
Agriculture Success Story:
शेतकरी नियोजन । पीक : डाळिंब
शेतकरी : अमोल अनंतराव जगदाळे
गाव : चिंचगाव, ता. माढा, जि. सोलापूर
एकूण शेती : १५ एकर
डाळिंब क्षेत्र : आठ एकर
एकूण झाडे : ५००० झाडे
सोलापूर जिल्ह्यातील चिंचगाव (ता. माढा) येथे अमोल अनंतराव जगदाळे यांची १५ एकर शेती आहे. त्यामध्ये आठ एकरांवर डाळिंब बाग असून त्यात सुमारे ५ हजार झाडे आहेत. आगामी काळात उर्वरित क्षेत्रामध्ये देखील डाळिंब लागवड करण्याचे त्यांचे नियोजन आहे. सिंचनासाठी शेतात एक विहिर आणि ३ बोअरवेल आहेत. २०२१ पासून अमोल शेती करत आहेत. बंधू अभय आणि आई विमल जगदाळे यांच्यासह पत्नी, भावजय, ३ मुले असे अमोल जगदाळे यांचे एकत्रित कुटुंब आहे.
अमोल यांनी शेतीमध्ये लक्ष देण्यास सुरुवात केल्यापासून डाळिंब उत्पादनात सातत्य राखले आहे. मुख्यतः हवामानातील बदलाचा विचार करत बागेत नियोजनावर भर दिला जातो. त्यामुळे दर्जेदार डाळिंब उत्पादन मिळविण्यात अमोलराव यशस्वी झाले आहेत.
नियोजनातील बाबी
आठ एकरांतील संपूर्ण लागवडीसाठी भगवा वाणाची निवड करण्यात आली आहे. दोन ओळींत १३ फूट, तर दोन रोपांत ८ फूट अंतर राखत डाळिंब लागवड केली आहे. दरवर्षी बागेत आंबिया बहरातील फळांचे उत्पादन घेतले जाते.
मागील हंगामातील फळ तोडणी पूर्ण झाल्यानंतर बाग ताणावर सोडली जाते. हा ताण डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारी पहिल्या आठवड्यात तोडला जातो.
वातावरणातील बदलानुसार रासायनिक फवारणी, अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन केले जाते.
बागेतील झाडांचे नियमित निरिक्षण करून आवश्यकतेनुसार रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारणीचे नियोजन केले जाते.
बागेतील अतिरिक्त फुटींची छाटणी करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत मिळते. त्याचा झाडांच्या वाढीसह फळांची गुणवत्ता आणि आकार चांगली मिळविण्यास मदत होते.
बागेत वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन सिंचनाचे काटेकोर नियोजन केले जाते.
बागेत तेलकट डाग आणि बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे फळांच्या उत्पादनावर परिणाम होतो. त्यासाठी बागेचे नियमित निरीक्षण करून वेळीच शिफारशीत घटकांच्या प्रतिबंधात्मक फवारण्या घेण्यावर भर दिला जातो.
डाळिंब बाग व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय
आणि रासायनिक अन्नद्रव्यांची सांगड
घालून खत व्यवस्थापन करण्यास प्राधान्य दिले जाते. त्याचा झाडांच्या वाढीस आणि जमिनीचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत मिळते.
डाळिंब फळांचे सेटिंग होण्यास सुरुवात झाल्यानंतर क्रॉप कव्हरचा वापर केला जातो. यामुळे अवकाळी पाऊस आणि वाढत्या तापमानापासून फळांचे संरक्षण होण्यास मदत मिळते. क्रॉप कव्हरचा वापर केल्यामुळे डाळिंब फळांची गुणवत्ता, प्रत उत्तम राहण्यास मदत मिळते.
मागील १५ दिवसांतील कामे
सध्या बागेत डाळिंब फळांची चांगली सेटिंग झालेली आहे.
गेल्या पंधरवड्यात ०ः४२ः४७ आणि ०ः३८ः३४ या खतांचा चार दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून वापर केला आहे.
त्यानंतर चार दिवसांनी एकरी एक किलो
प्रमाणे कॅल्शिअम नायट्रेट आणि २५० ग्रॅम
बोरॅान ड्रीपद्वारे सोडण्यात आले. डाळिंब
फळांच्या फुगवणीसाठी यांचा वापर करण्यात आला.
डाळिंब फळांचा रंग, आकार आणि दर्जा उत्तम राखण्यासाठी शिफारशीत रासायनिक घटकांच्या फवारण्या घेण्यात आल्या आहेत. पावसाची उघडीप पाहून फवारणीचे नियोजन केले.
आगामी नियोजन
सध्या बाग काढणीच्या टप्प्यात असल्यामुळे अन्नद्रव्यांची मात्रा आलटून-पालटून देणे चालू आहे. त्यात ०ः४२ः४७, ०ः३८ः३४ आणि पोटॅशयुक्त खतमात्रा एकरी प्रत्येकी पाच किलो प्रमाणात दर चार दिवसांनी आलटून-पालटून दिली जातील.
फळांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळांचा दर्जा खालावण्याची शक्यता असते. त्यासाठी शिफारशीत रासायनिक बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाईल.
वाफसा स्थिती आणि पावसाचा अंदाज घेऊन सिंचनाचे नियोजन केले जाईल.
पुढील आठवड्यात बागेवरील क्रॉप कव्हर काढले जाईल. त्यानंतर साधारण आठ दिवसांनी डाळिंब फळ तोडणीस सुरुवात होईल.
- अमोल जगदाळे, ९९७०३१३१९९
(शब्दांकन : सुदर्शन सुतार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.