Jalgaon News : खानदेशात आखाजी किंवा अक्षय तृतीयेनंतर अनेक शेतकरी आपली शेती भाडे करारावर देण्याचा मुहूर्त करतात. यंदाही हा मुहूर्त झाला असून, भाडे कराराचे दर मात्र कमीच आहेत. त्यात वाढ झालेली नाही. एकरी १० ते १२ हजार रुपये दर विविध भागांत आहेत.
एक ते चार वर्षे या कालावधीसाठी अनेक शेतकरी आपली शेती भाडे करारावर देत आहेत. नोकरी, व्यवसाय व अन्य कारणांनी शेतीकडे लक्ष देणे शक्य होत नसल्याने शेतकरी आपली कोरडवाहू किंवा बागायती शेती भाड्याने देतात. त्याची सुरुवात अक्षय तृतीयेनंतर केली जाते. यंदाही शेती भाड्याने देण्याचे व घेण्याचे व्यवहार सुरू आहेत. मुख्य रस्ते, पक्क्या रस्त्यांनजीकची शेती भाड्याने घेण्याकडे अनेकांचा कल आहे. या शेतीला भाडेही चांगले मिळत आहे. एकरी १२ ते १५ हजार रुपये भाडे एका वर्षासाठी अशा मुख्य रस्त्यालगतच्या शेतांना आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बारमाही पाण्याची सुविधा आहे, त्यांची शेतीही भाड्याने घेण्याकडे अनेकांचा ओढा आहे. हलके, मुरमाड क्षेत्र मात्र भाड्याने घेण्याबाबत शेतकरी नाक मुरडत आहेत. कारण या क्षेत्रात पीक जोमात येत नाही. खर्चही अधिक येतो. काळ्या कसदार क्षेत्रास अधिकची मागणी आहे.
रावेर, यावल, मुक्ताईनगरच्या तापीकाठी भाडे कराराचे दर अधिक आहेत. तर अन्य भागांतही दर बरे आहेत. परंतु त्यात यंदा वाढ झालेली नाही. कारण मागील खरिपात पावसाने नुकसान झाले. तसेच कलिंगड, कांदा, केळीसही दर नाहीत. मजूरटंचाई, खते व बियाणे टंचाई आदी समस्याही आहेत. यामुळे भाड्याच्या दरात शेतकऱ्यांनी वाढ केलेली नाही.
शेती निम्म्या हिश्शाने देण्यासही पसंती
जिरायती क्षेत्राबरोबरच बागायती क्षेत्रदेखील भाड्याने अथवा निम्म्या हिश्श्याने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, उत्पादन खर्चापेक्षा लागवड खर्च अधिक झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बेमोसमी पाऊस, अवकाळी, गारपीट, कमी पर्जन्यमान या नैसर्गिक संकटांबरोबरच मानवनिर्मित संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
वाढत्या महागाईत शेतीकामासाठी लागणाऱ्या सालगड्यांच्या मजुरीने लाखांचा टप्पा पार केला आहे. ग्रामीण भागात मजुरांची टचाई भेडसावत आहे. शेतकऱ्यांचे नववर्ष हे गुढीपाडवा किंवा अक्षय तृतीयेस असते. याच दिवशी सालगडी ठेवणे, शेती वाट्याने देणे असे शेतीचे वार्षिक नियोजन केले जाते, शेती संदर्भातील नियोजन गुढीपाडव्यालाच केले जाते. काही शेतकरी आपला बैलबारदान मोडीत काढून शेती हिश्श्याने अथवा मक्त्याने देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मजुरीदर वाढत आहे. परंतु शेती उत्पन्नात पुरेशी वाढ होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
ट्रॅक्टरचा वापर अधिक
भाकड जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवला जात आहे. बैलबारदाना कमी करून शेती ट्रॅक्टरच्या मदतीने करण्याचा प्रयोगही अनेक जण करीत आहेत. शेती कामात ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने दिसून येत आहे. मजुरीदर कमी नसल्याने शेतकरी पशुधनाचा सांभाळही करू शकत नाहीत. कारण शेतीचा पसारा अधिक आहे. बागायतीचे क्षेत्र वाढवून पशुधन कमी करण्याकडेही शेतकऱ्यांचा कल आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.