Dragon Fruit Flower Agrowon
ॲग्रो विशेष

Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूटमधील फूल, फळधारणेवेळी घ्यावयाची काळजी

Team Agrowon

विजयसिंह काकडे, अमृत मोरडे

Dragon Fruit Management : सध्या ड्रॅगन फ्रूट फळांचा हंगाम सुरू झाला आहे. फळांचा हंगाम साधारणतः जूनमध्ये सुरू होऊन नोव्हेंबरपर्यंत चालतो. एका हंगामामध्ये ५ ते ७ वेळा फुलधारणा होऊन ऋतुमानानुसार कमी-अधिक प्रमाणात फुलधारणा होते.

पावसाचे प्रमाण, वितरण आणि वारंवारता यानुसार हा हंगाम थोडाफार मागे पुढे होतो. ड्रॅगन फ्रूटमधील फुलधारणा ही होणारा पाऊस, त्यामुळे वाढलेली आर्द्रता आणि कमी झालेले तापमान यावर निर्धारित असते.

पाऊस जर नियमित आणि सरासरी एवढा पडला तर फळधारणा चांगली होते, परंतु सरासरीपेक्षा कमी झाला तर फळधारणा कमी होते. फुलधारणा ही झाड आणि फांदीच्या परिपक्वतेवरती अवलंबून असते. सहसा, फुलधारणा होण्यासाठी फांदी कमीत कमी ६ ते ७ महिन्यांची असायला लागते.

एका फांदीवर १ ते १० कळ्या लागतात. परंतु यापैकी एक किंवा दोनच कळ्यांची फळधारणा होईल याची याची काळजी घ्यावी, जेणे करून राहिलेल्या फळांचे आकारमान व वजन व्यवस्थित एकसारखे राहील. एका फांदीवर अधिक प्रमाणात फळे ठेवल्याने आकार व वजन कमी भरते. अशा फळांना कमी दर मिळतो.

अति कळी धारणा झाल्यानंतर त्यांची विरळणी करणे गरजेचे आहे. कळ्यांची विरळणी दोन टप्प्यांमध्ये करतात. जर एका फांदीवर पाच पेक्षा जास्त कळ्या असतील तर कळी अवस्था किंवा फूल उमलून दहा दिवसांनंतर कळ्या खुडाव्यात. दुसऱ्या प्रकारात जर कळ्या कमी असतील (३ ते ५), तर फूल उमलल्यानंतर १० दिवसांनी विरळणी करावी.

ड्रॅगन फ्रूटमध्ये नैसर्गिकरीत्या सुद्धा कळी गळू शकते. म्हणून कमी कळ्या असल्यावर फूल उमलून १० दिवसांनंतर विरळणी केल्याने राहिलेल्या कळ्या टिकतात. नैसर्गिकरीत्या कळी गळण्याची कारणे म्हणजे फांद्यांची परिपक्वता नसणे, एका फांदीवर आवश्यकतेपेक्षा जास्त कळी, तापमान वाढ, परागीभवन न होणे. शक्यतो खूप जवळच्या कळ्यांची विरळणी करावी, जेणे करून राहिलेल्या फळांना वाढण्यासाठी वाव मिळेल.

कळी लागल्यापासून फूल उमलण्यापर्यंत किमान १८ ते २० दिवसांचा कालावधी जातो. कळी उमलल्यापासून फळ परिपक्व होण्यासाठी २५ ते २७ दिवस लागतात, याप्रमाणे कळी निघाल्यापासून फळ परिपक्व होण्यासाठी एकूण अंदाजे ४५ ते ४७ दिवस लागतात.

फूल उमलल्यानंतर एका दिवसाच्या आत सुकून जाते. फळांपुढील सुकलेल्या फुलांचे अवशेष जर काढता आले तर ते काढून टाकावेत, जेणेकरून कीड व रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.

काही जातींमध्ये (पांढरा गर व गुलाबी साल, पांढरा गर व पिवळी साल) नैसर्गिकरीत्या परागीभवन कमी होते किंवा होत नाही. अशावेळी कृत्रिमरीत्या परागीभवनाची आवश्यकता असते, त्यामुळे अशा जातींमध्ये फूल उमलण्याच्या आदल्या दिवसापासून ते फूल सुकेपर्यंत आपण परागीभवन करू शकतो. यासाठी अनुकूल परागकण घेऊन हे परागीभवन करावे.

कळी नवीन असताना आणि फूल उमलून बंद झाल्यानंतर रसशोषक किडी आणि स्टेम कँकरचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कीटकनाशक, बुरशीनाशकांची फवारणी घेणे आवश्यक आहे.

फळांची तोडणी करताना कटर बुरशीनाशक सोडिअम हायपोक्लोराइडच्या द्रावणात वारंवार निर्जंतुकीकरण करण्याची आवश्यकता आहे. तसेच फळ तोडणी झाल्यानंतर बुरशींनाशकाची फवारणी करावी. कारण तोडणी करताना कटरद्वारे इजा झालेल्या जागेवर रोग पसरण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

फळपक्वतेच्या वेळी फळ माशी, पक्षांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. फळमाशी नियंत्रणासाठी कामगंध सापळे (एकरी ७ ते ८ प्रमाण) लावावेत. पक्ष्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फळांना बॅगिंग करावे.

विजयसिंह काकडे, ७३८७३५९४२६

(राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, माळेगाव, बारामती, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : सोयाबीन, कपाशी, तूर पिकांच्या २५ टक्के अग्रिमसाठी अधिसूचना

Flower Market : शेवंती, झेंडूचा भाव वधारला

Ativrushti Madat : ऑगस्ट, सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी ७ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मदत मंजूर;  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मदतीची रक्कम

Paddy Crop Damage : परतीच्या पावसामुळे हळवी भातशेती धोक्यात

Tawarja River : तावरजा नदीवरील चार बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर

SCROLL FOR NEXT