Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Mill Worker Insurance : साखर कारखाना कर्मचारी, कामगारांचा विमा काढा

Sugarcane Commissionerate News : तसेच कारखान्यांतील प्रत्येक कर्मचारी व कामगाराचा जीव अनमोल असल्याने त्यांचा विमा काढावा, अशा सूचना राज्याचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केल्या आहेत.

मनोज कापडे

Pune News : औद्योगिक सुरक्षिततेबाबत साखर कारखान्यांना सुरक्षा संचालनालयाने सखोल मार्गदर्शन व मदत करावी. मात्र, सातत्याने सांगूनदेखील सुरक्षा व्यवस्थापन न सुधारणाऱ्या कारखान्यांवर कायद्याचा बडगा दाखवावा.

तसेच कारखान्यांतील प्रत्येक कर्मचारी व कामगाराचा जीव अनमोल असल्याने त्यांचा विमा काढावा, अशा सूचना राज्याचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केल्या आहेत.

पुणे येथील हॉटेल ऑर्किडमध्ये सोमवारी (ता. १६) ‘साखर कारखाने व औद्योगिक सुरक्षा’ या विषयावर आयोजिलेल्या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. राज्य औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ व वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) संयुक्तपणे या उपक्रमाचे आयोजन केले होते.

विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, औद्योगिक सुरक्षा संचालक देवीदास गोरे व अपर संचालिका शारदा होदुले, सहसंचालक अखिल घोगरे व संजय गिरी व्यासपीठावर होते.

या कार्यशाळेत औद्योगिक सुरक्षा क्षेत्रातील नामवंत सुरक्षा तज्ज्ञांनी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना सखोल व उपयुक्त माहिती दिली. प्रतिबंधात्मक उपायांपेक्षाही दुर्घटनेनंतर होणारा खर्च प्रचंड मोठा असतो व ते टाळण्यासाठी औद्योगिक सुरक्षा केंद्रस्थानी ठेवावी.

प्रत्येक साखर कारखान्याने आता सुरक्षितता अधिकारी (सेफ्टी ऑफिसर) नियुक्त करावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना साखर आयुक्तांनी केली.

ते म्हणाले, ‘‘उद्योग क्षेत्रातील कारखाने औद्योगिक सुरक्षेसाठी दक्ष आहेत. दुर्दैवाने साखर कारखान्यांचे दुर्लक्ष आहे. राज्यात आता प्रतिदिन २० हजार टनापर्यंत गाळप क्षमतेचे मोठे कारखाने होत आहेत.

प्रत्येक कारखान्यांच्या आवारात ऊसतोड मजुरांची संख्या हजारोंच्या पटीत असते. त्यामुळे कारखान्याच्या आत व बाहेर अपघात किंवा दुर्घटना टाळण्यासाठी उच्च क्षमतेचे सुरक्षा व्यवस्थापन अवलंबावे लागेल. तसे झाले तरच जीवित व वित्तहानी टाळता येईल.’’

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विस्माचे अध्यक्ष श्री. ठोंबरे म्हणाले की, कोट्यवधींची खरेदी करणारे साखर कारखाने स्वतःच्या कामगारांना मात्र साधे हेल्मेट व सुरक्षा बूटदेखील पुरवत नाहीत. कामगारांची निष्काळजी वृत्ती व त्यांच्यासाठी आवश्यक सुरक्षा साधनांचा अभाव यातून आता साखर कारखान्यांमधील अपघात वाढत आहेत.

यापुढे प्रत्येक कारखान्यात हेल्मेट व बूट पुरवण्यासाठी विस्माकडून पाठपुरावा केला जाईल. त्यासाठी साखर आयुक्तालयानेदेखील सक्ती करावी. कारण, औद्योगिक सुरक्षा उपाय लागू केले तर ८० टक्के अपघात टळतील. अन्यथा, शुल्लक कारणास्तव अपघात होत राहतील.

साखर संघाचे श्री. खताळ यांनी अपघातांच्या घटना वाढत असताना अनेक साखर कारखान्यांमध्ये सुरक्षा अधिकारीदेखील नसल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘‘साखर कारखान्यांमध्ये १३६ आसवनी, १४६ इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारले गेले आहेत.

साखर उद्योग आता सहवीज, बायोसीएनजी नंतर ग्रीन हायड्रोजनकडेही जातो आहेत. त्यामुळे प्रत्येक कारखाना अफाट ऊर्जा निर्मितीची केंद्र बनतो आहे. या ऊर्जेमुळे कारखाने आता अक्षरशः बॉम्बची स्थानके बनत आहेत. त्यामुळेच यापुढे औद्योगिक सुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापन काटेकोर ठेवावे लागेल.’’

साखर आयुक्तांनी केल्या या सूचना

- प्रत्येक साखर कारखान्याने सेफ्टी ऑफिसर नियुक्त करावा.

- कर्मचारी व कामगारांचा विमा काढावा.

- कामगारांना हेल्मेट व सुरक्षा बूट द्यावेत.

- औद्योगिक सुरक्षितेसोबतच आरोग्य व पर्यावरणाची काळजी घ्या.

- ऊसतोड कामगारांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत उपाय योजावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT