Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi sowing : रब्बी पेरणीला वेग , राज्यात सरासरी केवळ २७ टक्के पेरणी

Rabi season : राज्यात यंदा आतापर्यंत रब्बीची सरासरीच्या तुलनेत २७.५० टक्के पेरणी झाली आहे.

सुर्यकांत नेटके

Ahemdnagar News : राज्यात यंदा आतापर्यंत रब्बीची सरासरीच्या तुलनेत २७.५० टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या १३ नोव्हेंबरपर्यंतच्या पेरणीच्या तुलनेत १ लाख ३५ हजार हेक्टरवर अधिक पेरणी झाली आहे. मात्र नेहमीच्या रब्बी पेरणीचा विचार करता यंदा दिवाळी सण उलटला, तरी पेरणी क्षेत्र कमीच आहे. दरवर्षी परतीच्या पावसामुळे रब्बीची पेरणी लांबते. यंदा मात्र जमिनीत ओलावा नसल्याने पेरणी अडखळली आहे. याचा गहू, हरभऱ्याच्या पेरणीवर परिणाम होणार आहे.

राज्यातील बहुतांश भागात यंदा पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणांसह अन्य स्रोतात पुरेसा पाणीसाठा नाही. त्याचा परिणाम रब्बी हंगामावर झाला आहे. दरवर्षी साधारण दिवाळीपर्यंत रब्बीतील बऱ्यापैकी पेरण्या उरकलेल्या असतात. अलीकडच्या काही वर्षांत परतीचा पाऊस जोरदार होतो. त्यामुळे पावसाअभावी रब्बी पेरण्याला उशीर होत होता. मात्र नंतरच्या काळात गहू, हरभरा, कांदा यांसारख्या पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा अनुभव आहे. यंदा मात्र परतीचा पाऊस अजिबात झाला नाही. त्यामुळे पेरण्या होण्याला अडथळे आहेत.

राज्यात रब्बीचे सरासरी ५३ लाख ९६ हजार ९७६ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा १३ नोव्हेंबरपर्यंत ४ लाख ८४ हजार २८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा पावसाअभावी गहू, हरभऱ्याचे क्षेत्र कमी राहण्याचा अंदाज आहे. १३ नोव्हेंबरपर्यंत पेरणीचा विचार केला, तर गेल्या वर्षीपेक्षा १ लाख १९ हजार ६९४ हेक्टर अधिक क्षेत्रावर ज्वारी, तर ३५ हजार हेक्टरने हरभऱ्याची अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गव्हाचे क्षेत्र १७ हजार हेक्टरने, तर मक्याचे क्षेत्र पाच हजार हेक्टरने कमी आहे. करडई, जवस, तीळ आणि सूर्यफुलाचे क्षेत्र, तर बोटावर मोजण्याएवढे आहे.

अपुऱ्या ओलीवर पेरलेले उगवले कमी

धरणाच्या लाभक्षेत्रात पाण्याचे आवर्तन सुटल्यावर गहू, हरभऱ्याचे क्षेत्र वाढत असते. यंदा मात्र पाणीटंचाईमुळे वेळेत आणि पुरेसे आवर्तन सुटण्याची शक्यता नाही. अनेक भागांत आता रब्बीची राहिलेली पेरणी होईल की नाही याची शाश्‍वती नाही. अपुऱ्या ओलीवर पेरणी झालेल्या क्षेत्रातही पिकांची उगवण कमी झाली आहे. त्यामुळे यंदा पावसाअभावी रब्बी हंगामही धोक्यात आहे. पेरणी क्षेत्रावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.

तेरा जिल्ह्यांत पाच टक्क्यांच्या आत पेरणी

रब्बीची १३ नोव्हेंबरपर्यंत नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, अमरावती, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांत पाच टक्क्यांच्या आत पेरणी झाली आहे. लातूरची सर्वाधिक ७९ टक्केवारी आहे. त्यापाठोपाठ सोलापूरची ५१ टक्के, सांगलीची ५५ टक्के, बीड, वाशीमची प्रत्येकी ४२ टक्के, नगरची सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पेरणी झाल्याचे अहवालात नमूद आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity: नाशिक जिल्ह्यात १०८४ गावांमध्ये संभाव्य टंचाई

Local Body Elections: रत्नागिरी,सिंधुदुर्गात उमेदवारांपेक्षा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Leopard Sightings: बिबट्याच्या त्रासाने शेतकरी हैराण

Local Body Elections: कोल्हापुरात वैयक्तिक गाठीभेटींना प्राधान्य

Agriculture Festival: ‘कृषिपर्व’ महोत्सवात एआय वर विशेष मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT