Yavatmal News : पुसद औद्योगिक परिक्षेत्रातील एका कारखान्यात निकृष्ट दर्जाच्या खताचे उत्पादन करून त्याची विक्री करण्यात आली. या खताच्या गोणीत केवळ वाळू भरण्यात आली होती. या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याने संबंधितांविरोधात फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी या संबंधी निवेदन देत ही मागणी केली. त्यानुसार, महागाव तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रांमधून बोगस खताची विक्री होत असल्याची तक्रार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. त्याआधारे संबंधित दुकानातून खताचा नमुना घेण्यात आला.
या कारवाईनंतर औद्योगिक परिक्षेत्रातील संबंधित कारखान्याची तपासणी करण्यात आली. मात्र त्या ठिकाणी एक किलोही खत मिळून आले नाही, असा हास्यास्पद दावा कृषी विभागाने केला आहे. परिणामी ही कारवाईच एकंदरीत संशयास्पद असल्याचे सिद्ध होत आहे. या गैरप्रकाराला खुद्द कृषी विभागाचे तर समर्थन नाही, अशी देखील शंका आहे.
त्याची दखल घेत संबंधित कंपनी प्रशासनाविरोधात फौजदारी कारवाई करावी, त्यासोबतच या गैरकृत्याला समर्थन देणाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी, अशी मागणी आहे. निवेदन देतेवेळी जगदीश नरवाडे, गोविंद देशमुख, शिवाजी देशमुख, संध्या रणवीर, दादाराव ठाकरे, तात्या शिंदे, विजय सूर्यवंशी, संदीप ठाकरे यांची उपस्थिती होती.
खताच्या गोणीत रांगोळी तसेच वाळू याचे मिश्रण होते. अनेक शेतकऱ्यांनी या खताची खरेदी करुन त्याचा वापर शेतीत केला. परंतु ते निकृष्ट असल्याने त्यातूनच कोणताच परिणाम साधला नाही. कृषी विभागाच्या संगनमतानेच हा प्रकार घडला आहे.- जगदीश नरवाडे, संस्थापक अध्यक्ष, जन आंदोलन आधार संघर्ष समिती
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.