Grape Cultivation
Grape Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Advisory : घटत्या तापमानात द्राक्ष बागेत करावयाचे नियोजन

डॉ. आर. जी. सोमकुंवर 

गेल्या आठवड्यातील द्राक्ष विभागातील (Grape Section) आकाश निरभ्र होते. सध्या तापमानात थोडीफार वाढ झाली असून, रात्रीचे तापमान कमी होऊ लागल्याचे दिसत आहे. येत्या आठवड्यात आकाश निरभ्र असले तरी दिवसाचे तापमान (Temperature) वाढून रात्रीच्या तापमानात घट होण्याची दाट शक्यता असेल. आपल्याकडे विविध वाढीच्या अवस्थेत असलेल्या द्राक्षबागेमध्ये या वातावरणाचा परिणाम कसा होईल, याची माहिती घेऊ.

शेंडा वाढ कमी होणे

द्राक्षवेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीचा वेग संतुलित राहण्याकरिता तापमान व आर्द्रता महत्त्वाची भूमिका निभावते. किमान तापमान १५ अंशाच्या पुढे व कमाल तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस हे द्राक्ष वेलीच्या वाढीसाठी पोषक मानले जाते. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता आपल्याकडे बागेत नुकत्याच निघत असलेल्या फुटींपासून ते मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्था दिसून येतील.

आपण या वेळी फक्त मणी सेटिंगपर्यंतच्या बागेचा विचार केल्यास घडाच्या विकासामध्ये आवश्यक असलेली पानांची संख्या महत्त्वाची आहे. ही गरज वेलीची शेंडा वाढ फक्त पूर्ण करू शकते. आठ ते दहा मि.मी. जाड अशा काडीवर निघालेल्या फुटींवर जो घड तयार होतो, त्या संभाव्य साधारणपणे ४५० ते ५०० ग्रॅम घडाच्या विकासामध्ये पानाचे क्षेत्रफळ व पानांची संख्या महत्त्वाची असते. नवीन निघालेल्या फुटीवर पाचव्या पानावर घड दिसून येतो.

त्या घडाच्या पुढे १६० ते १७० वर्ग सें.मी. या क्षेत्रफळाची १० ते १२ पाने गरजेची असतात. पानाच्या आकारानुसार पानांची संख्या कमी अधिक करता येते. फुटींची ही वाढ फक्त प्रीब्लुम अवस्थेत मिळवून घेता येते. पुढील काळामध्ये (मणी सेटिंगनंतर कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापन फायद्याचे नसते.) घडाच्या विकासात पानांचे महत्त्व लक्षात घेऊन फुटींची वाढ करून घ्यावी.

सध्याच्या तापमानाचा विचार करता ज्या भागामध्ये किमान तापमान १५ अंशापर्यंत आले असेल, त्या बागेमध्ये फुटींची वाढ होण्यास अडचण येणार नाही. मात्र बोदामधील मुळे कार्यक्षम नसल्यास किंवा काळसर पडलेली असल्यास फुटींची वाढ होण्यात अडचणी येऊ शकतात. यावेळी बोदाच्या बाजूने नांगराच्या साह्याने हलकीशी चारी घ्यावी.

यावेळी पाच ते दहा टक्क्यांपेक्षा जास्त मुळे तुटणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी चारी घेणे शक्य नाही, अशा बोदावरील ठिबकचे पाणी पडत असलेल्या ठिकाणी खुरपी किंवा छोट्या कुदळीने जमीन चाळून घ्यावी. यामुळे मोकळी झालेली माती मल्चिंगचे काम करेल. त्यामुळे एकतर नवीन पांढरी कार्यक्षम मुळे तयार होतील किंवा सध्या उपलब्ध मुळे कार्य करण्यास सुरुवात करेल.

शेंडा वाढ करण्याकरिता अन्नद्रव्ये व पाण्याचा वापर तितकाच महत्त्वाचा असेल. बागेमध्ये पाणी देतेवेळी वाफसा परिस्थिती राहील, याची काळजी घ्यावी. जास्त पाणी झालेल्या परिस्थितीत बोदामधील मुळे काळी पडण्याची शक्यता असते. तर फारच कमी पाणी असलेल्या परिस्थितीत मुळे कार्यक्षमता कमी होईल.

त्यासोबत नवी पांढरी मुळे तयार होण्याची शक्यता कमी असेल. अन्नद्रव्यांच्या वापरामध्ये शेंडा वाढीसाठी नत्रयुक्त किंवा नत्र व स्फुरद असलेले ग्रेडचा वापर फायद्याचा ठरतो. उदा. युरिया, १२-५१-० इ. जमिनीची परिस्थिती, काडीवर पानांची गरज यानुसार खतांची मात्रा कमी अधिक करता येईल.

घडाची आकार कमी राहणे

लवकर छाटणी झालेल्या बागेमध्ये या वेळी ९ ते १० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त आकाराचे मणी असल्याची स्थिती असेल. ही अवस्था घडाच्या विकासात महत्त्वाची आहे. या वेळी बागेचे तापमान व मुळांची अवस्था या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतील. रात्रीचे तापमान फारच कमी झालेले असल्यास वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग मंदावतो.

या विपरीत परिणाम मण्याच्या विकासावर होतो. यावेळी मण्याचा आकार वाढण्यासाठी संजीवकांच्या अतिरेक बागायतदार करत असल्याचे दिसते. यामुळे मण्याची जाडी थोडीफार वाढली तरी त्या पेक्षा मण्याची साल अधिक जाड होण्याची शक्यता असते. साल जाड असल्यामुळे पुढील काळात अडचणी येतात. मण्यात गोडी येत नाही व फळकाढणीस उशीरही होतो. त्यामुळे वेलीला ताण बसून पुढील हंगामात सूक्ष्म घड निर्मितीकरिता अडचणी येण्याची शक्यता असते.

खरेतर मण्याच्या विकासात या वेळी अन्नद्रव्यांपैकी स्फुरद व संजीवकांपैकी सीपीपीयू, ६ बीए इ. (शिफारशीप्रमाणे) यांचा वापर महत्त्वाचा असतो. मात्र यांचा अतिरेक झाल्यामुळे मण्यात गोडी येत नाही. परिणामी फळकाढणीला उशीर होतो. त्यानंतर बाजारात एकाच वेळी आवक झाल्यामुळे दर कोसळण्याची शक्यता असते.

तेव्हा घडाच्या आकाराकरिता संजीवकांचा अतिरेक करणे टाळून जमीन वाफसा स्थितीत आणि मुळे कार्यक्षम राहतील, याची दक्षता घ्यावी. पाण्याचा वापर संतुलित झाल्यास बोदामध्ये मुळांची स्थिती चांगली राहते. या वेळी तापमान कमी असल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी असतो. त्यामुळे वेलीची पाण्याची गरजही तितकीच कमी असते. ज्या बागेत बोदावर आच्छादन करणे शक्य असल्यास जरूर करावा. या मुळे पाण्याची बचत करता येईल आणि मुळेही चांगली कार्य करतील.

- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८

(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत.

पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा.

पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT