Pomegranate Farming
Pomegranate Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Farming : डाळिंबातून फुलले दुष्काळी गावाचे अर्थकारण

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यातील जत तालुका म्हटले की दुष्काळ (Drought) आणि त्यावर मात करण्याची जिद्द ठेवलेले शेतकरी (Farmer) असं समीकरण आहे. अत्यंत कमी पाऊस, अपुरे पाणी, खडकाळ- डोंगराळ जमीन अशी या भागाची ओळख आहे. तालुक्याच्या पूर्व भागात आणि सोलापूर जिल्ह्याच्या अगदी जवळ जाडर बोबलाद गाव आहे. पुरेसे पाणी नाही.

त्यामुळे शेती काय ती कोरडवाहूच. परिणामी ग्रामस्थांना पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणीसाठी जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर जायची वेळ यायची. अन्य शेतकऱ्यांकडे द्राक्ष आणि डाळिंब पिकात ते मजुरी करायचे.

खरीप हंगामात बाजरी आणि रब्बीत ज्वारी ही दोनच प्रमुख पिके गावात घेतली जायची. त्यावर कुटुंबाचा प्रपंच चालायचा. एवढी सगळी प्रतिकूलता असली, तरी गावातील शेतकरी हताश झाले नाहीत. खडकावर शेतीत नंदनवन फुलवण्याची येथील शेतकऱ्यांची इच्छाशक्ती अफाट आहे.

...आणि डाळिंबाच्या बागा फुलल्या

वर्ष होते १९९७. मासेळी (ता. मंगळवेढा) येथील कै. भीमराव मुचंडी यांनी भागात डाळिंब शेती सुरू केली. परिसरातील शेतकऱ्यांसाठी हे पीक काही प्रमाणात नवे होते. पण त्यातून मिळणारे उत्पन्न आणि अर्थकारण या शेतकऱ्यांना भावले.

त्यांनी मुचंडी यांच्याकडून डाळिंब शेतीचे धडे गिरवले. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या काळात रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान मिळू लागले. जोडर बोबलादमधील शेतकरी डाळिंबाकडे वळू लागले. हळूहळू क्षेत्र वाढू लागले.

पाण्यासाठी संघर्ष

गावातील शेतकरी सांगतात त्याप्रमाणे डाळिंबातून दोन पैसे हाती येऊ लागले. आर्थिक प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली. दुष्काळाच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी शिकस्त करीत होते. पाण्याची टंचाई संपत नव्हती. दुष्काळी परिस्थितीत मग शेतकऱ्यांनी टँकरने पाणी आणून बागा जगवल्या.

जत तालुक्यात म्हैसाळ योजनेचे पाणी आल्याने या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. योजनेचा कालवा जाडर बोबलाद मध्येही आहे. पण पाणी आजपर्यंत आले नव्हते. परंतु या वर्षी एप्रिल-मे महिन्यात पाणी कालव्याद्वारे गावात आले होते. जरी आवर्तनाची चाचणी असली तरी येत्या काळात शेतकऱ्यांना पाण्याची शाश्‍वत उपलब्धता होईल याची खात्री आहे.

शेततळ्यांचा ठरला मोठा आधार

पाण्याची संरक्षित सोय करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला. शासकीय योजना बांधापर्यंत चांगल्या अर्थाने पोहोचली तर त्यातून परिवर्तन निश्‍चित होण्यासाठी मदत होते. इथला शेतकरीदेखील शासकीय योजना घेण्यासाठी नेहमी आग्रही दिसतो. त्यामुळे कृषी विभागाला बांधापर्यंत योजना पोचवणे अशक्य झाले नाही. मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ शेतकरी घेऊ लागले. आजमितीला गावात सुमारे ३०० हून अधिक शेततळी दिसतात. डाळिंब पिकाला त्याचा मोठा आधार मिळाला आहे.

