Virar News : पालघर जिल्ह्याच्या भौगोलिक वातावरणात चांगले उत्पन्न देणाऱ्या पांढऱ्या कांद्याची ओळख आहे. यंदा लांबलेल्या व अवकाळी पावसात कांद्याची लागवड तग धरून होती. आता तो बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे. वसईतील आठवडा बाजारात शेतकरी थेट माल आणून विक्री करत आहेत. मात्र कांदा हंगाम लांबल्याने दोन किलोच्या माळेला ८० ते १०० रुपयांचा चढा भाव मिळत आहे. परिणामी पांढऱ्या कांद्याने चांगलाच भाव खाल्ल्याचे चित्र आहे.
पालघर जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी जेमतेम उत्पादन होत असलेले हे कांदे शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ग्राहक खरेदी करत होते. मात्र आता शेतकऱ्यांनी वाढत्या मागणीनुसार जादा उत्पादन घ्यायला सुरुवात केली.
खरिपाचा हंगाम संपताच रब्बी पिकांबरोबर जास्त प्रमाणात कांद्याचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. हा कांदा प्रत्येक वाराच्या आठवडा बाजारात थेट शेतकरीच विक्री करू लागले आहेत. कोणत्याही अडत्याची मध्यस्थी नसल्याने शेतकरी व ग्राहक या दोघांनाही परवडणाऱ्या किमतीत कांदे मिळू लागले आहेत.https://www.youtube.com/watch?v=FoEa93rWj0w
मात्र हंगामातील पहिलाच कांदा विक्रीसाठी आल्याने दोन किलोच्या माळेला शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. दोन ते चार आठवड्यांनंतर हाच कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात आल्यानंतर माळेची किंमत कमी होईल व ग्राहकांना स्वस्तात कांदे खरेदी करता येतील, असा अंदाज आहे.
वसईच्या पांढऱ्या कांद्याला बाजारात चांगली मागणी असल्याने लागवड वाढवली आहे. शेताच्या बांधावर आणि आठवडे बाजारात थेट कांदा विकल्याने त्याचा फायदा आम्हाला आणि ग्राहकांनाही होतो. एक एकरी लागवडीतून लाखभर रुपयांचे उत्पन्न मिळते.संदीप घरत, कांदा उत्पादक शेतकरी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.