Dhananjay Munde: कृषी खात्यात आणखी एक मोठा घोटाळा? धनंजय मुंडे यांच्यावर १६९ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
Pune News: धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना १६९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. या घोटाळ्याच्या चौकशीची मागणीही धस यांनी केली. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याच्या चर्चेलाही खीळ बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी राळ उडवून दिली आहे. माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी खात्यातील साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. यापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
साहित्य खरेदी प्रकरणात मुंडे यांना न्यायालयाने नुकतीच क्लीन चिट दिली होती. मात्र, आता सुरेश धस यांनी नव्याने 169 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा दावा करत या प्रकरणाची स्वतंत्र SIT (विशेष तपास पथक) चौकशीची मागणी केली आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा प्रवेशाच्या चर्चांना खीळ बसण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्री असताना त्यांच्या खात्यात 169 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या मते, कृषी खात्यातील काही अधिकाऱ्यांनी तब्बल 78 बोगस कंपन्या स्थापन केल्या आणि त्याद्वारे खतांचे लिंकिंग केले गेले. या कंपन्यांकडूनच खते खरेदी करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा दावा धस यांनी केला आहे.
त्यांनी यासंदर्भात कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्रा देसाई यांना पत्र लिहून SIT चौकशीची मागणी केली आहे. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही ही मागणी लावून धरली आहे.धनंजय मुंडे यांना साहित्य खरेदी प्रकरणात न्यायालयाने क्लीन चिट दिली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात पुनरागमनाचे संकेत दिले होते.
मात्र, सुरेश धस यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत नव्या आरोपांमुळे मुंडे यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. धस यांनी केवळ घोटाळ्याचा दावा केलेला नाही, तर कृषी खात्याच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी खात्याच्या बैठका आणि निर्णय प्रक्रिया वाल्मिक कराड हेच हाताळत होते. धस यांनी कराड यांच्यावरही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
घोटाळ्याच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह
सुरेश धस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांवरही आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, चौकशी प्रक्रिया निष्पक्षपणे होण्यासाठी स्वतंत्र SIT ची स्थापना करणे गरजेचे आहे. त्यांनी असा दावाही केला आहे की, DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीला डावलून अनेक चुकीचे निर्णय घेण्यात आले.
बोगस कंपन्यांमार्फत खतांचे लिंकिंग आणि खरेदी यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, याची सखोल चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.सुरेश धस यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विरोधकांनीही मुंडे यांना मंत्रिमंडळात परत घेऊ नये, अशी मागणी लावून धरली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.