Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : नाशिक जिल्ह्यात सणासुदीला अतिवृष्टीमुळे पिकांची दैना

मुकुंद पिंगळे

मुकुंद पिंगळे : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nashik News: तोंडावर दसऱ्याचा सण आणि येणारी दिवाळी शेतकऱ्यांची सुगीची लगबग सुरू होती. अशातच अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कष्ट पाण्यात गेल्याची भयाण वास्तव सटाणा, मालेगाव तालुक्यात दिसून येत आहे.

सोंगलेली मक्याची कणसे पाण्यावर तरंगत आहेत. तर लेट खरीप कांदा लागवडी व रब्बी कांदा रोपवाटिकांचे नुकसान आहे. अस्मानीने तोंडचे पाणी पळाले आहे, तर सणासुदीला अतिवृष्टीमुळे पिकांची दैना झाल्याचे शिवारातील चैतन्य गेले आहे. खरिपाच्या अंतिम टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मालेगाव, सटाणा तालुक्यांत शेती पिकांचे अतोनात नुकसान आहे.

सर्वाधिक नुकसान मका, लेट खरीप कांदा, कांदा रोपवाटिका, सोयाबीनचे आहे. कुठे कांदा रोपे वाहून गेले, तर कांदा लागवडी पाण्याखाली तर कुठे मक्याची कणसे पाण्यात तरंगत असल्याचे भीषण चित्र पाहायला मिळत आहे. पिके जोमदार असताना झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान वाढल्याने शेतकरी तणावात आहेत.

शेतातून वाहिलेल्या जोरदार प्रवाहाबरोबर कांदे रोपे वाहून गेली. मालेगाव तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला. ज्यामध्ये मालेगाव, दाभाडी, वडनेर, करंजगव्हाण, कौळाने, सौंदाणे, सायने, अजंग, जळगाव निंबायती, निमगाव या महसूल मंडलांत सर्वाधिक नुकसान आहे.

मक्याची कणसे व चारा भिजल्याने जनावरांना चारा कुठून आणायचा? आता दिवाळी कशी करायची? अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. यंदा पाणीपाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांनी महागडे कांदा बियाणे घेऊन रोपवाटिका तयार केल्या.

मात्र अतिवृष्टीच्या तडाख्यात रब्बी कांदा रोपवाटिका मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत. त्यामुळे लागवडीवर संभाव्य मोठा परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांवर दुबार रोपनिर्मितीची वेळ आली आहे. त्यातच बियाण्यांच्या तुटवड्याचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर आहे.

सटाणा तालुक्यात मोसम व करंजाडी या दोन्ही खोऱ्यात नुकसान अधिक आहे. पिंगळवाडे येथील शेतकरी अरुण भामरे यांच्या शेतात पाण्याचा जोरदार प्रवाह शिरल्याने डाळिंबाच्या लागवडीतील भर लावलेली माती वाहून गेल्याने जमातीतील खोलवरील मुळ्या उघड्या पडल्या आहेत.

टाकलेले भरखते, सेंद्रिय आच्छादन व शेती साहित्य वाहून गेले. तर पाइपलाइन उघडी पडली आहे. द्राक्ष उत्पादकांची धाकधूक वाढली कसमादे भागात पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन घेतले जाते. या भागात माल काढणीसाठी येत आहे.

तर काही ठिकाणी द्राक्ष माल पाणी उतरण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र झालेल्या जोरदार पावसामुळे द्राक्ष मालाला तडे जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. तूर्तास नुकसान दिसून आलेले नाही.

परिसरातील ५० टक्के कांदा रोपवाटिकांचे पूर्णतः नुकसान आहे. पावसाच्या संततधारेमुळे अजूनही पंचनामे सुरू नाहीत. वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. सणासुदीला आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची मोठी हानी केली आहे.

- दीपक पगार, नुकसानग्रस्त शेतकरी, उत्राणे, ता. सटाणा

गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पाऊस पडतो आहे. मका पीक हातातून गेले आहे. लागवड केलेल्या खरीप लाल रांगड्या कांद्याचे पीक हातून गेले आहे. पीकविमा कंपनीला पूर्वसूचना देताना ॲप चालत नाही, त्यामुळे पीकविमा कंपन्यांना नुकसान तरी कसे कळवावे. प्रशासकीय यंत्रणा अजूनही बांधावर आलेली नाही. शेतकरी हवालदिल असून अस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटांनी घेरले आहे.

- खेमराज कोर, नुकसानग्रस्त शेतकरी, अंबासन, ता. सटाणा

सरकारी यंत्रणा बांधावर आली, मात्र कणसात दाणे भरले आहेत, तुमची सोंगणी झाली, असे कारण देत पंचनामे करण्यात टाळाटाळ होत आहे. अडचणीच्या काळात अजून संकटात लोटण्याचा प्रकार होत आहे. जनावरांना चारा नाही.

- शैलेंद्र कापडणीस, नुकसानग्रस्त शेतकरी, द्याने, ता. सटाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT