Agriculture Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : विजेचा लपंडाव, शेतकरी मेटाकुटीस

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात अनेक गावांत विजेची समस्या आहे. दिवसा सुरळीत किंवा सलग सहा तासही वीज कृषिपंपांना मिळत नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे वीजबिलांचा भार मात्र वाढत आहे. जेवढा वीजवापर केला जातो, तेवढी विजबिले मिळत नाही, अशी ओरड शेतकऱ्यांमध्ये कायम आहे.

सध्या रब्बीसह उन्हाळ पिके शिवारात आहेत. त्यात मका, गहू, संकरित किंवा सुधारित ज्वारी, हरभरा आदी पिके आहेत. केळी, कलिंगड, खरबूज व अन्य फळ-भाजी पिकांसह वेलवर्गीय पिकेही शिवारात असून, उष्णता वाढत आहे. कमाल तापमानात मागील काही दिवसांत वाढ झाली आहे. यामुळे शिवारात पिकांना पाण्याची गरजही अधिक आहे.

सध्या कृषिपंपांना चार दिवस दिवसा व दोन दिवस रात्री वीजपुरवठा केला जातो. दिवसा वीजपुरवठा आठवडाभर करण्याचे मध्यंतरी शासनातील लोकप्रतिनिधी व अन्य मंडळींनी म्हटले होते. परंतु दिवसा सलग सात दिवस मिळतच नाही. चार दिवस दिवसा कृषिपंपांना वीज दिली जाते. परंतु यातही मध्येच वीजपुरवठा खंडित होतो. दिवसा किमान आठ तास वीज देण्यासंबंधीचे परिपत्रक वीज कंपनीचे आहे. परंतु सहा तासही वीज कृषिपंपांना दिवसा मिळत नाही.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, यावल, रावेर, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव, धुळ्यातील शिरपूर, साक्री, शिंदखेडा, धुळे, नंदुरबारातील शहादा, तळोदा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा आदी सर्वच भागांत विजेची समस्या कृषिपंपांबाबत आहे.

चोपडा तालुक्यातील मंगरूळ, वर्डी, लोणी, पंचक या भागात विजेचा भार अधिक असल्याचे सांगून दोन ते तीन दिवस शिवारातील वीज बंद केल्याचा प्रकार घडला होता. याबाबत शेतकरी व काही राजकीय व्यक्तींनी वीज कंपनीच्या स्थानिक कार्यालयात जाऊन समस्या तत्काळ दूर करा किंवा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जा, असा इशारा दिला होता. असाच प्रकार इतर गावांत रोज होत आहे.

केळी, गहू, मका निसवली आहे. त्यांना पाणी व्यवस्थित न मिळाल्यास मोठी हानी होऊ शकते. अशात काही केळी उत्पादक ट्रॅक्टरचलित जनित्राच्या मदतीने कृषिपंपांना वीज उपलब्ध करून देत असून, त्यासाठी त्यांना रोज पाच ते सहा हजार रुपये खर्चही इंधनावर करावा लागत आहे.

उष्णता वाढताच, तकलादूपणा सुरू

गावोगावच्या शिवारांत कृषिपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या वीजतारा खराब झाल्या आहेत. त्यात ३५ ते ३७ वर्षे तशाच असून, त्यांची दुरुस्ती केलेली नाही. रोहित्र, फ्युजपेट्या, केबलच्या अडचणी आहेत. वीज कंपनीचे कर्मचारी दुरुस्तीला येत नाहीत.

शेतकऱ्यांना खासगी कर्मचाऱ्याची मदत घेऊन दुरुस्ती करून घ्यावी लागते. यात पैसे खर्च होतात. यातच उष्णता जशी सुरू झाली, तसा वीज कंपनीचा तकलादूपणाही सुरू झाला आहे. कुणी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूनच घेत नाही, अशा तक्रारीदेखील शेतकरी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT