Parbhani News : फळपीकांच्या मुल्यवर्धनातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगाची उभारणी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने फळपिकनिहाय शेतकरी गट तयार करावेत, असे निर्देश पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.\
जिल्ह्यातील फळपिकांचे क्षेत्र वाढ व फळप्रक्रिया उद्योगातील संधी या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागातर्फे शनिवारी (ता. २८) आयोजित शेतकरी- अधिकारी कार्यशाळेत त्या ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होत्या.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, जिल्हा कृषी विकास अधिकारी दीपक सामाले, वनामकृवितील अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, उद्यानविद्या विभागाचे डॉ. संतोष बुरकुले, डॉ. ज्ञानोबा नाईक, तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे (पाथरी), संतोष भालेराव (पूर्णा), नितीन घुगे (जिंतूर), तंत्रअधिकारी (फलोत्पादन) बाळासाहेब गाढवे, विस्तार मुकुंद खिस्ते, कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विशेषज्ञ अमित तुपे, प्रगतीशील शेतकरी अनिल पडवळ (आंबा), नितीन साखरे (फुलशेती) आदी उपस्थित होते.
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, की फलोत्पादन क्षेत्रात कृषी शास्त्रज्ञ संशोधन करत असून अनेक शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रक्रिया उद्योगाची उभारणी करणे हे पालकमंत्री म्हणून आपले कर्तव्य आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या संकल्पना तसेच अडचणी समजून घ्याव्यात. शेतकऱ्यांची कामे तत्काळ निकाली काढली पाहिजेत. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी येत्या काळात आणखीन शेतकरी दत्तक घेतले पाहिजेत.
प्रास्ताविकात चव्हाण म्हणाले, की जिल्ह्यातील शेतकऱ्याचे मन परिवर्तन झाले पाहिजे. केसर आंबा, लिंबू तसेच इतर फळपिकांचे क्षेत्र वाढले तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. गाढवे म्हणाले, की एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत योजनांचा लाभ घेत फळपिकांचे निर्यातक्षम उत्पादन घ्यावे. तुपे म्हणाले, की जमिनीचा प्रकार,पाण्याची उपलब्धता यानुसार निवड करुण फळपिकाची लागवड करावी. डॉ. बुरकुले म्हणाले, की शासकीय किंवा शासनमान्य रोपवाटिकेतूनच रोपे खरेदी करावीत.
डॉ. क्षीरसागर म्हणाले, की अन्नतंत्र महाविद्यालयाने विविध फळपिकांवर प्रक्रिया करुन मूल्यवर्धित उत्पादने निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. पडवळ म्हणाले, की एकाच फळपिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रक्रिया उद्योग सुरु केले पाहिजेत.
साखरे म्हणाले, की दहा गुंठे क्षेत्रावरील पॉलिहाऊसमध्ये फुलशेती करत आहोत. निश्चित केलेल्या दरानुसार स्थानिक बाजारपेठत दररोज फुलांची विक्री करत असल्याने फायदा होतो आहे. सूत्रसंचालन कोल्हे यांनी केले तर आभार खिस्ते यांनी मानले. शेतकरी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.