APMC Market Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Market Income : बाजार समित्यांचे सेस उत्पन्न ५० टक्क्यांनी होणार कमी

गणेश कोरे

Pune News : राज्यातील बाजार समित्यांचा डोलारा बाजार शुल्कावर उभारला आहे. त्याच बाजार शुल्काची आकारणी ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे बाजार समित्यांचे उत्पन्न ५० टक्क्यांनी घटणार असल्याने, समित्यांचे व्यवस्थापन कोलमडणार आहे. तर शेतकऱ्यांच्या हक्काच्या बाजार समित्या बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. व्यापाऱ्यांच्या दबावाखाली त्यांच्याच तिजोऱ्या भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप बाजार समित्यांनी केला आहे. या निर्णयामुळे सरकार आणि बाजार समित्यांतील संघर्ष वाढणार आहे.

राज्यात शेतीमाल खरेदी-विक्रीसाठी ३०६ बाजार समित्या आणि ९०० पेक्षा अधिक उपबाजार कार्यरत आहेत. बाजार समित्यांमध्ये होणाऱ्या शेतीमालाच्या खरेदी-विक्रीवरील व्यवहारात प्रति शेकडा ७५ पैसे ते १ रुपया बाजार शुल्क आकारण्यात येते. या शुल्कामधून बाजार समित्यांचे व्यवस्थापन केले जाते. यामध्ये कर्मचारी वेतन, पायाभूत सुविधांचा समावेश आहे. याद्वारे राज्यातील ३०६ बाजार समित्यांमधून दर वर्षी बाजार शुल्क वसुलीतून सुमारे ५७२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. हे उत्पन्न आता ५० टक्क्यांनी म्हणजेच सुमारे २५० कोटी रुपयांनी घटणार असून, बाजार समित्यांची विकासकामे, दैनंदिन व्यवस्थापन, आणि पायाभूत सुविधा देण्यावर विपरीत परिणाम होणार आहे.

पुणे बाजार समितीचे सेसद्वारे मिळणारे वार्षिक उत्पन्न हे ६९ कोटी रुपये असून, ते आता ३५ कोटी रुपयांवर येणार आहे. तर, मुंबई बाजार समितीचे उत्पन्न सुमारे १०० कोटींवरून ५० कोटींवर येणार आहे. अशी परिस्थिती राज्यातील बहुतांश बाजार समित्यांची असून, तोट्यातील बाजार समित्या बंद करण्याची वेळ येणार आहे. सेस कमी करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांच्या दबावाखाली घेतल्याचा आरोप बाजार समित्यांनी केला आहे.

सरकार एकीकडे बाजार समित्यांचे उत्पन्न वाढीसाठी विविध योजना आणत असताना, दुसरीकडे बाजार समित्यांचे हक्काचे उत्पन्न कमी करण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय बाजार समित्यांना कुलूप लावण्याचा आणि शेतकरी विरोधी निर्णय आहे. या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. याबाबत आजच सोमवारी (ता.१४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून निर्णयाबाबतचे धोके सांगितले आहे. शासनाने या निर्णयाला स्थगिती दिली नाही तर राज्यव्यापी परिषद बोलावून, बाजार समित्या बंदचे आंदोलन करणार आहोत.
बाळासाहेब नहाटा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ
बाजार समित्यांच्या सेसबाबत शेतकरी संघटनांची कधीही कोणतीही मागणी नसताना, केवळ व्यापाऱ्यांच्या हिताचा आणि बाजार समित्या बंद पाडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बाजार समित्यांमध्ये आधारभूत किमतीच्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. शेतीमालाच्या वजनात काटामारी होती. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होती. पणन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. यावर सरकार मूग गिळून बसले आहे. आणि व्यापाऱ्यांच्या तिजोऱ्या भरण्याचे निर्णय घेत आहे. याचा फटका सरकारला बसल्याशिवाय राहणार नाही.
रघुनाथदादा पाटील, शेतकरी संघटना नेते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Soybean Market : सोयाबीनच्या ‘शेतीमाल तारण’ला ओलाव्याची अडचण

Crop loan Distribution : रब्बीसाठी पीक कर्जवितरण आढावा बैठकच नाही

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन नरमले; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर?

Flood Damage Compensation : २०२० चा पीक विमा बीड जिल्ह्याला मिळालाच नाही; खंडपीठाचे राज्य शासनासह बीडचे जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT