Fodder Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Scarcity : नाशिक जिल्ह्यात चाराटंचाईची धग वाढली

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना चाराप्रश्न मात्र गंभीर होत चालला आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामातील साठवलेला चारा तुलनेत कमी आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात तीन लाख ७० हजार टन चारा उपलब्ध आहे. हा चारा जूनअखेर पुरेल इतकाच आहे. सिन्नर, चांदवड, येवला, नांदगाव या भागात चाऱ्याची सर्वाधिक टंचाई आहे. त्यामुळे या तालुक्यात पशूधन सांभाळावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. एकीकडे चाराटंचाई तर दुसरीकडे पाणीटंचाई, अशी संकटे पशुपालकांसमोर आहेत.

जिल्हयातील धरणांमध्ये जेमतेम २४ टक्यांपेक्षा कमी साठा शिल्लक आहे. यातच जिल्हयाचे तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचल्याने उन्हाच्या झळा आणि उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवनही वाढले आहे. परिणामी स्थानिक जलस्रोत कमी पडू लागल्याने ग्रामीण भागात टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पुरेसा पाऊस नसल्याने गतवर्षापासून जिल्हयातील काही गावांना टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. सद्यस्थितीत ३४८ गावे अन ८७२ वाडयां अशा एकूण १२२० गाव-वाडयांना ३७० टॅंकरच्या ८१४ फे-यांव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे.

कमी पर्जन्यमानामुळे चारा पिके कमी झाल्याने जूनअखेर चारा पुरेल अशी परिस्थिती जिल्हयात आहे. कोरड्या चाऱ्याची थोडीफार प्रमाणात उपलब्धता आहे. तर, हिरव्या चाऱ्याची सर्वाधिक टंचाई जाणू लागली आहे. त्याचा सामना दुष्काळीपट्ट्यातून पाण्याच्या भागात येणाऱ्या मेंढपाळांनाही करावा लागत आहे. त्यामुळे गोदाकाठ परिसरातून चाऱ्याची उपलब्धता केली जात आहे. खरीप हंगामात पिकांची काढणी झाल्यानंतर चारा वापरला गेला.

रब्बी हंगामातील लागवडीखालील पीक क्षेत्रात घट झाली. या परिस्थितीत चाऱ्याची अपेक्षित उपलब्धत होऊ शकलेली नाही. प्रशासनाने चारा बियाणे देऊन चारा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. यात ३ लाख ३६ हजार ९७६ मेट्रीक टन चारा उपलब्ध झालेला आहे. सद्यस्थितीत ३ लाख ७० हजार मेट्रीक टन चारा शिल्लक आहे. या चारा जून महिन्यांपर्यंत पुरेल.

दुष्काळी तालुके असलेल्या सिन्नर, नांदगाव आणि येवला तालुक्यात तर महिनाअखेरीस चाराटंचाई अधिक जाणवणार आहे. येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यातही जूनच्या पंधरवाडयापर्यंत पुरेल इतका चारा शिल्लक आहे. त्यामुळे येथील शेतक-यांना शेजारच्या नगर जिल्ह्यात चाऱ्यासाठी शोधाशोध सुरू आहे. जून महिन्यात वेळात पाऊस न झाल्यास जिल्हयात चारा टंचाई निर्माण होऊ शकते.

चाऱ्याचे भाव कडाडले

यंदा कमी पावसामुळे खरीप व रब्बी हंगामात अपेक्षित चारा उपलब्ध झाला नाही. परिणामी चा-यांची टंचाई आहे. त्यामुळे बाजारात चा-याचे भाव कडाडलेले आहे. उसाचा भाव २ हजारांरून ३ हजार ५०० ते ४ हजार रूपये टन झाला आहे. हिरवा मका चारा दोन हजारांहून ३ हजारावर, कसमादे कांदा काढणी पश्चात पातीचे भाव प्रती ट्रॉली ३ हजार ते ४ हजार रुपयांवरतर, ज्वारीचा कडबा १ हजार ५०० रूपये शेकड्यावरून २ हजार ५०० ते २ हजार ८०० रुपयांवर पोहचले आहे.

जादा चाऱ्यासाठी तरतूद

जिल्हयात सर्वाधिक जास्त चारा त्र्यंबकेश्वर, सटाणा दिंडोरी या भागात आहे. त्यासाठी ८० हजार ३५० किलो मका बियाणे, १७ हजार ३५२ किलो ज्वारी बियाणे, १४ हजार किलो बाजरी व १६ हजार ६६५ किलो संकरित मका बियाणे समावेश आहे. यापासून अतिरिक्त चारा उपलब्ध होईल, तो जुलैपर्यंत पुरेल असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.

पाऊस थोडा लांबला तरी गडबड

पशुसंवर्धनच्या माहितीनुसार, जिल्ह्यात प्रतिदिन चाऱ्याची गरज ६,८९७ टन इतकी आहे. प्रति महिना पशुपालकांना अंदाजे १ लाख ८६ हजार १५० मेट्रीक टन चारा लागतो. नांदगाव, सिन्नर व चांदवड तालुक्यांमध्ये पशुधनासाठी केवळ महिनाभर पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. जिल्ह्यात ३ लाख ७० हजार टन इतका चारा उपलब्ध असून, तो साधारणतः २० जूनपर्यंत पुरेल इतका आहे. पाऊस लांबला तर चाऱ्याची टंचाई गंभीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून २ कोटी ३० लाख रुपयांचे चारा बियाणे १५ हजार २९९ पशुपालकांना मोफत वितरित केले आहे. त्यातून ३ लाख ४० हजार टन उपलब्ध होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात चाराबंदी

जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहण्यासाठी चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली. त्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. आगामी दोन महिन्यांच्या कालावधीसाठी हा आदेश देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT