Silk Farming
Silk Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Farming : शेतकरी नियोजन : रेशीम शेती

Team Agrowon

Silk Crop Management : परभणी जिल्ह्यातील बोरी (ता.जिंतूर) येथील शिवानंद कंठाळे यांच्या कुटुंबाची बोरी ते कौसडी रस्त्यालगत अडीच एकर जमीन आहे. तसेच नातेवाइकांची तीन एकर शेती करार पद्धतीने ते करतात. जमीन हलक्या ते मध्यम प्रकारची आहे.

शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी पूरक व्यवसायांविषयी माहिती घेण्यास सुरवात केली. पुरेशी माहिती घेतल्यानंतर रेशीम शेतीमधून शाश्वत उत्पन्न मिळत असल्याचे समजले. त्यामुळे रेशीम उत्पादन सुरु करण्याचा निर्णय घेतला.

शेतकरी ः शिवानंद नारायणराव कंठाळे

गाव ः बोरी, ता.जिंतूर, जि. परभणी

एकूण क्षेत्र ः २.५ एकर

तुती लागवड ः १ एकर

देवठाणा (ता.पूर्णा) आणि बार्शी तालुक्यातील (जि. सोलापूर) येथील अनुभवी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. प्रत्यक्ष जागेवर जात रेशीम शेतीतील अनुभव आणि बारकावे जाणून घेतले.

पुरेशी माहिती घेतल्यानंतर त्यांनी १ एकरावर तुती लागवड करत व्यवसायास सुरुवात केली. रेशीम शेतीमधील कामांमध्ये वडील नारायणराव आणि बंधू मोहन यांची मोठी मदत त्यांना मिळते.

रेशीम शेतीस सुरुवात ः

१) २०१७ मध्ये तुतीच्या व्ही-१ या वाणाची एक एकरावर लागवड करीत रेशीम शेतीचा श्रीगणेशा केला. लागवड ५ बाय ३ बाय २ फूट अंतरावर केली आहे. त्यांनी २०१८ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेतर्फे आयोजित रेशीम शेतीविषयीचे प्रशिक्षण पूर्ण केले.

रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी रेशीमशेतील सखोल मार्गदर्शन केले. बोरगव्हाण (ता.पाथरी) येथील रेशीम उत्पादक शेतकरी राधेश्याम खुडे यांनी देखील रेशीम शेतीतील विविध बारकावे आणि समस्यांविषयी माहिती दिली.

२) सप्टेंबर, २०१८ मध्ये जालना जिल्ह्यातील चॉकी सेंटर वरून १५० बाल्यकीटकांची (चॉकी) खरेदी केली. परंतु, व्यवस्थापनातील काही त्रुटींमुळे पहिल्या बॅचपासून अपेक्षित कोष उत्पादन मिळाले नाही.

तरी खचून न जाता त्यांनी व्यवस्थापनात सुधारणा करीत उत्साहाने दुसरी बॅच घेतली. वर्षभराच्या अनुभवातून रेशीम शेतीतील बरेच बारकावे समजले. त्यापुढील प्रत्येक बॅचपासून दर्जेदार कोष उत्पादन मिळत गेले.

३) साधारण १०० ते १५० अंडीपुंजाची एक बॅच असते. अशा वर्षभरात साधारण ४ बॅच होतात. प्रत्येक बॅचपासून साधारण ७८ ते १२५ किलोपर्यंत कोष उत्पादन मिळते. प्रत्येक बॅचसाठी सरासरी १० ते १२ हजार रुपये खर्च येतो.

माफक खर्चातील संगोपनगृह ः

रेशीम किटकांच्या संगोपनासाठी शेतामध्ये कमी खर्चात संगोपनगृहाची उभारणी केली आहे. साधारण २४ बाय ५० फूट आकाराचे संगोपनगृह आहे. संगोपनगृहाच्या छतावर सिमेंट पत्र्याचा वापर केला आहे. तसेच चारही बाजूने सिमेंट पत्रे लावून त्यावर शेडनेट लावले आहे.

रेशीम किटकांसाठी लोखंडी पट्ट्या, नायलॉन जाळी तसेच साड्यांचा वापर करून रॅक तयार केले आहेत. संगोपनगृहातील वातावरणातील बदलानुसार ऋतुनिहाय व्यवस्थापन पद्धतीत बदल केले जातात.

उन्हाळ्यात तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कुलर, फॉगरचा वापर केला जातो. हिवाळ्यात तागाच्या पिशव्या लावल्या जातात.

व्यवस्थापनातील बाबी ः

- एका बॅचमधील कोष काढून झाल्यानंतर दुसऱ्या बॅचचे नियोजन सुरु होते. बॅच संपल्यानंतर संगोपनगृहाची स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरण या बाबींवर विशेष भर दिला जातो.

- बाल्य अवस्थेतील रेशीम कीटकांची विशेष काळजी घेतली जाते.

- प्रत्येक बॅचमधील रेशीम कीटकांना पुरेशा प्रमाणात तुती पाला उपलब्ध होण्यासाठी बॅच सुरु करण्यापूर्वीच काटेकोर नियोजन केले जाते. कोष काढणी सुरु केल्यानंतर लगेच तुती बागेची छाटणी केली जाते.

त्यानंतर नांगरणी, वखरणी करून खतांच्या मात्रा दिल्या जातात. छाटणीनंतर साधारण दीड महिन्यात दर्जेदार पाला उपलब्ध होतो.

- दरम्यानच्या काळात बाल्य कीटकांची मागणी चॉकी सेंटरकडे नोंदविली जाते.

- दोन बॅचमध्ये साधारण ६० दिवसांचे अंतर ठेवले जाते. त्यामुळे योग्य व्यवस्थापन करणे शक्य होते. तसेच रोगाचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होऊन दर्जेदार कोष उत्पादन मिळत असल्याचे शिवानंद कंठाळे सांगतात.

मागील कामकाज ः

- डिसेंबरच्या अखेरीस १०० अंडीपुंजाची बॅच घेतली होती. त्यापासून जानेवारी महिन्यात ७८ किलो रेशीम कोष उत्पादन मिळाले. त्याची ५७० रुपये प्रति किलो दराने

विक्री केली. बॅच गेल्यानंतर संगोपनगृहाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण केले.

- तुती बागेची छाटणी करून आंतरमशागतीची कामे केली. त्यानंतर डीएपी आणि युरिया प्रत्येकी ५० किलो प्रमाणे रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या.

- रासायनिक खतांच्या मात्रा दिल्यानंतर प्रवाही पद्धतीने सिंचन केले.

- त्यानंतरच्या काळात ठिबक संचाद्वारे २ ते ३ दिवसांनी सिंचन केले.

आगामी नियोजन ः

- पुढील १० दिवसांत १५० अंडी पुंजाची नवीन बॅच सुरु करणार आहे. त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील चॉकी सेंटरमध्ये बाल्य कीटकांची आगाऊ मागणी नोंदविली आहे.

- चॉकी शेडमध्ये आणण्यापूर्वी २ ते ३ दिवस आधी संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण केले जाईल.

- उन्हाळ्यात तापमानात वाढ होते. त्याचा कीटकांच्या वाढीवर आणि खाद्य खाण्यावर परिणाम होतो. त्यासाठी शेडमधील तापमान योग्य राखण्यासाठी फॉगर लावले जातील. तसेच निवाऱ्यावर मिनी स्प्रिंकलर लावले जातील.

शिवानंद कंठाळे, ७७६७९७४२८८, ९५५२२८३५३५, (शब्दांकन ः माणिक रासवे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT