Yavatmala News : आत्महत्याग्रस्त असलेल्या यवतमाळ जिल्हयात बोगस निविष्ठांचा सुळसुळाट झाला आहे. या विरोधात सातत्याने तक्रारी, निवेदन दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या भूमिकेवर साशंकता व्यक्त केली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी एका बड्या कंपनीचे खत विकत घेतले. विविध कृषी केंद्रातून खरेदी केलेल्या या खताचा वापर कापूस पिकात करण्यात आला. हे खत पिकाला दिल्यानंतर पिकाची निकोप वाढ होणे अपेक्षीत असताना शेतातील कापूस पीक पिवळे पडत झाडाची वाढ खुंटली, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
बाधित पिकाची कृषी अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सुनील टेमकर, बी.एन. चव्हाण, राजू राठोड, विनोद सुकळकर, पंजाब सोळंकी, ओंकार आसोले, श्रीहरी माने, संदीप कवाने परमेश्वर भोसले, वि.द. माळी यांनी तहसीलदारांना निवेदन देत ही मागणी केली आहे.
बोगस खताचे दुसऱ्या प्रकरणातही कृषी विभागाच्या भूमिकेवर शेतकऱ्यांनी शंका व्यक्त केली आहे. पुसद येथे खताचे उत्पादन करणाऱ्या एका कंपनी विरोधातही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे सातत्याने तक्रारी केल्या त्याची देखील दखल कृषी विभागाने घेतली नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
जनआंदोलन संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांनी हे प्रकरण रेटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून कृषी विभागाने केवळ खताचे नमुने घेतले त्यानंतर संबंधित कंपनीच्या कारखान्यात जात छापेमारीचे नाटक करण्यात आले. त्या ठिकाणी एक किलोही खत मिळाले नाही, असा हास्यास्पद दावा करण्यात आला. खासदार नागेश आष्टीकर यांच्याकडे या संदर्भाने तक्रार करण्यात आली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.