Latest Agriculture News : तीन महिन्यापासून हुलकावणी देत असलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. २९) तालुक्याला झोडपून काढले. काही ठिकाणी अर्धा तास, तर काही ठिकाणी तासभर झालेल्या पावसामुळे पिकांना उभारी मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कळंब महसूल मंडळात ६५. ३, इटकूर ४७, शिराढोन २५. ८, गोविंदपूर २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कळंबमध्ये अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने काही वेळातच पाणी साचून राहिले.
गेल्या तीन महिन्यांपासून पावसाचा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत होते. पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याने खरीप हंगामातील पिकांनी तग धरली. तर आतापर्यंत पडलेल्या पावसाने तालुक्यातील विहिरी, कुनालिका, कोल्हापुरी बंधारे कोरडे आहेत.
त्यामुळे पाणी पातळीत कसलीही वाढ झालेली नाही. २८ सप्टेंबर रोजी तालुक्यातील हासेगाव, इटकूर परिसरात झालेल्या वाऱ्यासह पावसामुळे ऊस पीक आडवे पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस उभा करण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहे. शुक्रवारी तालुक्यात झालेल्या पावसाने हजेरी लावून पिकांना उभारी दिली आहे.
सायंकाळी पाचनंतर उत्तर दिशेकडून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. आधी जोराचा वारा आणि त्यानंतर येणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गणेश मंडळावरील पत्रे किंवा कागद उडून जाऊ नये यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती.
तालुक्यात टप्प्या-टप्प्याने झालेल्या पावसाने पाणीच पाणी केले. मांजरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. तालुक्यात सोयाबीनसह फळ, ऊस व पालेभाज्यांना मोठ्या पावसाची गरज होती.
पिकांवरील रोग आणि किड घालवण्यासाठी मुसळधार पावसाची प्रतीक्षा केली जात होती. आजच्या पावसाने काही प्रमाणात का असेना दिलासा दिला आहे. अनंत चतुर्दशी व त्यानंतर काही दिवस मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज जाणकार शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात होता
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.