Sangli News : सांगली जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम वाया गेला. आता रब्बीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सगळी मदार रब्बीवर आहे. परंतु, दुष्काळी भागात परतीच्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी करू लागला आहे. मात्र, पाणीटंचाई आणि पावसाची कमतरता या साऱ्यामुळे रब्बी हंगामातही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगाम पावसाअभावी करपून गेला. ऑगस्टमध्ये ३३ मिलिमीटर इतका पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात ११२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. या महिन्यात सरासरीच्या ८१ टक्के पाऊस झाला.
जिल्ह्यात सप्टेंबरअखेर सामान्यपणे ५१४.४ मिलिमीटर पाऊस होण्याची अपेक्षा असते. परंतु सप्टेंबरअखेर ३५३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरीच्या ६८.७ टक्के म्हणजे यंदा ३२.३ टक्क्यांनी पाऊस कमी झाला आहे.
खरीप हंगाम वाया गेला आहे. आता रब्बीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कृषी विभागाने रब्बीचे नियोजन सुरू केले आहे. रब्बी हंगामात २८ हजार ४८५ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. तर खतांची ३४ हजार ५७२ मे. टन उपलब्धता आहे.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या चार दिवसांत दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यांत पेरणीला पुरेसा पाऊस झाला आहे. त्यामुळे जत, कवठेमहांकाळ, आटपाडी या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीची पेरणी केली आहे.कृष्णा आणि वारणा काठच्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीस सुरुवात केली आहे. वाळवा, शिराळा, मिरज या तालुक्यांत वारणा. कृष्णा नदी वाहते आहे.
सिंचन योजनांमुळे दिसाला मिळणार
जिल्ह्यात दुष्काळी भागातील पाणी टंचाई कमी करण्यासाठी टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ या योजना आहेत. या योजनेवर कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळचा काही भाग आणि जत तालुक्याचा काही भाग अवलंबून आहे.शेतकऱ्यांनी पाणी मागणी आल्यानंतर रब्बीचे आवर्तन सुरू करुन पाण्याचे नियोजनही पाटबंधारे विभाग करणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.