Heat Wave Agrowon
ॲग्रो विशेष

Heat Stroke : जळगावात उष्माघाताचा पशुधनासही फटका

Team Agrowon

Jalgaon News : उष्माघाताची समस्या खानदेशात मागील काही दिवसात वाढली असून, पशुधनासही मोठा फटका बसला आहे. तसेच काही शेतकरी, वृद्धांचाही मृत्यू यात झाला आहे. प्रशासनाने तापमानवाढीची समस्या लक्षात घेऊन दुपारी संचारबंदी लागू केली आहे.

घरात थांबा, असे आवाहन प्रशासन करीत आहे. परंतु शेतीकामे, पशुधनासंबंधीची कार्यवाही सुरूच ठेवावी लागते. चाळीसगाव तालुक्यातील वाघाळी येथे उष्माघाताने ३० मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. ग्रामीण भागात उष्णतेचा प्रकोप अधिक त्रासदायक आहे. कारण शेतात कामे सुरूच आहेत. काम थांबविल्यास पुढे पेरणी, काढणीची कामे वेळेत होणार नाहीत व नुकसान मोठे होईल.

तसेच मेंढ्या, शेळ्यांची चराई शेतातच असते. त्यांना गोठ्यात रोज थांबविणे शक्य नाही. अशात टंचाईदेखील आहे. तलाव, लहान प्रकल्प कोरडे आहेत. जळगाव, धुळे, नंदुरबारातील अनेक गावांत टंचाई तीव्र बनली आहे. यात नाशिक, धुळे, नंदुरबार भागातील अनेक मेंढपाळ बांधव आपल्या मेंढ्या, शेळ्या चराईसाठी खानदेशात घेवून आले आहेत. वाघळी शिवारात विठ्ठल बोरकर हे आपल्या मेंढ्यांच्या कळपासह मुक्कामी होते.

परिसरातील शिवारात चारा होता. त्यावर मेंढ्यांची गुजराण सुरू होती. परंतु तापमान दिवसागणिक वाढले. ते ४७ अंश सेल्सीअसपर्यंत पोचले. याचा मोठा फटका मेंढपाळ बांधव व मेंढ्यांना बसला. वाघळी येथे शेतकरी दगडू बऱ्हाटे यांच्या शेतात मेंढ्या चरत असताना एक मेंढी खाली कोसळली. ही बाब बोरकर यांच्या लक्षात आली. त्यांनी मेंढीला उचलून सावरण्याचा प्रयत्न केला. लागलीच दुसरी मेंढी कोसळली.

एकापाठोपाठ एक अशा ३० मेंढ्यांचा मृत्यू झाला. लागलीच परिसरातील नागरिक, ग्रामस्थ शेतात आले. त्यांनी मेंढपाळ बांधवास धीर दिला. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पंचनामा केला. या वेळी आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले. असाच प्रकार खानदेशातील अन्य भागात होत असून, आतापर्यंत १०० पेक्षा अधिक मेंढ्या, शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. तसेच दूध उत्पादन घटले आहे. गायींना तापमानापासून बचावासाठी गोठ्यांना कुलर सुरू करण्यात आले आहेत. तसेच गोठ्यांभोवती हिरवी नेट, फॉगरही लावले जात आहेत.

पाचोऱ्यात शेतकऱ्याचा मृत्यू

पाचोरा तालुक्यातील लासुरे येथे उष्माघाताने नीळकंठ बाबुराव देवरे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. देवरे यांची एक एकर जमीन आहे. त्यावर ते आपला व कुटुंबियांचा उदरनिर्वाह करायचे. गेले काही दिवस उष्णता प्रचंड वाढली आहे. शेतीकामे करणे अशक्य झाले आहे. खरिपाची चिंता आहे. कारण पाऊस लवकर येईल, असे सांगितले जात आहे.

सकाळी ११ पर्यंत शेतीकामे करून ते घरी परत यायचे. शेतात काम करताना सकाळी १०च्या सुमारास त्यांना घाम आला. ते अस्वस्थ वाटू लागल्याने घरी परतले. डॉक्टरांशी संपर्क सुरू असतानाच त्यांचा घरी मृत्यू झाला. उष्माघाताचा त्यांना फटका बसल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT