Palghar News : पालघर आणि १९ गावांसाठी स्वतंत्र योजना कार्यान्वित करून गावांना अतिरिक्त पाणीपुरवठा कसा करता येईल, यासंदर्भात आराखडा तयार करण्यासाठी आमदार राजेंद्र गावित यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच १९ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि नगरपालिकेचेही पाणी कमी न करता पडघे व १९ गाव पाणीपुरवठा योजनेतून या गावाला सप्टेंबर अथवा ऑक्टोबरमध्ये पाणीपुरवठा चालू होईल, असा धक्कादायक दावा गावित यांनी केला.
पालघर व २६ गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असताना १९ ग्रामपंचायतींच्या गावाला पाणी वाटपासंदर्भात वादंग निर्माण झाला होता. यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आमदार राजेंद्र गावित यांनी प्रशासकीय यंत्रणांचा समन्वय साधून जिल्हा परिषद कार्यालयामध्ये मंगळवारी (ता. ३) बैठक आयोजित केली होती. या वेळी ते बोलत होते.
पालघर आणि २६ गावांच्या नळपाणी योजनेतून पडघे आणि १९ गावांची नळ पाणी योजना अंतर्गत करण्याच्या गावित यांच्या पाठिंबामुळे पालघरचे माजी नगरसेवक व या १९ गावांचे सरपंच अशी लढत निर्माण झाली होती. शहरात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत असताना व अतिरिक्त पाणी उपलब्ध नसताना आपल्या योजनेतून इतर गावांची तहान कशी भागवावी, याबाबत तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पालघर शहरामध्ये लोकवस्ती वाढत आहे. त्यातच नगर परिषदेचे पाणी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेला आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामधील काही पाड्यांना पाणी आजही मिळत नाही, अशा परिस्थितीत वेगळी पाण्याची योजना करून नगर परिषदेचे पाणी पळवून नेण्याचा प्रयत्न चालू असल्याने पालघरच्या पाणीप्रश्नावरून वादंग निर्माण झाला होता.
यावर पडदा टाकण्यासाठी गावित यांनी १९ गावच्या सरपंचांची वेगळी बैठक घेतली होती. या बैठकीत जलजीवन मिशनचे अधिकारी व महाराष्ट्र प्रादेशिक पाणीपुरवठा खात्याचे अधिकारी उपस्थित होते. आगामी काळात होऊ पाहणाऱ्या निवडणुकांवर डोळा ठेवून पालघरमधील पाणीप्रश्न आगामी काळात उग्ररूप धारण करेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
माजी नगरसेवकांचा विरोध
पालघर नगर परिषदेकडे २०११ मध्ये हस्तांतरित झालेल्या योजनेची देखभाल-दुरुस्ती करताना पालघर नगर परिषदेचे आर्थिक परिस्थिती कोलमडलेली आहे. अशा परिस्थितीत अन्य गावांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यामधून झालेल्या खर्चापैकी २६.९२ टक्के खर्च मिळणे अपेक्षित आहे, तसेच या योजनेचे अंतर्गत १२ कोटींची थकबाकी आहे. अशा परिस्थितीत पालघर व २६ गावांच्या नळपाणी योजनेतून शुद्धीकरण केलेले पाणी इतर योजनेला देण्यास पालघरच्या माजी नगरसेवकांनी विरोध दर्शवला आहे.
अतिरिक्त पाणी कुठून येणार?
अतिरिक्त पाणी नसल्याने नवीन योजनेला पाणी कुठून द्यायचे, याच्यावरून हा वादंग निर्माण झाला होता. तरीसुद्धा काही महिन्यांत पाणी पडघे व १९ गावांना देण्याची ग्वाही आमदारांनी बैठकीत दिली, मात्र अतिरिक्त पाणीच नाही तर देणार कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवसेनेकडून टीका
नगर परिषदेचा कार्यकाळ संपला असून, सध्या आमदार आणि खासदार हेच लोकप्रतिनिधी आहेत. जनहित बाजूला सारून लोकांच्या हिताविरुद्ध सत्तेमधील लोकप्रतिनिधींकडून काही निर्णय घेतले जात असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे आणि सहसंपर्कप्रमुख केदार काळे यांनी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.