Agro Vision Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांची खरी समृद्धी

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : तीन वर्षे जैविक शेतीचा अनुभव घेतल्यानंतर पहिल्या वर्षी काहीच हाती लागले नाही. उलट रासायनिक शेतीप्रमाणेच उत्पादकता खर्च करावा लागला. त्यामुळे पुन्हा रासायनिक शेतीकडे वळण्याची मानसिकता झाली असतानाच नैसर्गिक शेतीविषयी माहिती कळाली आणि त्याचा अवलंब केल्यावर कमी खर्चात अधिक उत्पादकतेचा उद्देश गाठता आला. त्यानंतर गेल्या दहा वर्षांपासून याच पद्धतीनुसार शेती करीत असल्याचे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सांगितले.

ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचे शुक्रवारी (ता.२४) झालेला उद्‌घाटन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यूपीएल कंपनीचे चेअरमन रज्जू श्राफ, डॉ. सी.डी. मायी, डॉ. पंदेकृवि कुलगुरू डॉ. शरद गडाख, माफसू कुलगूरू डॉ. नितीन पाटील, महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांची या वेळी उपस्थिती होती.

आचार्य देवव्रत म्हणाले, की मी मूळचा हरियानाच्या कुरुक्षेत्रचा. आमच्या संस्थेचे पाच गुरुकुल असून, त्यात देशभरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना आमच्या २०० एकरांतील भाजीपाला, अन्न दिले जाते. मात्र एकदा पिकावर फवारणी करताना मजुराला भोवळ आली. विष तोंडावाटे घेतले नसताना त्याला विषबाधा झाली. उपचाराअंती त्याचे प्राण वाचले असले तरी गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना देखील आपण काय खाण्यासाठी देत आहोत याचीही कल्पना आली.

त्या अनुभवातून रासायनिक शेतीला पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ‘केव्हीके’च्या सूचनेवरून जैविक शेती केली. पहिल्या वर्षी काहीच हाती लागले नाही. दुसऱ्या वर्षी ५० टक्‍के उत्पादन झाले. परंतु ताळेबंद तपासला असता रासायनिक शेती एवढाच खर्च झाला. जंगलातील झाडांना कोणीच डीएपी, मिश्र व इतर खते देत नाही. त्याच्यावर कोणी फवारणी करीत नाही हे समजले आणि त्याच पद्धतीची नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दहा वर्षांपासून यात सातत्य राखले आहे.

शेतकरी आत्महत्यांमुळे सुचली कल्पना

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, की विदर्भ जगात शेतकरी आत्महत्यांसाठी प्रसिद्ध आहे. शेतीत तंत्रज्ञानाचा अभाव असल्याचे कारण त्यामागे होते हे लक्षात आल्यानंतर तंत्रज्ञान प्रसारासाठी ॲग्रो व्हिजनची कल्पना सुचली. गेल्या १४ वर्षांपासून यात सातत्य राखले आहे. विदर्भात दुग्धविकासाला प्रोत्साहन मिळावे याकरिता मदर डेअरीचा ४५० कोटींचा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे.

त्यासाठी मदर डेअरीला विशेष बाब म्हणून ४५० कोटींची करसवलत देण्यात आली आहे. नागपूरच्या बुटीबोरीत हा प्रकल्प होणार असून दुग्धजन्य पदार्थावरील प्रक्रियेसोबतच संत्रा बर्फीचे उत्पादन मदर डेअरी करेल. त्यातून नागपुरी संत्र्यालाही मागणी वाढणार आहे. मदर डेअरीने राइस ब्रॅन तेलाचे उत्पादन धारा ब्रॅण्डने केल्यास विदर्भातील तांदळाला बाजारपेठ मिळेल.

नागपूर एमआयडीसीत महानंदा डेअरीची यंत्रणा बंद अवस्थेत आहे. त्याचाही वापर मदर डेअरीने करावा. सफल या त्यांच्या संलग्न विभागाकडून कोल्ड स्टोअरेज उभारल्यास त्याकरिता एक रुपया भाडेतत्त्वावर जागा दिली जाईल. त्यामुळे मदर डेअरीने अशा प्रकल्पातून विदर्भाच्या विकासाला चालना द्यावी. १०० टक्‍के इथेनॉलवर चालणारी कार एका कंपनीने बाजारात आणली आहे. येत्या काळात दुचाकी, ट्रॅक्‍टरमध्ये सीएनजी, इथेनॉलचा वापर होईल, असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT