Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

NAFED Soybean Sale: नाफेडकडील तीन लाख टन सोयाबीन विक्रीला मार्ग मोकळा; सरकारचा मोठा निर्णय!

Government Soybean Policy: सरकारने नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेले तीन लाख टन सोयाबीन खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे. ३ मार्चपासून ई-लिलावाच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News: देशात सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात विकले जात आहे. अशातच मध्य प्रदेशमध्ये आधारभूत दराने खरेदी करण्यात आलेल्या तीन लाख ८८ हजार ७९६.२४ टन सोयाबीन खुल्या बाजारात विक्रीचा घाट घालण्यात आला आहे. तीन मार्चपासून या संदर्भातील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र सरकारच्या या भूमिकेमुळे बाजारात आधीच दबावात असलेल्या सोयाबीनच्या दरात अधिक घसरण होईल, अशी भीती सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) व्यक्‍त केली आहे.

नाफेडच्या माध्यमातून हमीभावाने देशभरात सोयाबीनसह इतर शेतीमालाची खरेदी होते. त्यातच मध्य प्रदेशातील लागवड क्षेत्र हे देशात सर्वाधिक आहे. सुमारे ५३ लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर या भागांत सोयाबीनची लागवड होते. आंतरपीक न घेता सलग लागवडीचा पॅटर्न असल्याने थेट हार्वेस्टरने पिकाची काढणी होत असल्याने उत्पादकता खर्चही देशाच्या इतर राज्याच्या तुलनेत कमी आहे.

सोयाबीन उत्पादनाचे हब अशी मध्य प्रदेशची ओळख आहे. उत्पादित शेतीमालाला अपेक्षित दर मिळावा याकरिता नाफेडकडून हमीभावाने खरेदी होते. खरीप हंगाम २०२४ या वर्षात मध्य प्रदेशमध्ये उत्पादित सोयाबीनपैकी तीन लाख ८८ हजार ७९६.२४ हमीभावाने खरेदी करण्यात आले. आता या सोयाबीनची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन मार्चपासून त्या संदर्भातील प्रक्रिया राबविली जाणार आहे. ई-लिलाव पद्धतीने खरेदीदारांना यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने यंदा सोयाबीनला ४८९२ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. परंतु बाजारात सोयाबीनचे व्यवहार ३८०० ते ४००० रुपये प्रती क्‍विंटल या दराने होत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना सोयाबीनला हमीभाव मिळाला नाही. क्‍विंटलमागे ८०० ते १००० रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे.

या कारणामुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. शासनाने हस्तक्षेप करीत सहा हजार रुपये क्‍विंटलचा दर द्यावा, अशी मागणी मध्यंतरी झाली. त्याकरिता मध्य प्रदेशमध्ये आंदोलनाचा मार्गही पत्करण्यात आला. त्यातच आता सरकारकडून नाफेडद्वारा खरेदी केलेल्या सोयाबीनची खुल्या बाजारात विक्री केली जाणार आहे. त्याचा फटका बसत पुन्हा सोयाबीनचे दर गडगडण्याची भीती वर्तविली जात आहे.

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी न करता एकीकडे खरेदी बंद करायची आणि दुसरीकडे विकत घेतलेला माल खुल्या बाजारात आणून दर पाडायचे हे सरकारचे धोरण व्यापारी हिताचे असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्यांचे सोयाबीन विकले गेले नाही त्यांच्याकरिता कोणताच पर्याय शासनाने उपलब्ध करून दिला नाही.
राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
नाफेडद्वारा खरेदी करण्यात आलेले तीन लाख टन सोयाबीन बाजारात आणण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. मध्य प्रदेशात खरेदी केलेले हे सोयाबीन आहे. परंतु सध्या बाजारात मुबलक सोयाबीन असताना हे सोयाबीन उपलब्ध झाल्यास दर पडतील हे वेगळे सांगायला नको. त्यामुळेच सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने १५ जुलैपर्यंत ही विक्री थांबविण्याची मागणी केली आहे.
डॉ. डी. एन. पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT