Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : ‘जायकवाडी’च्या पाण्याअभावी पिके होरपळली

Crop Damage : वाढत्या उष्णतेमुळे पिकांची पाण्याची गरज वाढली आहे. मात्र पाण्याच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक भागात १५ ते २० हून अधिक दिवसांपासून पाणी मिळाले नाही.

Team Agrowon

Parbhani News : वाढत्या उष्णतेमुळे पिकांची पाण्याची गरज वाढली आहे. मात्र पाण्याच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक भागात १५ ते २० हून अधिक दिवसांपासून पाणी मिळाले नाही. ऊस, भुईमूग, केळी आदी पिके होरपळली आहेत. पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याची तूट-फूट झाल्यामुळे वहन क्षमता कमी झाली आहे. परिणामी परभणी जिल्ह्यातील पिकांच्या सिंचनासाठी अपेक्षित विसर्गाने पाणी मिळत नाही. त्यात पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे आवर्तनाचे वेळापत्रक कोलमडले आहे. तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसवर सरकला आहे. या स्थितीत पिकांची पाण्याची गरज वाढली आहे.

पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचे सर्वाधिक लाभक्षेत्र परभणी जिल्ह्यात आहे. पाथरी, मानवत, परभणी, गंगाखेड, पूर्णा तालुक्यांत कालव्याच्या वितरण प्रणालीअंतर्गंत शाखा कालवे, वितरिका, शेत चाऱ्यांचे जाळे आहे. वेळापत्रक कोलमडल्याने रब्बी आवर्तनाचा कालावधी वाढला. सध्या उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन सुरू आहे.

२२०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. अनेक वर्षापासून मुख्य कालव्याची दुरुस्ती नाही. अस्तरीकरण तसेच फरशाची तुटफुट झाली आहे. पाण्याची नासाडी होत आहे. झाडे,झुडपे वाढली आहेत. गाळ जमा झाला आहे. वहन क्षमता कमी झाली आहे. जिल्ह्यात किमान १२०० क्युसेक विर्सगाने पाणी मिळणे

अपेक्षित असताना जेमतेम ७०० क्युसेक्सने मिळत आहे.

लाभक्षेत्रात पाणी वापर संस्था कार्यरत नाहीत.आवर्तनाच्या व्यवस्थापनासाठी जलसंपदा विभागाकडे पुरसे मनुष्यबळ नाही. वरच्या भागातील वितरिका, शेत चाऱ्यांचे दरवाजे परस्पर उघडले जातात. पंप बसवून अनधिकृतरीत्या उपसा केला जात आहे.त्यामुळे कालव्याच्या शेवटच्या टोका कडील परभणी, पूर्णा तसेच इतर तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी इच्छित विसर्गाने पाणी मिळत नाही.

धरण भरल्यामुळे परभणी जिल्ह्यातील डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात ऊस, केळी लागवड तसेच उन्हाळी भुईमूग तसेच चारा पिकांचा पेरा वाढला आहे. परंतु पाण्याअभावी अनेक भागातील पिके वाळून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही.पिकांच्या संवेदनशील अवस्थेत पाणी कमी मिळाल्यामुळे उत्पादकतेवर परिणाम होणार आहे.

आमच्या भागात ऊस लागवड वाढली आहे. परंतु जेमतेम २०० क्युसेकने कालव्याचे पाणी मिळते. त्यामुळे पिकांना पाणी देण्यास जास्त कालावधी लागत आहे. यंदा लागवड केलेल्या सात ते आठ एकर उसाला १० एप्रिल पासून पाणी मिळाले नसल्यामुळे सुकून गेला आहे. पाणीपट्टी वसूल केली. मात्र योग्य वेगाने तसेच वेळेवर पाणी देण्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
- दत्ता वाघ, शेतकरी, पोखर्णी नृसिंह, ता.परभणी,जि.परभणी.
आमच्या भागातील कालव्याचा गाळ काढताना फरशा निघाल्या आहेत. पाण्याची नासाडी होत आहे. कालव्यावर पंप बसवून उपसा केला जात आहे. शेवटच्या टोकाकडील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही.
- बाबासाहेब रन्हेर, बाभळगाव, ता. पाथरी, जि. परभणी.
आमचे गाव कालव्याच्या शेवटच्या टोकाकडील भागात आहे. त्यामुळे आवर्तनाचे पाणी मिळण्यास खूप दिवस लागतात. सिंचनासाठी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून जोखीम पत्करता येत नाही.
- श्याम अंभुरे, ताडकळस, ता.पूर्णा, जि. परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT