Akola News : या आठवड्यात अकोल्याचे तापमान सातत्याने ४० अंशांवर राहत असल्याने कमालीचे चटके सहन करावे लागत आहेत. मागील दोन दिवसांत हे तापमान ४४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्याने दुपारच्या काळात रस्त्यांवर शुकशुकाट राहत आहे. दुसरीकडे या वाढलेल्या तापमानाचा पिकांना जोरदार फटका बसत असून पाण्याची गरज वाढली आहे.
अकोला राज्यात सर्वाधिक तापणारा जिल्हा म्हणून परिचित आहे. यावर्षी तापमानाने उच्चांकी ठिकाण गाठले आहे. दोन दिवसांपूर्वी अकोल्याचे तापमान ४४.५ अंश सेल्सिअस नोंद झाले होते. त्यानंतरही ४४ अंश तापमान टिकून आहे.
सकाळपासून गरम वातावरण राहत असून रात्री उशिरापर्यंत उष्णतेच्या झळा जाणवत राहतात. वाढलेल्या तापमानामुळे अकोल्यात दुपारच्या काळात रस्त्यांवरील वाहने, नागरिकांची गर्दी कमी होत आहे. थंड पदार्थ, पेयांची मागणी वाढली आहे.
पिकांनाही झळा
तापमानाच्या झळा पशु, पिकांनाही बसत आहेत. सध्या पिकांना पाण्याची गरज वाढली आहे. विहिरींची पातळी खालावली असून ज्या प्रकल्पात साठा आहे त्याचेही बाष्पीभवन वेगाने होत आहे. या आठवड्यात बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे. या जिल्ह्यात कलिंगड, खरबूज या वेलवर्गीय पिकांची मोठ्या क्षेत्रावर लागवड असून पिकाला दररोज पाणी द्यावे लागत आहे.
आठवड्यात तीन दिवस रात्रीला वीजपुरवठा असल्याने शेतकऱ्यांना जागरण करीत पीक वाचवण्याची कसरत करावी लागते आहे. केळी बागांनाही उष्ण लाटांची झळ बसत आहे. केळीची पाने वाळत आहेत. या शिवाय इतर फळबागांनाही याची झळ बसू लागली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.