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव आणि नाशिक या १६ जिल्ह्यासह नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर आणि गडचिरोली अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी जागतिक बँकेने ६ हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य केलं आहे. त्यानुसार राज्य सरकारने दुसऱ्या टप्प्यास मान्यता दिली आहे.
या योजनेतून शेतकऱ्यांना विविध लाभ देण्यात येतात. प्रकल्पाच्या टप्पा २ साठी शेतविषयक नवीन संशोधनाचा उन्नत शेतीसाठी उपयोग करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर वाढवणे, शेतीतील कर्ब उत्सर्जन कमी करणे, शेतीमध्ये कर्बग्रहण करून कार्बन क्रेडिट शेतकऱ्यांना देणे, हवामान आधारित शेती पद्धतीचा स्वीकार करणे आणि पौष्टिक तृणधान्य उत्पादनावर भर देणे या बाबीचा टप्पा दोनमध्ये समावेश करण्यात येणार आहे. तसेच नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा २ साठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या समितिकडे प्रकल्प अहवाल, अंमलबजावणी, आराखडा, कार्यप्रणाली पुस्तिका, मंत्रिमंडळाची मान्यता घेणे, इत्यादि जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती गावांचा समावेश?
जिल्हा - गाव संख्या
अकोला- १४९
अमरावती- ४५४
बीड - ३०१
भंडारा - २९१
बुलढाणा - ३१०
चंद्रपुर - ५६१
छत्रपती संभाजीनगर- २९६
धाराशिव - १३८
गडचिरोली - ५३२
गोंदिया- २९३
हिंगोली - १४८
जळगाव - ३१९
जालना - १७७
लातूर- २१६
नागपूर - ५६३
नांदेड - ३७५
नाशिक - ५३२
परभणी - १७३
वर्धा - ३८३
वाशिम - १८९
यवतमाळ - ५५९
एकूण - ६ हजार ९५९
दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात जून २०१८ मध्ये राज्यातील पंधरा जिल्ह्यांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प लागू करण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना ठिबक, बीजोत्पादन, सूक्ष्मसिंचन, फलोत्पादन, शेडनेट, पॉलिहाउस, नर्सरी, गोदाम अशा विविध योजनांचा लाभ देण्यात येतो.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.