Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar: निवडणुकीत ५० टक्के महिलांना निवडून द्या

Women Empowerment: ‘‘येत्या काळात राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुका आहेत. या वेळी पन्नास टक्के महिलांना निवडून द्यावे. महिलांना संधी मिळाल्यास त्या कर्तृत्व दाखवतात. महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय आपल्याला यशस्वी करायचा आहे.’’

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: ‘‘येत्या काळात राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुका आहेत. या वेळी पन्नास टक्के महिलांना निवडून द्यावे. महिलांना संधी मिळाल्यास त्या कर्तृत्व दाखवतात. महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय आपल्याला यशस्वी करायचा आहे,’’ असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार गट) २६ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी (ता. १०) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे घेण्यात आला. या वेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, अरुण गुजराती, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे खजिनदार व ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत टकले, खासदार सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, अमोल कोल्हे, नीलेश लंके, धैर्यशील मोहिते, फौजिया खान, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, माजी आमदार राजेंद्र टोपे, माजी खासदार वंदना चव्हाण आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की पक्षात फूट पडेल असे वाटत नव्हते, पण पडली. विचारात अंतर पडले त्यामुळे फूट पडली. कोण गेले याची चिंता करू नका. एकसंध राहा. जनतेशी बांधिलकी कायम ठेवा काहीच अडचण येणार नाही. आता पुढील तीन महिने फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करा. निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल. त्यामुळे चिंता करू नका, अशा शब्दात कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला.

‘‘राष्ट्रवादीच्या लोकांना जनतेने संधी दिली. यातून लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबातल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळाल्यानंतर तोही कर्तृत्व दाखवू शकतो. राज्य चालवू शकतो. सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी कष्ट केले, ते आर. आर पाटील आज हयात नाहीत. ते एका सामान्य कुटुंबातून आले होते. जेव्हा मला त्यांच्याबद्दल सांगण्यात आले, तेव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली.

माझ्या लक्षात आले, त्यांच्यात कर्तृत्व आहे. त्यातूनच त्यांना संधी मिळत गेली. ग्रामविकास खाते मिळाले. नंतर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री या पदांवर त्यांनी काम केले. आज तुम्हा सगळ्यांच्या कष्टातून, बांधिलकीतून पक्षाची प्रतिष्ठा वाढली आहे. १९८० मध्ये सत्ता गेली. निवडणुका आल्या. ५० ते ५२ जण निवडून आले. नंतर फक्त सहाच शिल्लक राहिले. त्यानंतरच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची संख्या ७२ झाली,’’ असेही शरद पवार यांनी सांगितले. सोहळ्यात प्रशांत जगताप यांनी प्रास्ताविक व आभार मानले.

राजीनाम्याचे संकेत देताच कार्यकर्त्यांचा गोंधळ

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, की मला पवार साहेबांनी अनेक संधी दिल्या. प्रदेशाध्यक्ष म्हणून सात वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे. पक्ष २७ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे.

देशपातळीवर या पक्षाने मोठे योगदान दिले आहे. जयंत पाटलांनी कार्यमुक्त करण्याचे संकेत दिल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. जयंत पाटील यांनी ‘नव्यांना संधी द्या’ असे म्हणताच कार्यकर्त्यांनी ‘नाही नाही’ म्हणून गोंधळा केला. त्यावेळी जयंत पाटलांनी ‘शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे,’ असे म्हणत भाषण थांबवले.

‘देशाच्या आजूबाजूचे वातावरण चिंताजनक’

राष्ट्रहिताच्या आड राष्ट्रवादी पक्ष कधीच येत नाही. पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही सरकारवर टीका केली नाही. सरकारच्या भूमिकेचे समर्थन करू असे तेव्हा सांगितले होते. देशाचे चित्र पाहिले तर काश्मीरच्या वरच्या भागात चीन, शेजारी पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका देश आहेत. आजूबाजूचे देश आणि आपण यात काय स्थिती आहे. कोणाशीच संबंध चांगले राहिलेले नाहीत. पंडित नेहरूंच्या काळात सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा भारत होता. बांगलादेशही भारताचा मित्र राहिलेला नाही. श्रीलंकेवरील चीनचा प्रभाव चिंताजनक आहे. याचा अर्थ देशाच्या नेतृत्वाने सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक केली नाही. आम्ही यात राजकारण आणणार नाही. पण आता देशाच्या हितासाठी स्पष्ट भूमिका घ्याव्यात, असे शरद पवार यांनी सांगितले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT