Pune News : कृषी विभागाच्या योजनांना गती देण्यासाठी मी पुण्यात येऊन स्वतंत्र बैठक घेईन. तसेच, गुणनियंत्रण विभागाची ‘गुणवत्ता’ही तपासली जाईल, अशा शब्दात पहिलाच षट्कार नवे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी ठोकला. त्यामुळे कृषी आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम अवाक झाली.
कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांच्यासह आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी कृषिमंत्र्यांना भेटण्यासाठी अलीकडेच थेट त्यांच्या निवासस्थानी केले होते. या भेटीचे निमंत्रण कृषिमंत्र्यांकडून आलेले नव्हते. परंतु, अधिकाऱ्यांनीच अनौपचारिकपणे भेट घेण्याचे ठरवत कृषिमंत्र्यांच्या सिन्नर मतदारसंघाकडे धडक मारली.
यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ.हरिहर कौसडीकर, कृषी संचालक सुनील बोरकर (निविष्ठा व गुणनियंत्रण), विनयकुमार आवटे (प्रक्रिया व नियोजन), रफिक नाईकवाडी (विस्तार व प्रशिक्षण), डॉ.कैलास मोते (फलोत्पादन) या संचालकांबरोबरच संभाजी ठाकूर, उल्हास ठाकूर व इतर अधिकारीही उपस्थित होते.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कृषी आयुक्तालयाचे अधिकारी कृषिमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले असता तेथे आधीच तोबा गर्दी होती. त्यामुळे कृषिमंत्र्यांना संवाद साधण्यास फारसा वेळ मिळाला नाही. तरीदेखील कृषिमंत्र्यांच्या कन्येने अधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर कृषिमंत्र्यांनी मी सर्व कामकाज पुण्याला येऊन समजावून घेईन, असे सांगितले.
यावेळी राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक उपस्थित होते. कृषिमंत्र्यांनी तोच धागा पकडून मला गुणनियंत्रण विभागाची गुणवत्तादेखील तपासून पाहावी लागेल, असे स्पष्ट शब्दात सांगून टाकले. त्यामुळे अधिकारी अवाक झाले. त्यानंतर काही मिनिटातच ही भेट संपुष्टात आली.
गुणनियंत्रण विभागातील भानगडींविषयी यापूर्वीच कोणीतरी कृषिमंत्र्यांना गोपनीय घडामोडींची माहिती दिल्याचा निष्कर्ष आता आयुक्तालयातील अधिकारी काढत आहेत. एका संचालकाने सांगितले की, आमच्या दृष्टीने ही भेट चांगली झाली. पहिल्याच भेटीत सविस्तर चर्चा होणे अपेक्षितही नव्हते.
दुसऱ्या एका संचालकाने सांगितले की, कृषी खात्याच्या आधीच्या सर्व घडामोडी कृषिमंत्र्यांनी समजावून घेतल्या आहेत. ते स्पष्टवक्ते आहेत. शेतकरीभिमुख निर्णय घेणारे आहेत. त्यामुळे कोणत्याही थातुरमातुर योजना कागदोपत्री तयार करायच्या आणि पैसे लाटण्याचे दिवस आता संपले आहेत. नवे सरकार तसेच कृषिमंत्रीही घोटाळेबाजांना पाठीशी घालतील, असे सध्याचे तरी चित्र नाही.
गुणनियंत्रण विभागात उलथापालथी होणार
वर्षानुवर्षे गुणनियंत्रण विभागात चिकटून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम मुंबईत सुरू झाले आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले. “संशयास्पद कामे करणारे, तक्रारी असलेल्या तसेच गुणनियंत्रण संलग्न पदांभोवती वर्षानुवर्षे वेटोळे घालून बसलेले अधिकारी या यादीतून नजरेला येतील. त्यांना हटविले जाईल, असे आम्हाला वाटते. मात्र, तसे न होता केवळ यादी तयार झाली तर ‘गुणनियंत्रण’मधील आधीचा कारभार बरा होता, असे म्हणण्याची वेळ येईल, असेही हा अधिकारी म्हणाला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.