Chandrapur News : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. गोसेखुर्द धरणाचे ३२ दरवाजे उघडण्यात आले. यामुळे ब्रह्मपुरी, नागभीडसह अन्य काही भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली. धान व अन्य पिके मिळून सहा हजारांहून अधिक हेक्टर पीक बाधित झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र, जून महिन्यात जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही. काही ठिकाणी झालेल्या थोड्याबहुत पावसाच्या भरोवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. मात्र, त्यानंतर पावसाने उसंत दिली. त्यामुळे दुबारपेरणीचे संकट ओढवण्याची स्थिती निर्माण झाली होती.
याचदरम्यान पाऊस झाला. ६ ते १० जुलैदरम्यान जिल्ह्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर होता. ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूर आणि सावली तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. याचदरम्यान गोसेखुर्द धरणाचे ३२ दरवाजे उघडण्यात आले. वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावर असलेल्या लाडज, पिंपळगाव भोसले यासह अन्य काही गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली.
पुराने ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिके पाण्यात होती. काही ठिकाणी धानाचे पऱ्हे वाहून गेले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. आदेश मिळताच कृषी विभाग, महसूल विभागाने पंचनामे करण्याचे काम सुरू केले.
कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार पुरामुळे धानाचे मोठे क्षेत्र बाधित झाले. मूल तालुक्यात २५५ हेक्टर, सावली तालुक्यात ३२५६ हेक्टर, ब्रह्मपुरीत १७५६ हेक्टरवरील धानाचे नुकसान झाले. ७३७ हेक्टर क्षेत्रावरील कापूस, सात हेक्टर सोयाबीन आणि ४३ हेक्टर क्षेत्रातील तुरीचे नुकसान झाले. एकूण सहा हजारांहून अधिक क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
६ ते १० जुलै या कालावधीत पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील १६९ गावे बाधित झाली. त्यात सावली तालुक्यातील ५१ गावांचा समावेश आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील ९६ आणि पोंभुर्णा तालुक्यातील १५ गावांचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
सात हजार ७८१ शेतकऱ्यांना फटका
जुलै महिन्यात चार दिवस पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील ७७८१ शेतकऱ्यांना बसला आहे. सर्वाधिक फटका ब्रह्मपुरी तालुक्यातील ३ हजार ५६९ शेतकऱ्यांना बसला. त्यापाठोपाठ सावली तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यातील ३३७९ शेतकऱ्यांना पुराची झळ बसली. मूल तालुक्यातील ३४२ आणि पोंभुर्णा तालुक्यातील ४९० शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला.
सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार सहा हजार १०४ क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तीन-चार दिवसांत पंचनामे करण्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतरच नुकसानीचा अंतिम आकडा समोर येईल.- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.