Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : राज्यातील ३१ तालुक्यांत पाणीटंचाईचे भीषण संकट

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : पावसाळ्यात दमदार पाऊस न झाल्याने त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. मागील महिन्यापासून भूजल पातळी चांगलीच खोल जाऊ लागली आहे. त्यामुळे राज्यातील ३५३ तालुक्यांपैकी ३१ तालुक्यांत पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहिले असून, टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. तर ३२२ तालुक्यांत पाणीपातळी सरासरीएवढी असली तरी येत्या काळात या तालुक्यांना पाणीटंचाईची झळ बसण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे दरवर्षी ऑक्टोबर, जानेवारी, मार्च व मे महिन्यांत पाणलोट क्षेत्रनिहाय निश्‍चित केलेल्या विहिरींमधील भूजल पातळीचा अभ्यास केला जातो. त्याकरिता राज्यात पाणलोट क्षेत्रनिहाय ३ हजार ९२० निरीक्षण विहिरी निश्‍चित केल्या आहेत.

भूजलाची उपलब्धता मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या नैॡत्य मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे सप्टेंबरअखेर राज्यात पर्जन्यमान व ऑक्टोबरमधील भूजल पातळी यांच्या नोंदी घेतल्या जातात.

त्याचा सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान व भूजल पातळीत झालेली वाढ अथवा घट यांचा तुलनात्मक अभ्यास करून राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत भूजल पातळी निर्देशांक काढले जातात.

जानेवारी २०२४ मधील भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास जानेवारी २०१३ ते जानेवारी २०२२ मधील सरासरी भूजल पातळीशी करण्यात आला. यात जलधरातून विविध कामासाठी मुख्यत्वे सिंचनाकरिता तसेच पिण्याच्या पाण्यासाठी झालेला भूजल उपसा व त्यामुळे भूजल पातळीत झालेला बदल या बाबतची माहिती जानेवारी २०२४ मध्ये निरीक्षण विहिरींमधील घेतलेल्या स्थिर भूजल पातळीच्या अभ्यासावरून दिसून येते.

जानेवारी अखेरमधील निरीक्षण विहिरीतील पाणी पातळीचा मागील दहा वर्षांतील जानेवारी महिन्यातील सरासरी भूजल पातळीशी तुलनात्मक करण्यात आला. यात राज्यातील एकूण ३५३ तालुक्यांपैकी ३२२ तालुक्यांमध्ये भूजल पातळीत वाढ झाली असून, अवघ्या ३१ तालुक्यांत भूजल पातळीमध्ये मोठी घट आढळून आली आहे. त्यापैकी २४ तालुक्यांत सामान्य दुष्काळ, ४ तालुक्यांत सौम्य दुष्काळ, दोन तालुक्यांत तीव्र दुष्काळ, तर एका तालुक्यात अति तीव्र दुष्काळ भासण्याची शक्यता दिसून येत आहे.

सप्टेंबरअखेर झालेले पर्जन्यमान व निरीक्षण विहिरीतील स्थिर भूजल पातळीचा तुलनात्मक व अभ्यासाआधारे संभाव्य पाणीटंचाई भासणाऱ्या गावांची संख्या अनुमानित केली जाते. ऑक्टोबरअखेर जिल्हा स्तरावर तयार झालेल्या टंचाई आराखड्यानुसारच जिल्हास्तरावर टंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या अंमलबजावणीची कामे केली जातात.

जानेवारी, मार्च आणि मे अखेरीस भूजल पातळीच्या तुलनात्मक अभ्यासाधारे टंचाई परिस्थितीचा केवळ अंदाज घेतला जातो. मात्र या आधारे नव्याने संभाव्य पाणीटंचाई भासणारी गावे ही घोषित केली जात नाहीत.

भूजल पातळी खालावण्याची कारणे

- पावसाचे स्थळ, वेळ आणि दोन पावसातील खंड.

- भूजलाचा सिंचनाकरिता होणारा अतिउपसा.

- भूजलाचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव.

- कमी पर्जन्यमान पर्यायाने कमी भूजल पुनर्भरण.

- पर्जन्यमानाची तीव्रता व त्याचा कालावधी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT