Chhatrapati Sambhajinagar News: विकसित भारताच्या निर्मितीसाठी घटक जिल्हा समजून क्षमता आणि उणिवा लक्षात घेऊन जिल्हानिहाय विकासाचा आराखडा आणि दिशा निश्चित करावी लागेल, असे मत ‘मित्र’चे (महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्फॉर्मेशन) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी व्यक्त केले.
मित्र (महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन) व एमईडीसी (महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने बुधवारी (ता. १९) ‘विकसित मराठवाडा २०४७’ या एकदिवसीय चर्चासत्राचे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी श्री. परदेशी बोलत होते.
श्री. परदेशी म्हणाले, की मित्र संस्था धोरणात्मक बदलावर काम करते. राज्याचा ग्रोथ रेट कमी होत चाललाय. तो वाढवायचा असल्यास गुंतवणूक वाढवावी लागेल. राज्यात एक खिडकी योजना केवळ नावाला आहे. दुसरीकडे तमिळनाडू, उत्तर प्रदेशमध्ये एकदा निर्णय झाला, की गुंतवणूक करणाऱ्याला कुठेही अडचण येत नाही.
तयार केलेल्या प्लॅनला निधी उपलब्ध करून दिला जाईल. सरकारच्या प्रत्येक अंगाने एक होऊन काम करणे अपेक्षित आहे. राज्याच्या जीडीपीतील ५४ टक्के वाटा मुंबई, ठाणे, पुणेचा, तर मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्हे मिळून वाटा केवळ २० टक्के आहे. देशाला विकसित करण्यासाठी जीडीपी वाढविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला योगदान द्यावे लागेल, असे ते म्हणाले.
प्रस्ताविकातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आयोजना मागील दिशा स्पष्ट केली. महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी एकेकाळी देशाची राजधानी राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या गतवैभव प्राप्तीसाठी विशेष परिश्रम घेतले जातील असे स्पष्ट केले.
एमइएडीसीचे अतुल शिरोडकर यांनी विकसित भारताच्या निर्मितीसाठी राज्य, जिल्हा, शहर यांचे योगदान निश्चित कराव लागेल. टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन अशा प्रकारे नियोजन आराखडे तयार केली जातील, असे सांगितले.
एमआयटीचे मुनिश शर्मा यांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करताना आलेले अनुभव सांगितले. येत्या २०४७ मध्ये देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर नेण्याचा संकल्प आहे.
यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या वाटा १ ट्रिलियन डॉलर (२० टक्के) करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मराठवाड्याचे महत्त्व ओळखून मित्र आणि एमईडीसी यांनी या परिसंवादाचे आयोजन केले होते.
याकरिता महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) नॉलेज पार्टनर आहे. या परिसंवादामध्ये उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, विषय तज्ज्ञ, संशोधक, अर्थशास्त्रज्ञ, शासकीय वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि सार्वजनिक आणि खासगी भागीधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी धोरणे शोधणे हा या चर्चासत्राचा उद्देश होता. मराठवाड्यातील आर्थिक वाढ आणि सामाजिक प्रगतीला चालना देण्यासाठी उद्योग, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, वॉटर ग्रीड, कृषी या विषयांवर ऊहापोह केला गेला.
...ही होती चर्चासत्राची उद्दिष्टे
धोरणात्मक गुंतवणूक आणि औद्योगिक विकास.
जलस्रोत व्यवस्थापन आणि वितरण सुधारणे.
जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे.
विभागाची पर्यटन क्षमता वाढवणे.
पायाभूत आयटी सुविधा आणि क्षमतांचा विस्तार करणे व नावीन्यपूर्ण आणि कौशल्य विकासाला चालना देणे.
सार्वजनिक-खासगी भागीदारी आणि सर्वसमावेशक धोरणांद्वारे सर्वांगीण आणि शाश्वत प्रादेशिक विकासाला चालना देणे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.