Nashik News : शेतकऱ्यांनी आपली मते मांडली पाहिजेत, ती मते लोकप्रतिनिधींसमोर येतात. शेतकऱ्याला माल पिकवता येतो. मात्र विकता येत नाही. त्यामुळे दर आणि बाजारपेठांचा आढावा घेऊनच मालाची विक्री करायला हवी. त्यामुळे शेतीत शिकलेला माणूस आला तरच शेती क्षेत्राची प्रगती होईल, बिना शिकलेल्या माणसाची शेती राहिली नाही, असे मत केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.
२०१२ मध्ये कृषी पणन सुधारणा कायद्यान्वये जिल्ह्यात २०१३ मध्ये परफेक्ट नावाने पहिले खासगी मार्केट यार्ड सुरू झाले होते. १० व्या वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त गुरुवारी (ता. ७) शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंत्री दानवे बोलत होते.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, देवयानी फरांदे, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे, परफेक्ट कृषी मार्केट यार्डचे संचालक बापू पिंगळे, राधाकिसन पठाडे, दामोदर मानकर, नाना करपे आदी उपस्थित होते. या वेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
दानवे म्हणाले, की शेतीत शास्त्रोक्त पद्धतीने कामकाज केलेच पाहिजे. शेतीविषयक वाचन शेतकऱ्यांनी केले पाहिजे. कृषी विभागात जाऊन योजनांची माहिती घेतली पाहिजे. जर महिलांच्या नावावर शेती असेल तर ८० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. केंद्र सरकार शेतीत मोठी गुंतवणूक करत आहे.
त्यामुळे योजनांची माहिती करून घ्या. ड्रोन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेतकरी आता खते देण्यासह फवारण्या करू शकतो. तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. ‘सह्याद्री फार्मर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी मार्गदर्शन केले. बाळासाहेब कर्डक यांनी प्रास्ताविक केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.