Solapur News : कमी खर्चात, कमी श्रमात अधिक उत्पादन मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक शेतीपद्धतीचा अवलंब करावा, सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत ही शेतीच शेतकऱ्यांना फायद्याची ठरणार आहे, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. उल्हास सुर्वे यांनी मोहोळच्या कृषी विज्ञान केंद्रात नुकत्याच आयोजित कार्यक्रमात केले.
मोहोळच्या कृषी विज्ञान केंद्रात पीक विविधीकरणाच्या पथदर्शी प्रकल्पातंर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. त्यावेळी डॉ. सुर्वे बोलत होते. तसेच कृषी विद्यापीठाचे मृदशास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ ताकटे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे, कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. विठ्ठल पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. सुर्वे म्हणाले, फायद्याची शेती करायची असेल तर फक्त एकच पीक किंवा एकच युनिट यावरती अवलंबून न राहता शेतीमध्ये जर एकात्मिक पद्धतीने विविध घटकांचा समावेश केला, तर मिळणारे उत्पन्न हे निश्चितच वाढणार आहे, असे ते म्हणाले. याचबरोबर शाश्वत शेतीसाठी जमिनीचे आरोग्य या विषयावर डॉ. आदिनाथ ताकटे यांनी आणि डॉ. पाटील यांनीही रब्बी ज्वारी लागवडीवर मार्गदर्शन केले.
तांत्रिक चर्चासत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन
कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे यांनी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विषयावर मार्गदर्शन केले. मृद व रसायनशास्त्र विषयाच्या विशेषज्ञा काजल जाधव-म्हात्रे यांनी रब्बी हंगामातील पिकांचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी तसेच पीक संरक्षण विषयाचे विशेषज्ञ डॉ. पंकज मडावी यांनी रब्बी हंगामातील पिकांचे कीड व रोग व्यवस्थापन,
कृषी विद्याविषयाच्या विशेषज्ञा डॉ. स्वाती कदम यांनी हरभरा लागवड तंत्रज्ञान, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विषयाचे विशेषज्ञ दिनेश शिरसागर यांनी मूल्य संवर्धन आणि कृषी विस्तार विषयावर विशेषज्ञ डॉ. विशाल वैरागर यांनी विपणन व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.