Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export Policy : कांदा उत्पादकांच्या भावना जाणून निर्यात धोरणात बदल

Narendra Modi : ‘‘मी इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भावना जाणून आहे. त्यामुळे कांदा निर्यातीमध्ये सुविधा देण्यासाठी धोरणात बदल केले.’’

मुकुंद पिंगळे

Nashik News : गत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कांद्याचा मुद्दा चांगलाच गाजला. आता विधानसभेच्या निवडणुकीतही कांद्याच्या मुद्द्यावर विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत आणू पाहत आहेत.

याच पार्श्‍वभूमीवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील प्रचार सभेत बोलताना कांद्याचा उल्लेख केला. ‘‘मी इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भावना जाणून आहे. त्यामुळे कांदा निर्यातीमध्ये सुविधा देण्यासाठी धोरणात बदल केले,’’ असे मोदी यांनी भाषणात आवर्जून नमूद केले.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (ता. ८) नाशिक येथील तपोवन मैदानावर पंतप्रधान मोदी यांची प्रचारसभा झाली. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह उमेदवार व पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी हे गत लोकसभेच्या निवडणुकीत प्रचारासाठी पिंपळगाव बसवंत येथे आले असता भाषण सुरू असतानाच एका युवकाने ‘कांद्यावर बोला’ असे म्हणत भाषणात व्यत्यय आणला होता. तर पुढे कांदा उत्पादकांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने कांदा पट्ट्यातील ७ लोकसभा मतदार संघांत शेतकऱ्यांनी सत्ताधारी खासदारांना दणका दिला.

त्यानंतर केंद्राने कांदा निर्यात धोरणात काहीसे बदल केले. किमान निर्यात मूल्य रद्द करण्यासह निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे कांद्याचा मुद्दाही विधानसभेच्या निवडणुकीत गाजणार असल्याचे दिसते. त्यामुळे कांद्याच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी बोलताना कांद्याचा उल्लेख केला.

मोदी पुढे म्हणाले, की डबल इंजिन सरकारमुळे विकासाची गती डबल होते. राज्यातील शेतकरी याचा अनुभव घेत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे. सोबत नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ मिळत आहे. म्हणजे १२,००० रुपयांची वार्षिक आर्थिक मदत मिळत आहे. महाराष्ट्रात पुन्हा सरकार आल्यानंतर मदतीत वाढ होऊन १५,००० हजार रुपये देण्यात येईल. लाखो शेतकरी कुटुंबांना याचा मोठा लाभ होईल, असे आश्‍वासन यांनी प्रचारसभेत दिले.

राज्यात सोयाबीन, कापूस, भात व दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे ब्लेंडिंग वाढविल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. गेल्या दहा वर्षांत ८० हजार कोटी रुपये इथेनॉलच्या खरेदीतून शेतकऱ्यांना मिळाले आहेत. देशातील पैसा पेट्रोल खरेदीसाठी यापूर्वी विदेशात जात होता, हा पैसा आता देशातील शेतकऱ्यांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र पुढे जाण्याची गरज आहे. महाराष्ट्र पुढे आल्यास भारत विकसित होणार आहे. गरिबांची चिंता करणाऱ्या सरकारमुळेच देश पुढे जाईल. काँग्रेस व त्यांच्या सहकाऱ्यांनी गरिबी हटावचा नारा दिला. मात्र अन्न, वस्त्र व निवारा या गरजाही अनेकांना मिळाल्या नाही. गेल्या दहा वर्षांत २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.

बावनकुळे म्हणाले, की राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे. याशिवाय ८७ लाख शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळाले. साडेपाच लाख शेतकऱ्यांना कुसूम योजनेचा लाभ मिळाला. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांची वीजबिल माफ करण्यात आले. पुढील पाच वर्षे ते शेतकऱ्यांना येणार नाही.

काँग्रेससोबत शरद पवारांनी जायला नको होते : आठवले

शरद पवार यांना सोनिया गांधींनी पंतप्रधान बनू दिले नाही. त्यांच्यावर अन्याय केला, मनमोहनसिंग यांना संधी दिली. पवार यांना पंतप्रधानपद द्या असे म्हणालो होतो; पण सोनिया गांधींनी ऐकले नाही, पवार साहेब खमक्या माणूस. मात्र त्यांनी काँग्रेस सोबत जायला नको होते, असे रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच राहुल गांधी अमेरिकेत जाऊन संविधान बदलण्याची भाषा करतात. जर आरक्षण संपवले, तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिला. ‘मविआला लोक म्हणतात हाय हाय, उद्धव ठाकरेंना लोक म्हणतात अडीच वर्षे केलं काय?’ असे म्हणत संविधान, मराठा आरक्षण, लाडकी बहीण योजना या विषयांवरही त्यांनी भाष्य केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 20th Installment : पीएम किसानचा २० वा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात?

Sangli Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; सुरेश वरपूडकर भाजपवासी तर कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश गुरुवारी

Sangli Rain : वारणा धरण क्षेत्रात संततधार

Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

SCROLL FOR NEXT