हंगाम व्यवस्थापन

गावातील शेतकरी मुख्यतः मृग बहरातील उत्पादन घेत होते. पण तीन वर्षांपासून अतिवृष्टी, परतीचा पाऊस या साऱ्यांमुळे डाळिंब उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे डाळिंब हंगामाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली. परंतु या संकटावर मात करण्यासाठी हंगामात बदल केला. आता आंबिया, हस्त आणि मृग बहराकडे शेतकरी वळले आहेत.

तिन्हीही हंगामांत उत्पादन घेण्यात इथला शेतकरी माहीर झाला आहे. नैसर्गिक आपत्तींचा फटका बसत असला तरी गावपरिसरात डाळिंब क्षेत्रात वाढ होत असल्याचे चित्र आहे. आकडेवारी सांगायची तर सन २०१९-२० मध्ये क्षेत्र ४२२ हेक्टर होते. त्यात वर्षागणिक वाढ होत आजमितीला ते २०२२-२३ मध्ये ५२५ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.

वडिलांच्या काळात गणेश वाणाच्या डाळिंबाची लागवड होती. आता भगवा वाण घेतो आहे. या पिकातूनच कुटुंबाची प्रगती करू शकलो याचे समाधान आहे. संकटे येणार. नुकसान होणार. मात्र न घाबरता जिद्दीने उभे राहून त्यावर मात करायची हेच शिकलो आहे.

धर्माण्णा मलाबदी ९६३७१६८७४८

वडिलोपार्जित केवळ दोन एकर शेती आहे. त्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतात कीडनाशक फवारणी करण्यासाठी जावे लागायचे. डाळिंब शेतीतून घर बांधले. जसजसे पैसे जमा होऊ लागले तसतसे सन २०११ पासून आजपर्यंत १४ एकर शेती खरेदी करणे शक्य झाले आहे.

सिद्राय अडकी ७५०७५६२४२४

वातावरणातील बदलाचा परिणाम डाळिंब बागेत जाणवत आहे. त्यातूनही प्रतिकूल परिस्थितीत बागा टिकवल्या आहेत. डाळिंबावरील प्रक्रिया उद्योग सुरु झाले तर नक्कीच याचा फायदा होईल. त्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. बाजारातील दरांत कायम चढ-उतार होत असतो. त्यामुळे परिसरात डाळिंब साठवणुकीसाठी शीतगृहांची उपलब्धता केल्यास त्याचा फायदा होईल.

युवराज लवंगी ९६३७०९८०३२

प्रगती झाली

एकरी ६ ते ७ टन उत्पादनक्षमता तर हवामान, उत्पादन व दर आदींचा विचार करता एकरी साडेतीन लाख ते त्याहून अधिक उत्पन्न घेण्यापर्यंत येथील शेतकरी पोचले आहेत. या अर्थकारणातून पक्की घरे बांधणे त्यांना शक्य झाले. शेती खरेदी करण्याकडे इथल्या शेतकऱ्यांचा कल अधिक दिसून येतो. त्यात नवी पिके घेण्याचा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळेच द्राक्षे, ड्रॅगन फ्रूट, सीताफळ आदी पिकांची विविधता दिसू लागली आहे. अवजारे, यंत्रसामग्री, ट्रॅक्टरदेखील शिवारात दिसू लागले आहेत.

बाजार व विक्री व्यवस्था

ए ग्रेडचा माल व्यापारी बांधावरून खरेदी करतात. अन्य ग्रेडच्या मालाची जत बाजार समितीत विक्री होते. व्यापारी सिद्धण्णा बसर्गी सांगतात, की डाळिंबाला चार वर्षांपूर्वी किलोला ४० रुपयांपासून ते ७० रुपयांपर्यंत दर मिळत होता. परंतु अतिवृष्टी, रोगराईचा फटका उत्पादनाला बसला आहे. परिणामी दरात वाढ होत आहे. यंदाच्या हंगामात १०० ते १४० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. गावातील डाळिंबाची उलाढाल ३० ते ४० कोटीच्या घरात जात असावी असा अंदाज ते व्यक्त करतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT