ॲग्रोवन वृत्तसेवा
Hailstorm : यवतमाळ ः गारपीट, अवकाळी पावसाने हरभरा, गहू, संत्रा व तूर या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत सहा हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. बाभूळगाव नंतर कळंब व उमरखेड तालुक्यांतील गावांना वादळवाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. बाभूळगाव तालुक्यात १० फेब्रुवारीला गारपीट झाली. यात तब्बल १९ गावांत नुकसान झाले आहे. या भागातील दोन हजार ४९४ हेक्टरला अवकाळीचा फटका बसला.
या भागात नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच रविवारी (ता.११) मध्यरात्री कळंब व उमरखेड या तालुक्यांना गारपीट, अवकाळी पावसाने झोडपले. कळंब तालुक्यात ५५ हेक्टर तर उमरखेड तालुक्यात तीन हजार ३४५ हेक्टरला फटका बसला.
खरीप हंगामातही अतिवृष्टी व त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान उमरखेड तालुक्यातच झाले होते. खरीप, रब्बी व आता उन्हाळी या तीनही हंगामातील पिकांचे पावसाने नुकसान केले. शेतीमाल निघण्याच्या तयारीत असतानाच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही शासनाची मदत मिळालेली नाही. अशातच गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
गहू, तूर, हरभरा तसेच संत्रा निघण्याच्या तयारीत असताना पावसाने मोठा फटका बसला आहे. तीनही तालुक्यात नुकसानीचे क्षेत्र पाच हजार ९८४ हेक्टरच्या वर गेले आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच खचला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे.
दहा दिवसांत अहवाल देण्याचे आदेश
अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत. दहा दिवसांत पंचनामे करून तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.