Ration Shop Agrowon
ॲग्रो विशेष

Ration Grain : केशरी कार्डधारक शेतकऱ्‍यांना सव्वा वर्षापासून मिळेना धान्य

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील एपीएल (केशरी) रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. परंतु मागील जानेवारी २०२३ पासून या शेतकऱ्यांना ना धान्य ना रोख रक्कम अशी गत झाली आहे.

दरम्यान, पुरवठा विभागाने जानेवारी २०२३ ते मार्च २०२३ या तीन महिन्यांतील रोख रक्कम कार्डधारकांच्या खात्यावर थेट वितरित केल्याचे कळविले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम जमा झाल्याची माहितीच नसल्याची स्थिती आहे.

राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशीम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील केशरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना प्रतिमहिना प्रतिसदस्य २ रुपये प्रति किलो गहू व ३ रुपये प्रतिकिलो तांदूळ या दराने ५ किलो अन्नधान्याचा लाभ दिला जात होता.

पण, यापुढे गहू, तांदूळ उपलब्ध होणार नसल्याने शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना रोख रक्कम देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. ज्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी रेशन कार्डधारकांना जानेवारी २०२३ पासून प्रत्येक महिन्याला प्रतिलाभार्थी १५० रुपये रोख रक्कम थेट बँकेच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय घेतला होता. किमतीत होणारी वाढ प्रतिमहिना रोख स्वरूपात थेट जमा करण्यासाठीही मान्यता दिली होती.

शेतकरी योजनेच्या लाभासाठी ‘आरसीएमएस’मध्ये नोंद झालेल्या पात्र रेशन कार्डधारकांकडून अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. त्यासोबत आवश्यक बँक खात्याचे तपशील आणि योग्य कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. मात्र, जानेवारी २०२३ ते मार्च २०२४ या पंधरा महिन्यांत शेतकऱ्यांना धान्य मिळालेले नाही.

तसेच रोख रक्कमही मिळाली नाही. याबाबत पुरवठा विभागाशी संपर्क केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, जानेवारी २०२३ ते मार्च २०२३ या तीन महिन्याची रोख रक्कम खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, धान्याऐवजी रोख रक्कम देण्याची योजना गुंडाळून पुन्हा धान्य वितरित करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात तीन लाखावर लाभार्थी

नांदेड जिल्ह्यात केशरी कार्डधारक शेतकऱ्‍यांची संख्या तीन लाख १२ हजार ६०५ आहे. यातील पाच हजार ६६५ शेतकऱ्यांची खाती आधारशी जोडण्याचे काम शिल्लक आहे. यापैकी धान्याऐवजी रोख रक्कम योजनेसाठी सध्या ९७ हजार ४८५ शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्‍यांना जानेवारी ते मार्च २०२३ या तीन महिन्यांचे चार कोटी ३८ लाख ६८ हजार २५० रुपये त्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केल्याची माहिती पुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.

मागील सव्वा वर्षापासून रेशनचे धान्य बंद झाले आहे. धान्याऐवजी रोख रक्कम मिळणार असल्याचे सांगत असले तरी आजपर्यंत धान्यही आणि रक्कमही मिळाली नाही.
- बळवंत पाटील, टाकळी ता. नायगाव, जि. नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : हमीभावाने १३ लाख टन सोयाबीनची खरेदी होणार 

Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ऊस गाळप हंगाम एकावेळी, उसाची पळवापळवी थांबणार!

Ration Grain : ई-केवायसी नसल्यास एक नोव्हेंबरपासून रेशन बंद

Kolhapur market committee : कोल्हापूरच्या बाजार समितीत डुक्कर आणि चोरांनी केलं बेजार, आळा घालण्याची मागणी

Cold Storage Facility : जतला शीतगृह, अन्यत्र पायाभूत सुविधा देणार

SCROLL FOR NEXT