Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पातून कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार डाव्या कालव्यातून उन्हाळी पहिले आवर्तन शनिवारपासून (ता. १) सुरू करण्यात आले आहे. उजव्या कालव्यातूनही १५ मार्चपासून पाहिलं आवर्तन सुरू होणे अपेक्षित आहे.
या वर्षी जायकवाडी धरणामध्ये २१७१ दलघमी (७६ टीएमसी) म्हणजे प्रकल्पाच्या क्षणातेनुसार १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे प्रकल्पावरून सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना ३१ जुलै २०२५ अखेरपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या नियोजनाला मूर्त रूप देण्यात आले.
नियोजनानुसार प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी हंगामात ३ पाणी आवर्तन देण्यात आली. त्यासाठी ४८५ दलघमी पाणी वापर झालेला आहे. उन्हाळी हंगामात ३ पाणी आवर्तन व आवश्यक असल्यास चौथे आवर्तन देणे प्रस्तावित आहे. सोबतच जालना जिल्ह्यातील अतिरिक्त सिंचनासाठी पश्चिम वाहिन्याचे पाणी आल्यानंतर विचार करण्यात येईल.
जायकवाडी डाव्या कालव्याची विशेष दुरुस्ती प्राधान्याने प्रथम टप्प्यात घेण्यासाठी निर्णय घेण्यात येईल असे नुकत्याच पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले होते. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार शनिवारी (ता. १) उन्हाळी पहिले आवर्तन सुरू झाले.
२५ दिवस हे पहिले आवर्तन चालणार आहे. त्यानंतर दुसरे आवर्तन एक एप्रिलपासून सुरू होईल. ते पुन्हा २५ दिवस चालेल. त्यानंतर पुन्हा तिसरे आवर्तन मे महिन्यात एक तारखेला सुरू होईल. ते पुन्हा २५ दिवस चालेल असे नियोजन असल्याची माहिती प्रकल्प प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. उन्हाळ्यात डाव्या कालव्यावरून सुमारे ४२ हजार हेक्टर तर उजव्या कालव्यावरून पंधरा हजार हेक्टर मिळून सुमारे ५७ हजार हेक्टर क्षेत्र सिचित होणे अपेक्षित आहे.
जायकवाडी प्रकल्पाचे महत्त्व
मराठवाड्यात सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या जायकवाडी प्रकल्पाचे काम १९६५ मध्ये सुरू होऊन १९७४ मध्ये पूर्ण झाले. प्रत्यक्षात सिंचनाची सुविधा १९७५-७६ पासून सुरू झाली. जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा २०८ किलोमीटर लांबीचा, तर उजवा कालवा १३२ किलोमीटर लांबीचा आहे. डाव्या कालव्यावर १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर, तर उजव्या कालव्यावर ४१ हजार ६८२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे.
डाव्या कालव्यावरील अपेक्षित सिंचन क्षेत्रात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ९७ हजार ४४० हेक्टर, जालन्यात ३६ हजार ५८० हेक्टर तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७६२० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. त्याचप्रमाणे उजव्या कालव्यावर बीड जिल्ह्यातील ३७ हजार ९६० हेक्टर, अहिल्यानगरमधील २२९० हेक्टर, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ११३२ हेक्टर क्षेत्र सिचित होणे अपेक्षित आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.