Rural Story Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Story : झाडांची अजान

Village Story : गावाकडे आता इक्बालनं मकबूलचाचांची जागा घेतलीय. एहसान मन लावून शिकतोय, तो वर्गात पहिला आलाय. इकडे मोहसीन सांजेस कावराबावरा होतो.

Team Agrowon

समीर गायकवाड
Sameer Gaikwad : गावाकडे आता इक्बालनं मकबूलचाचांची जागा घेतलीय. एहसान मन लावून शिकतोय, तो वर्गात पहिला आलाय. इकडे मोहसीन सांजेस कावराबावरा होतो. वडिलांच्या फोटोकडे पाहत बसतो. त्याने प्रौढत्वात चक्क सनई शिकण्याचा वर्ग लावलाय. त्याच्या घरातून निघालेले सनईचे स्वर वाऱ्यावर स्वार होऊन उत्तररात्रीस गावातल्या दर्ग्याच्या मीनारापाशी थडकतात तेव्हा कंपने उठतात आणि झाडं अजान म्हणतात!


गावात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच मुस्लिमांचे उंबरठे होते. त्यातला एक उंबरा मकबूल हुसैन यांचा होता. काही वर्षांपूर्वी मकबूलचाचा गाव सोडून थोरला मुलगा मोहसीनकडे हवापालटासाठी गेले तेव्हा रणरणत्या उन्हात त्यांच्या निरोपासाठी गावच सडकेवर लोटलेला. तो डेरेदार पिंपळ माणसांच्या गर्दीने गलबलून गेला. ‘जिंदगी में हज जा न सका लेकीन विदाई तो उससे भी बेहतरीन मिल गयी, न जाने अब ये मिट्टी नसीब में गंवारा होगी की नही..’ असं म्हणत बसमधून उतरून मातीला चुंबताच आयाबाया भारावल्या. वाकताना पांढुरक्या दाढीला चिकटलेली माती त्यांनी पुसली नाही.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांच्या अवस्थेनं गलबललेल्या जुन्या खोंडांनी मोहसीनला फर्मावलं, ‘मकबूलकडे लक्ष दे बाबा, त्याला काय पाहिजे काय नको ते पाहा. तब्येतीकडं ध्यान दे...’ इकडे मकबूलचाचांना लोकांच्या सूचना सुरू होत्या. काहींनी खाण्यापिण्याच्या जिनसा दिल्या, कुणी पायजमा बंडीचं कापड दिलं, तर कुणी पानाची चंची दिली. मध्येच कुणी पायावर डोकी टेकवत होत्या. ते उदार अंतःकरणाने आशीर्वाद देत होते. सडकेवरची गर्दी काही केल्या कमी होईना तसं कंडक्टरने घंटी वाजवायचा सपाटा लावला. अखेर गावकरी हटले मात्र मकबूलचाचांचे पाय काही केल्या उचलत नव्हते. त्यांची नजर भिरभिरत होती. त्यांनी दूरवर पाहिलं पण हवं ते दिसलं नाही. खांद्यावरच्या टॉवेलनं डोळे पुसत ते पुन्हा बसमध्ये चढले. बसचं अगम्य संगीत सुरू होताच मकबूलचाचांचे प्राण नजरेत एकवटून पांदीकडच्या दिशेने लीन झाले. बस काही फर्लांगभर पुढे जाताच आसमंतास चिरून टाकणारी ‘चाच्चाजान’ची आर्त हाक कानी येताच त्या वृद्ध देहामधली वीणा झंकारून उठली! आनंदाश्रू आले. बस पुन्हा थांबली.

आता मकबूलचाचांना खाली उतरता आलं नाही, कारण मोहसीनच्या चेहऱ्यावरची नाराजी त्यांना दिसत होती. चिमुरड्या एहसानसह धावत आलेली शबाना धपापलेल्या उरानं आत शिरली. सासऱ्याच्या गळ्यात पडली. ओक्साबोक्शी रडू लागली. एहसानला छातीशी धरत शबानाला शांत करत मकबूलचाचा वदले. ‘अब मुझे हसते हसते विदाई दो.’ आवंढा गिळत सुकल्या ओठावरून जीभ फिरवत ते बोलले, ‘अपने इक्बालमियां का खयाल रखना.. उसे कहना, अब्बूने जाते वक्तभी याद किया था, मगर रोते हुये नही !’ डोळ्यातलं पाणी लपवत एहसानला शबानाच्या हाती सोपवलं, सनईला कुरवाळत ओठावर हसू आणलं. खोटंखोटं हसण्याची कला त्यांना चांगलीच अवगत होती.

बसने वेग घेतला तसे रस्त्यावरचे हात हलले, खिडकीआडचा थकलेला हातही संथ हलला, तावदानावरील मेघांच्या पांढरऱ्यानिळ्या प्रतिबिंबात आस्तेकदम विरघळून गेला. मकबूलचाचांच्या डोळ्यात मळभ गोळा झालं. बसबाहेरचं दृश्य हळूहळू धुरकट होत गेलं तसं भूतकाळाचा पट पळत्या झाडांसोबत मागेपुढं होत राहिला. त्यांच्या किती पिढ्या गावात गेलेल्या हे त्यांनाही ठाऊक नव्हतं. वडील रहमतचाचा गावातले बुजुर्ग. त्यांचा पिढीजात व्यवसाय सनईवादनाचा.

गावात मंगलकार्य असलं, की रहमतचाचा आपल्यासोबत किशोरवयीन मकबूलला घेऊन जात. बापलेक सनई वाजवत. वाजंत्री होण्याचं वेड डोक्यात शिरल्यानं मकबूलचं शाळेशी कधी जमलंच नाही. माणसं वाचण्यात मात्र ते वाकबगार होते. वडिलांच्या इंतकालनंतर वाढीव जबाबदारी वारसारूपाने आली, ती म्हणजे फकीरत ! गावाबाहेरील दर्गाहची देखरेख करायची, तिथं येणाऱ्या हिंदूमुस्लिम श्रद्धाळूंचे गाऱ्हाणे ऐकून खुदापाशी त्यांच्या सलामतीसाठी इबादत करायची हे ओघानं आलं.

वडिलांच्या पाठीमागे सनईवादन बंद झालं तरी धाकटा मुलगा इक्बालने त्यावर जिवापाड प्रेम केलेलं. संगीत हा त्याचा प्राण होता. इक्बालचं हे वर्तन मकबूलचाचांना आवडायचं, पण मोहसीनला वाईट वाटेल म्हणून ते मनमुराद कौतुक करत नसत. मोहसीनचं नास्तिकत्व त्यांना खुपलं नाही, पण त्याच्या या गुणापायी त्यांनी मनोमन स्वीकारलंही नाही. त्यांचं नातं कलम केलेल्या झाडासारखं होतं, विरोधाभासी गुण असूनही एकत्र वाढणारं. मोहसीननं अभ्यासात चमकून चांगली नोकरी मिळवली. इक्बाल मात्र भौतिक गोष्टींऐवजी जगण्याच्या अर्थावर प्रेम करणारा होता. तोही किशोरवयापासून आपल्या वडिलांसवे सनईवादनासाठी जायचा.

त्यानंही शाळेला अल्पावधीत अलविदा केलेलं. इक्बालच्या पाठीवर पाच मुली झाल्यानं कमाई कमी अन खाणारी तोंडे जास्त झालेली. घर जाळून परोपकाराची ओढ असल्यानं पत्नी हमीदाची खूप फरफट झाली. मोहसीनचा आईवर अतोनात जीव होता. त्यानं अनेकदा विनवूनही हमीदाबी कधीच त्याच्याकडं हवापालटासाठीही गेल्या नाहीत. तर इक्बालचं मायबापात, गावगाड्यात विरघळून जाणं पसंत असूनही त्यांचा मोहसीनवर जास्ती जीव होता. त्याच्या बळावरच मुलींची लग्ने होऊ शकली, अन्यथा ती आवाक्याबाहेरची गोष्ट होती. तर वडिलांनी आईची फरफट केली, धाकट्या भावालाही त्याच मार्गाने नेलं याचं मोहसीनला शल्य होतं. बहिणींनंतर निकाह केल्यानं संसारास उशीर झाला. त्याला मुलगी झाल्यावर मकबूलचाचा सगळ्या बिरादरीला त्याच्या घरी घेऊन गेलेले. त्यानंतर फारसं येणंजाणं नव्हतं.

थकलेल्या हमीदाबीनं अंथरूण धरल्यावर मोहसीनने आग्रह करूनही त्या त्याच्याकडे गेल्या नाहीत. वडिलांवरील प्रेमापायी आई नाकारतेय, शिवाय इक्बालच्या चिंतेनंही ती झिजतेय हे तो ओळखून होता. हमीदाबीच्या दवाखान्यावरून झालेल्या वादात मोहसीनच्या तोंडी अपशब्द आले. मकबूलचाचांचा स्वाभिमान दुखावला. आई आपल्यासवे येत नाही या जाणिवेने दुखावलेला मोहसीन घरी गेला. त्यानंतर अल्पावधीतच हमीदाबी निवर्तल्या. याचा मोहसीनला जबर धक्का बसला. भाऊ आणि वडिलांवर त्यानं ठपका ठेवल्याने बापलेकांत तणावात वाढत गेला. इक्बालला मुलगा झाला तरी मोहसीन गावी आला नाही. अखेर खुदानेच यावर तोडगा काढला. मकबूलचाचांना हृदयविकाराचा धक्का आल्याचं निमित्त झालं, मोहसीन त्यांना न्यायला गावी आला. गाव सोडून जायला ते राजी नव्हते. पण मोहसीनचा संसार, त्याची मुलगी पत्नी यांच्या डोक्यावरूनही आपला हात फिरला पाहिजे या भावनेने ते निघाले. जाताना सनईची सोबत घेऊन गेले. त्यांच्या जाण्यास इक्बालचा विरोध असल्याने निरोपास तो आला नव्हता. अखेर शबानाच मुलासह ऐनवेळी तिथं आलेली.

मोहसीनकडे गेल्यानंतर मकबूलचाचांचे काही दिवस ठीकठाक गेले, मात्र नंतर त्यांना गावाची याद येऊ लागली. नात, सूनेशी त्यांचं सुत चांगलं जमलेलं; पण शबाना, एहसानचा भास झाला नाही असा दिवस जात नव्हता. दर्ग्यात चेतवलेल्या उदाचा वास आठवायचा, गावातली माणसं डोळ्यापुढे फेर धरून नाचायची. पीरसाहेबाच्या मजारीवर अंथरलेल्या चादरीचा गंध दरवळायचा. मोहसीनला वाईट वाटेल म्हणून मनातली गोष्ट त्याला सांगितली नाही. अगदीच घालमेल झाल्यावर एकांतात हळू सनई वाजवायचे.

तणावाने ते आजारी पडले. त्यांना इस्पितळात भरती केलं गेलं. खबर कळताच इक्बाल त्यांना भेटायला आला पण मकबूलचाचांनी त्याला आल्या पावली परत पाठवला. शबाना, एहसान काही दिवस राहून पुन्हा गावाकडे परतताच त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, तेंव्हा डॉक्टरांनी मोहसीनला सावध केलं. मोहसीननं स्वतःला सावरत त्यांच्या मनातली इच्छा ओळखली. भेदरलेला इक्बाल दवाखान्यात आला, वडिलांच्या पायापाशी झोपी गेलेल्या मोहसीनला पाहून त्याचं मन द्रवलं. सगळा संताप, कोलाहल एका क्षणात नाहीसा झाला. त्यानं भावाला मिठी मारलेली पाहून मकबूलचाचा भारावले. त्यांच्या मनावरचं ओझं हलकं झालं. त्यांना आता मातीची ओढ लागली, ‘खाक-ए-सुपूर्त’ची तयारी त्यांच्या मनाने सुरू केली.

गोतावळ्यासह मकबूलचाचा गावाकडे निघाले. सांजेच्या सुमारास ते घरात पोहोचले. अंगणातल्या बाजेवर त्यांना झोपवण्यात आलं. रात्रभर त्यांना भेटायला गावातली माणसं येत होती, बायका, पोरी घडीभर बसून जात होत्या. अशक्त हाताने हळुवार माळेचे मणी ओढताना त्यांच्या मनात आठवणींनी फेर धरला होता. अस्मानातला चांदतारा डोळ्यापुढे झुलत होता, अजानचे ध्वनी कानात घुमत होते, मध्येच हमीदाबीचा नाजूक किनरा आवाज ऐकू येत होता. पहाटेच्या सुमारास त्यांचे श्‍वास जड होत गेले आणि बरोबर पहिल्या नमाजच्या वेळी त्यांचा देह निमाला. कुटुंब शोककल्लोळात बुडालं. दुपारच्या वेळी त्यांना मूठमाती दिली गेली. फातेहा पढताना इक्बालचा कापरा स्वर कंठाशी आलेला. ‘अल हम्दु लिल्लाहि रब्बिल आलमीन..’चा धीरगंभीर आवाज घुमताच मीनारावर बसलेल्या कबुतरांनी एकच गलका करत आसमंतात कूच केलं, त्यांच्या पंखाचा फडफडाट घुमला. ग्यारवी उरकून मोहसीन घरी परतला.

गावाकडे आता इक्बालनं मकबूलचाचांची जागा घेतलीय. एहसान मन लावून शिकतोय, तो वर्गात पहिला आलाय. इकडे मोहसीन सांजेस कावराबावरा होतो. वडिलांच्या फोटोकडे पाहत बसतो. त्याने प्रौढत्वात चक्क सनई शिकण्याचा वर्ग लावलाय. त्याच्या घरातून निघालेले सनईचे स्वर वाऱ्यावर स्वार होऊन उत्तररात्रीस गावातल्या दर्ग्याच्या मीनारापाशी थडकतात तेंव्हा कंपने उठतात आणि झाडं अजान म्हणतात

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

Rabi Crop Demonstration : तेलबिया उत्पादनाचे रब्बीत १७,८०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके

Distillery Project : आसवनी प्रकल्पांच्या पाण्याचे वर्गीकरण वादात

Malegaon Sugar Factory : ‘माळेगाव’चे १५ लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट

Quality Control Department Issue : ‘गुणनियंत्रण’च्या बदल्यांसाठी समुपदेशन हाच एकमेव पर्याय

SCROLL FOR NEXT