Tur Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Cultivation : तूर लागवडीसाठी पक्वता कालावधीनुसार वाण निवड

Tur Sowing : तूर पिकाची पेरणी १५ जून ते १५ जुलै या कालावधीत पूर्ण करावी. जास्तीत जास्त ३० जुलैपर्यंत पेरणी पूर्ण करावी. पेरणीस जसजसा उशीर होईल, तसे उत्पादनात घट येत जाते.

Team Agrowon

डॉ. विजयकुमार गावंडे

Kharif Season Update : कडधान्य पिकांपैकी तूर हे मुख्यत्वेकरून खरीप हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक आहे. पिकाच्या अधिक उत्पादनासाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य वाणांची निवड, वेळेवर पेरणी, बीजप्रक्रिया, रासायनिक खतांचा शिफारशीत वापर, आंतरमशागत, सिंचन व्यवस्थापन यासह कीड-रोग व्यवस्थापनावर भर देणे गरजेचे आहे.

जमीन आणि हवामान

- मध्यम ते अति काळी पाण्याचा चांगला निचरा होणारी कसदार जमीन लागवडीस योग्य.

- जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ दरम्यान असावा.

- साधारण १८ ते २९ अंश सेल्सिअस तापमानात पिकाची वाढ चांगली होते. ३५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पीक सहन करू शकते.

- सुरवातीच्या दोन महिन्यात चांगला पाऊस व फुलोरा अवस्थेत तुरळक सरींमुळे उत्पादनात वाढ मिळते.

पूर्वमशागत

- जमिनीची खोल नांगरणी करून उन्हात चांगली तापू द्यावी. आधीच्या पिकाचे अवशेष, पालापाचोळा गोळा करून जमीन स्वच्छ करावी.

- दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करवी. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी हेक्टरी १० ते १२ गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा सेंद्रिय खत जमिनीत मिसळून घ्यावे.

खते

पेरणीवेळी हेक्टरी नत्र २५ किलो, स्फुरद ५० किलो आणि पालाश ३० किलो (युरिया ५० किलो, सिंगल सुपर फॉस्फेट ३०० किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो किंवा डायअमोनियम फॉस्फेट १२५ किलो प्रति हेक्टर) प्रमाणे द्यावे. माती परिक्षण अहवालानुसार, आवश्यकता भासल्यास गंधक २० ते २५ किलो आणि झिंक सल्फेट १५ किलो प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे.

पेरणी

साधारणतः ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर म्हणजेच १५ जून ते १५ जुलै या कालावधीत पूर्ण करावी. जास्तीत जास्त ३० जुलैपर्यंत पेरणी पूर्ण करावी.

पेरणीस जसजसा उशीर होईल, तसे उत्पादनात घट येत जाते. साधारण १५ दिवस उशिरा पेरणी केल्यास उत्पादनात सुमारे २५ ते २७ टक्के पर्यंत घट येते.

सुधारित वाण

पीक परिपक्व होण्यास लागणाऱ्या कालावधीनुसार वाणांचे वर्गीकरण ः

१) अति लवकर परिपक्व होणारे : १३० दिवसांत आत.

२) लवकर परिपक्व होणारे : १३१ ते १५० दिवस

३) मध्यम लवकर तयार होणारे : १५१ ते १६५ दिवस

४) मध्यम कालावधीचे वाण : १६६ ते १८५ दिवस

५) उशिरा परिपक्व होणारे : १८६ दिवसांपेक्षा अधिक

जमीन आणि पर्जन्यमानानुसार वाणांची निवड

अ) मध्यम जमीन आणि मध्यम पर्जन्यमान असल्यास, लवकर किंवा मध्यम तयार होणाऱ्या वाणांची निवड करावी.

वाण : ए.के.टी. ८८११, आय.सी.पी.एल. ८७ (प्रगती), फुले राजेश्वरी, गोदावरी, रेणुका, फुले तृप्ती

ब) मध्यम ते भारी जमीन आणि खात्रीचे पर्जन्यमान असल्यास, मध्यम कालावधीचे वाण.

वाण : पी.के.व्ही. तारा, विपूला बी.एस.एम.आर. ७३६, बी.एस.एम.आर. ८५३, बी.डी.एन. ७०८, बी.डी.एन. ७१६, पी.डी.के.व्ही. आश्लेषा.

क) भारी जमीन तसेच खात्रीचे पर्जन्यमान असल्यास उशिरा तयार होणारे वाण.

