Grape Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Crop Damage : पावसाची द्राक्षावर अवकृपा

मुकुंद पिंगळे, अभिजीत डाके

Nashik/Sangli News : राज्यभरात विविध भागांत झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान आहे. द्राक्ष उत्पादक पट्ट्याला मोठा तडाखा बसला आहे. नाशिक, सांगली विभागांत झालेल्या पावसामुळे छाटणी झालेल्या द्राक्षबागांवर डाऊनी, करपा रोगांचा प्रादुर्भाव आहे. तर घड कमी व कमकुवत निघण्यासह जिरणे, गोळी घड, कोवळ्या फुटींचे नुकसान आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

द्राक्ष बागायतदार संघाच्या माहितीनुसार, राज्यात साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष लागवड आहे. या वार्षिक फळपिकाच्या उत्पादनासाठी गोडी बहार छाटणी कामकाजाला गती आली आहे. द्राक्ष उत्पादक पट्ट्यात ५० टक्के छाटणी झालेली आहे. मात्र झालेल्या परतीच्या पावसामुळे द्राक्ष बागांची हानी झाली आहे. छाटणी झालेल्या बागा फुलोरा अवस्थेत आहेत. वातावरण बदलामुळे द्राक्ष वेलींवर डाऊनी, करपा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे वेलींची कार्यक्षमता मंदावली असून, परिणामी घडाची अपेक्षित वाढ होण्यास अडचणी आहेत. यात प्रामुख्याने पावसामुळे घड जिरण्याचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र आहे.

गेल्या सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासून छाटण्या सुरू झाल्या. मात्र नुकसान वाढत असल्याने बागा वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. डाऊनी, करपा यांसह नाशिक भागात उडद्या, रसशोषक किडींचा प्रादुर्भाव असल्याने पीक संरक्षणासाठी औषधांच्या फवारणी सुरू आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात पीक संरक्षण खर्च वाढत आहे. एकरी ५ ते १० टक्क्यांनुसार एकरी १५ ते २० हजार रुपये खर्च करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परिणामी सध्याच्या परिस्थितीमुळे द्राक्षाच्या उत्पादनात घट होईल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

नाशिक विभागात चांदवड, दिंडोरी, निफाड, सिन्नर तालुक्यांत जवळपास ५० टक्क्यांवर छाटणी झाली आहे. मात्र चांदवड, दिंडोरी व निफाड तालुक्यांच्या मध्यवर्ती भागात मोठा फटका आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र रोग किडींनी डोके वर काढले आहे. परतीच्या पावसामुळे घड जिरण्याचे प्रमाण अधिक असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी कळविले आहे. गेल्या उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी बागा जागविल्या. मात्र पाऊस व उघडिपीनंतर पडणाऱ्या दवांमुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

विभागनिहाय द्राक्षछाटणीची स्थिती

विभाग टक्केवारी

सांगली ५०

पुणे ५०

नाशिक ५०

सोलापूर १०

मे महिन्यात अति उष्णतेमुळे घडांची निर्मिती कमकुवत, वेलीवर घडांची संख्या कमी

ढगाळ वातावरण सूर्यप्रकाशाची कमतरता आणि मुळ्यांची कार्यक्षमता मंदावल्याने घडांच्या वाढीवर परिणाम

डाऊनी, करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने फवारण्या वाढल्या

घड जिरण्याचे प्रमाण वाढले

नवीन घड कमकुवत निघण्यासह जिरण्याची समस्या

पोंगा अवस्थेत पावसाच्या पाने फाटून वेली बाधित

घड बाळीवर जाण्याचे प्रमाण वाढले.

अति पावसामुळे द्राक्षबागेत ट्रॅक्टर चालत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ.

ढगफुटीसदृश पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी होते. त्यात छाटणीनंतर नवीन फुटीची पाने, कोवळ्या घडांचे नुकसान आहे. कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढत असताना पीक संरक्षण कामात अडचणी येत आहेत. फवारणी करताना ट्रॅक्टर चालत नसल्याने कामकाज विस्कळीत होत आहे. ट्रॅक्टर बिघाड होऊन मेंटेनन्सचा खर्चही वाढत आहे. उत्पादन खर्च, श्रम व नुकसान अशा सर्वच अंगाने द्राक्ष उत्पादक अडचणीत आहेत.
किशोर निफाडे, द्राक्ष उत्पादक, शिरवाडे वणी, ता. सटाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Cultivation : फळबाग लागवडीच्या उद्दिष्टालाच ग्रहण

Cotton Market : कापसाची आवक अल्प; दर नीचांकी स्थितीत

APMC Levy : आचारसंहितेमुळे बाजार शुल्क पुनर्रचना समिती रखडली

CM Eknath Shinde : राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा

Input and Quality Control Department : ‘गुणनियंत्रण’च्या एकाच पदावर दोन अधिकाऱ्यांच्या नेमणुका

SCROLL FOR NEXT