डॉ. आदिनाथ ताकटे
Rabi Crop : सद्यःस्थितीत पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रब्बी पिकाच्या संवेदनशील अवस्थेमध्ये सिंचनाचे काटेकोर नियोजन करावे. शक्यतो तुषार सिंचन पद्धतीने सिंचन करण्यास प्राधान्य द्यावे. रब्बी पिकांना वाढीच्या संवेदनशील अवस्थेत योग्य प्रमाणात पाणी दिल्यास पीक उत्पादनवाढीसाठी फायदा होतो.
हरभरा
जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीत ओलावा कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे.
बागायती हरभऱ्यास मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे.
भारी जमिनीकरिता पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात. त्यासाठी ३० ते ३५ दिवसांनी पहिले व दुसरे ६० ते ६५दिवसांनी पाणी द्यावे.
पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा कुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते.
हरभरा पिकास तुषार सिंचनाने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात चांगली वाढ होते. प्रमाणशीर पाणी दिल्यामुळे मूळकुज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.
हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ सें. मी. पाण्याची आवश्यकता असते. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर (७ ते ८ सें.मी.) देणे महत्त्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो. जमिनीच्या मगदुरानुसार व खोलीनुसार पाण्याच्या पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार भेगा पडू देऊ नयेत.
हरभरा पिकास एक पाणी दिल्यास ३० टक्के, दोन पाणी दिल्यास ६० टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ मिळते.
गहू
बागायती गव्हासाठी जमिनीच्या मगदुरानुसार पाणी व्यवस्थापन करावे. पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत पाणी देणे फायदेशीर ठरते.
भारी जमिनीकरिता १८ दिवसांच्या अंतराने ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
मध्यम जमिनीसाठी १५ दिवसाच्या अंतराने ७ पाळ्या द्याव्यात.
हलक्या जमिनीस १० ते १२ दिवसाच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात.
जर एकच पाणी देण्याइतके पाणी उपलब्ध असेल, तर पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी पाणी द्यावे.
दोन पाणी देण्याइतके पाणीसाठा उपलब्ध
असेल, तर पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
तीन पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असेल, तर पहिले पाणी २० ते २२ दुसरे ४२ ते ४५ व तिसरे ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
महत्त्वाच्या अवस्था
मुकुटमुळे फुटण्याच्या वेळ ः पेरणीनंतर २५ दिवसांनी
फुटवे फुटण्याची अवस्था ः पेरणीनंतर ५५-६० दिवसांनी
पीक फुलोऱ्यात येणे ः पेरणीनंतर ७०-८० दिवसांनी
दाण्यात चिक भरण्याची वेळ ः पेरणीनंतर ९०-१०० दिवसांनी
दाणे टणक होण्याची अवस्था ः पेरणीनंतर ११० दिवसांनी
मका
मका पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये
पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते. त्यासाठी पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थांमध्ये पाण्याचे काटेकोर नियोजन करावे.
मका पिकाला पाणी देण्याचे
महत्त्वाच्या अवस्था
पहिले रोप अवस्था (२५ ते ३० दिवसांनी)
दुसरे तुरा बाहेर पडताना (४५ ते ५० दिवसांनी)
तिसरे फुलोऱ्यात असताना (६० ते ६५ दिवसांनी)
चौथे दाणे भरण्याच्या वेळी (७५ ते ८० दिवसांनी)
सूर्यफूल
सूर्यफुलाच्या पिकाच्या एकूण चार संवेदनशील अवस्था आहेत. रोप अवस्था, फुलकळी अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था या संवेदनशील अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नये.
फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहून उत्पादनात घट येते.
करडई
करडई हे पीक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे या पिकाच्या वाढीस पाणी कमी लागते. मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास करडईच्या पिकास पेरणीनंतर पाणी देण्याची गरज भासत नाही.
कालांतराने ओलावा कमी झाला आणि पाणी देण्याची सोय असेल, तर पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी जमिनीस तडे जाण्यापूर्वी एक संरक्षित पाणी देणे अधिक चांगले.
दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात येताना ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.
पिकास पाण्याचा जास्त ताण पडू देऊ नये. तसेच भेगा पडल्यानंतर पाणी दिले असता, पाणी जास्त प्रमाणात जमिनीत मुरते. जास्त पाण्यामुळे पीक मोठ्या प्रमाणात मर रोगास बळी पडते. म्हणून करडई पिकास हलके पाणी द्यावे.
ज्वारी
रब्बी ज्वारी हे कोरडवाहू पीक म्हणून ओळखले जाते. या पिकास तयार होण्यासाठी ११० ते १२० दिवसांचा कालावधी लागतो. अधिक धान्य व कडबा उत्पादन घेण्यासाठी ज्वारी पिकाला पाण्याची गरज असते.
बागायती ज्वारीस दिलेल्या एकूण पाण्यापैकी ७० टक्के पाणी हे जमिनीच्या पहिल्या ३० सें.मी. थरातून, १६ टक्के पाणी दुसऱ्या थरातून, ९ टक्के पाणी तिसऱ्या थरातून आणि उरलेले ५ टक्के पाणी चौथ्या थरातून मिळते. पहिल्या ३० सें.मी. थरांत पिकाची ६० टक्के पेक्षा जास्त मुळे असतात. त्यामुळे या थरातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भागविली जाते.
बागायती रब्बी ज्वारीस पीक वाढीच्या महत्त्वाच्या चार अवस्थेत पाणी देणे फायदेशीर ठरते. मात्र भारी, काळ्या खोल जमिनीत पहिल्या तीन अवस्थांमध्येच पाणी द्यावे.
पाणी देण्याच्या अवस्था
जोमदार वाढीचा काळ ः पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी
पीक पोटरीत असताना ः पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी
पीक फुलोऱ्यात असताना ः पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी
कणसात दाणे भरण्याचा काळ ः पेरणीनंतर ९० ते ९५ दिवसांनी
कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाण्याची सोय असल्यास पीक गर्भावस्थेत असताना, पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना ५० ते ५५ दिवसांनी सिंचन करावे.
दोन पाणी देणे शक्य असल्यास, वरील दोन्ही नाजूक अवस्थेत पाणी द्यावे.
बागायती ज्वारीस मध्यम जमिनीत तिसरे पाणी पीक फुलोऱ्यात असताना, पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी आणि कणसात दाणे भरताना ९० ते ९५ दिवसांनी द्यावे.
भारी जमिनीत ज्वारीला चौथ्या पाण्याची गरज भासत नाही.
- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.