वाण : आशा (आय.सी.पी.एल. ८७११९) किंवा पी.डी.के.व्ही. आश्लेषा.

पीक पद्धतीनुसार वाण निवड

अ) दुबार पीक

तूर पिकानंतर लगेच दुसरे पीक घ्यावयाचे असल्यास, लवकर तयार होणारे वाणाची निवड करावी. उदा. आय.सी.पी.एल. ८७ (प्रगती), ए.के.टी. ८८११.

ब) आंतरपीक

तूर पिकांत मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी इत्यादी पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करता येते. त्याकरिता मध्यम लवकर ते उशिरा तयार होणाऱ्या वाणांची निवड करावी. उदा. आशा, बी.एस.एम.आर. ८५३, पी.के.व्ही. तारा, फुले राजेश्वरी, पी.डी.के.व्ही. आश्लेषा.

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास,

थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ४ ते ५ ग्रॅम चोळावे. यामुळे पेरणीनंतर जमिनीतील मुळकुजव्या रोगापासून बियाणे आणि रोपाचे संरक्षण होते.

त्यानंतर रायझोबिअम जिवाणू संवर्धन २५० ग्रॅम याप्रमाणे घेऊन गुळाच्या थंड द्रावणात मिसळून प्रति १० ते १२ किलो बियाण्यास चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यास एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे.

वरीलप्रमाणे जिवाणू संवर्धक बियाण्यास लावून सावलीत सुकवावे आणि नंतर पेरणी करावी. जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया केलेल्या बियाणांची पुन्हा साठवणूक करू नये. प्रथम रासायनिक बीजप्रक्रिया आणि त्यानंतर जैविक बीजप्रक्रिया करावी.

हेक्टरी बियाणे व लागवड पद्धत

वाण---बियाणे (किलो प्रति हेक्टर)---दोन ओळीतील अंतर (सेंमी)---दोन झाडांतील अंतर (सेंमी)

अ) सलग लागवड

१) आय.सी.पी.एल. ८७---४० ते ४५---४५---२०

२) ए.के.टी. ८८११, विपूला, फुले राजेश्वरी, गोदावरी, फुले तृप्ती, बी.डी.एन.७१६---२५ ते ३०---६०---२०

३) पी.के.व्ही. तारा, बी.एस.एम.आर. ७३६, बी.एस.एम.आर. ८५३, विपुला, आशा, पी.डी.के.व्ही. आश्लेषा---१२ ते १५---९० ते १२०---२० ते ३०

४) आंतरपीक (मूग, उडीद, सोयाबीन इ. मध्ये तुरीचे वरीलपैकी मध्यम लवकर ते उशिरा तयार होणारे वाण घ्यावयाचे असल्यास)---५ ते ६---१८०---२० ते ३०

जमिनीच्या प्रतिवर दोन ओळींतील किंवा दोन झाडांतील अंतर अवलंबून असते. भारी व खोल जमीन असल्यास दोन ओळींतील आणि झाडांतील अंतर जास्त ठेवावे. मात्र, हलक्या जमिनीत अंतर कमी ठेवणे फायदेशीर ठरते. पेरणीस जसजसा उशीर होईल, तसे अंतर कमी करावे.

आंतरमशागत

- बियाणांची उगवण झाल्यानंतर साधारणपणे १० ते १५ दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एक किंवा दोन रोपे ठेवावीत.

- तुरीचे पीक पेरणीनंतर सुरवातीच्या काळात अतिशय सावकाश वाढते. त्यासाठी पेरणीनंतर ६० ते ९० दिवस किमान २ वेळा निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावे.

- पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी पहिली कोळपणी करावी. त्यानंतर २० ते २५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या कराव्या. तणनियंत्रणासाठी तणनाशकाचा वापरावयाचे असल्यास, (फवारणी : प्रति हेक्टर)

- पेरणीनंतर व उगवणीपुर्वी पेंडीमेथीलीन ७५० ग्रॅम.

- उगवणीनंतर इमॅझीथायपर (१० टक्के एसएल) ७५० मिलि प्रति. इमॅझीथायपर अधिक इमॅझोमॅाक्स (७० टक्के डब्ल्यूजी) १०० ग्रॅम.

संपर्क - डॉ. विजयकुमार गावंडे, ९८२२७ ५५७७५, (वरिष्ठ शास्त्रज्ञ तूर पैदास, कडधान्य संशोधन विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT