Inter Crop Updata Agrowon
ॲग्रो विशेष

Inter Crop Farming : आंतरपीक पद्धतीवर भर द्या...

Team Agrowon

डॉ. आनंद गोरे, डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. पपिता गौरखेडे

Rain update : पावसाचे आगमन वेळेवर (७ जून ते ३० जून) दरम्यान झाल्यास मराठवाडा विभागात घेतली जाणारी नियमित पिके उदा. मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कपाशी, मका, खरीप ज्वारी, पेरसाळ, बाजरी, भुईमूग आणि संबंधित आंतरपीक पद्धतीने लागवडीचे नियोजन करावे.

विशेष करून मूग, उडीद, भुईमूग या पिकांची पेरणी ३० जूनपर्यंत होणे आवश्यक आहे. उशिरात उशिरा ७ जुलैपर्यंत या पिकांची पेरणी करता येते. त्यापेक्षा उशीर झाल्यास या पिकांच्या उत्पादनात घट येते. ७ जुलैनंतर मूग, उडीद, भुईमूग या पिकांची पेरणी करू नये.

१) मॉन्सून ३० जूनपर्यंत किंवा ७ जुलैपर्यंत आला नाही म्हणजे पावसात एक आठवड्याने उशीर झाल्यास मात्र काही पिकांमध्ये बदल करावे लागतील. उदा. ८ जुलैपर्यंत पाऊस लांबला तर मूग, उडीद, भुईमुगाऐवजी कापूस, सोयाबीन, तूर, संकरित बाजरी, तीळ, सूर्यफूल, संकरित ज्वारी या पिकांना प्राधान्य द्यावे.

२) पावसाचे आगमन ८ ते १५ जुलैदरम्यान झाल्यास कापूस, सोयाबीन, तूर, संकरित बाजरी, तीळ, सूर्यफूल, संकरित ज्वारी ही पिके घ्यावीत. मूग, उडीद, भुईमूग ही पिके घेऊ नयेत.

३) पावसाचे आगमन १६ जुलै ते ३१ जुलैदरम्यान झाल्यास संकरित ज्वारी, भुईमूग, कापूस या पिकांऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी या पिकांबरोबरच सोयाबीन + तूर (४:२), बाजरी + तूर (३:३), एरंडी + धने, एरंडी + तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

४) पावसाचे आगमन १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान झाल्यास संकरित ज्वारी, भुईमूग, सोयाबीन व कापूस या पिकांऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी, तीळ या पिकाबरोबरच एरंडी + धने (१:१), एरंडी + तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा लागेल.

५) पावसाचे आगमन १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान झाल्यास संकरित ज्वारी, भुईमूग, सोयाबीन व कपाशी, रागी, तीळ या पिकांऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर या पिकांबरोबरच एरंडी + धने (१:१), एरंडी + तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा लागेल.

६) सोयाबीन आणि कापूस या महत्त्वाच्या पिकांची लागवड इतर पर्याय उपलब्ध नसल्यास उशिरात उशिरा ३१ जुलैपर्यंत करावी, त्यानंतर लागवड करू नये.

पेरणीचे नियोजन

पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर (७५ ते १०० मिलिमीटर) प्रत्येक पिकासाठी दिलेल्या कालावधीनुसार लागवड करावी. सर्वसाधारण परिस्थिती तसेच उशिरा पेरणीसाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.

१) कापसाची पेरणी खोल आणि मध्यम खोल काळ्या जमिनीत करावी. हलक्या जमिनीत लागवड करू नये.

२) कापूस + तूर (१०:२ किंवा ६:१) आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

३) सोयाबीन + तूर (४:२) या आंतर पीक पद्धतीचा अवलंब करावा.

४) सोयाबीन लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी.

५) तुरीच्या शिफारसीत जातींची निवड करून योग्य अंतरावर लागवड करावी.

६) मध्यम ते भारी जमिनीत कापसासोबत तूर, खरीप ज्वारी आणि सोयाबीनसारखी पिके घ्यावीत.

७) हमखास पावसाच्या क्षेत्रात मध्यम ते भारी जमिनीकरिता दुबार पीक पद्धतीचा अवलंब करावा. (मूग, रब्बी ज्वारी, संकरित ज्वारी-करडई/हरभरा, सोयाबीन- हरभरा)

८) मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी यांसारखी पिके घ्यावीत.

९) हलक्या जमिनीत बाजरी, तीळ, कारळा, एरंडी यांसारखी पिके घ्यावीत.

१०) कापसामध्ये तूर (६:१ किंवा १०:२), सोयाबीन (१:१), मूग (१:१) किंवा उडीद (१:१) याप्रमाणे आंतरपीक घ्यावीत.

१०) कापसामध्ये तूर (६:१ किंवा १०:२), सोयाबीन (१:१), मूग (१:१) किंवा उडीद (१:१) याप्रमाणे आंतरपीक घ्यावीत.

१२) तूर पिकामध्ये भारी जमीन व एक ते दोन सिंचन असल्यास बीएसएमआर ७३६, गोदावरी, बीएसएमआर ८५३, बीडीएन ७१६ या जातींची निवड करावी. बीडीएन ७११ ही जात कमी कालावधीची आहे. या जातीचा वापर कोरडवाहू क्षेत्रासाठी करावा.

१३) जमिनीची मशागत आणि पेरणी उताराला आडवी करावी जेणेकरून पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरेल. त्याचा पिकांना लाभ होईल.

१४) प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा. सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे. पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून तयार होणारे बियाणे दोन ते तीन वर्षे पेरणीसाठी वापरता येते परंतु यासाठी घरच्या घरी उगवणक्षमता तपासावी (कमीत कमी ७० टक्के असावी).

पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया (थायरम २.५ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम २ ग्रॅम त्यानंतर स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम, रायझोबियम जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम) करूनच पेरणी करावी.

१५) प्रत्येक पिकाच्या पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. शिफारशीत अंतरावर लागवड करावी.

१६) पेरणी करताना योग्य अंतर आणि खोलीवर पेरणी करावी (उदा. सोयाबीन ५ ते ६ सेंमीपेक्षा जास्त खोलीवर पेरणी करू नये). हेक्टरी योग्य बियाणे पेरणीसाठी वापरावे. हेक्टरी योग्य रोपांची संख्या ठेवावी.

१७) वेळेवर आंतरमशागत करून तण नियंत्रण करावे. जेणेकरून अन्नद्रव्ये, जमिनीतील ओलावा, जागा, सूर्यप्रकाश यासाठी पिकांना तणाकडून स्पर्धा होणार नाही.

१८) एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे. रासायनिक खतांच्या शिफारस मात्रेसोबतच शिफारस केलेली सेंद्रिय खतांची मात्रा द्यावी किंवा ५० ते ७५ टक्के रासायनिक खतासोबत २५ ते ५० टक्के सेंद्रिय खतांचा वापर करावा. यामुळे सेंद्रिय कर्ब वाढेल.

यातून जमिनीचे रासायनिक, भौतिक व जैविक गुणधर्म योग्य राहून पीक उत्पादनात वाढ होईल. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल, मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल व उपलब्धता वाढेल, जमिनीचे तापमान राखण्यास मदत होईल, जिवाणूंची संख्या वाढेल.

१९) एकात्मिक कीड, रोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा. यामुळे खर्चात बचत होईल, दुसरीकडे रासायनिक कीटकनाशकांच्या संतुलीत वापरामुळे कीड, रोगांची प्रतिकार क्षमता वाढणार नाही. सापळा पिके, जैविक कीटकनाशके, आंतर पीक पद्धती, पक्षिथांबे यांचा वापर करावा.

पीक नियोजन करताना...

१) गेल्या काही वर्षांत असे दिसून येत आहे, की मॉन्सून बऱ्याच वेळा उशिरा सुरू होऊन त्याचे उशिरा निर्गमन होत आहे. अशावेळी काही पिकांच्या उत्पादनात घट येत असली तरी उपलब्ध पिकांपैकी सर्वोत्तम पर्याय म्हणून काही पिकांची लागवड पाऊस उशिरा सुरू झाला तरी करता येऊ शकते.

२) मराठवाडा विभागात सर्वसाधारणपणे १५ जुलैपर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते. केवळ मूग, उडीद व भुईमूग पिकांची पेरणी ७ जुलैपर्यंत करावी. परंतु पाऊस उशिरा सुरू झाल्यास मूग, उडीद व भुईमूग या पिकांची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येते. मात्र उशिरा पेरणीमुळे उत्पादन होणारी घट आणि काढणीच्या वेळी पीक पावसात सापडण्याची शक्यता लक्षात घेणे गरजेचे आहे.

३) एकूणच पाऊस उशिरा सुरू होत असून, उशिरा संपत असल्यामुळे सोयाबीन, कापूस लागवड २२ जुलैपर्यंत करता येईल. आंतरपीक पद्धतीमध्ये सोयाबीन लागवड ३० जुलैपर्यंत करावी. उदा. सोयाबीन + तूर (४:२) ही आंतरपीक पद्धती योग्य आहे.

उपलब्ध ओलाव्याचा कार्यक्षम उपयोग

आंतरपीक पद्धतीचा अवलंब

१) आंतरपीक पद्धतीमुळे वेळेवर पेरणी व उशिरा पेरणी अशा दोन्ही परिस्थितींत शाश्‍वत उत्पादन व अधिक आर्थिक उत्पन्नाबरोबरच मृद्‍ व जल संवर्धन होण्यास मदत होते.

२) उशिरा पावसात एक पीक हाताचे गेले किंवा एका पिकास बाजारभाव कमी मिळाल्यास दुसरे पीक ही जोखीम कमी करते.

३) पीक नियोजन ः कापूस + मूग/ उडीद /सोयाबीन (१:१), ज्वारी अधिक तूर (४:२), सोयाबीन अधिक तूर (४:२), बाजरी अधिक तूर (३:३).

जलसंधारण सरी

१) मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर पेरणीपूर्वी उताराला आडवी खोल सरी काढल्यास जलसंधारणासाठी उपयुक्त ठरते.

२) बैलाच्या सरीच्या नांगराने अथवा कोळप्याने उतारानुसार ५ ते १० मीटर अंतरावर ४५ ते ६० सेंमी आणि ३० सेंमी खोल सरी काढावी. सरीला ०.२ ते ०.४ टक्का उतार दिल्यास अतिरिक्त पाणी शेताबाहेर जाते.

जलसंवर्धन चर

१) काळ्या खोल व भारी जमिनीमध्ये समपातळी किंवा ढाळीच्या बांधास काटछेदाचे चर घेऊन त्यातील माती काठावर टाकून बांध तयार करावा.

२) चर सलग न ठेवता, ठराविक अंतरावर खोदलेला भाग राखण्यात येतो. या चरामध्ये साठवलेले पाणी गरजेच्या काळात संरक्षित सिंचनाकरीता उपयोगात येते.

उभ्या पिकांत ठरावीक अंतरानंतर सरी :

१) खरीप पिकांच्या पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी आंतरमशागतीची सुरुवातीस कामे पूर्ण झाल्यानंतर बळीराम किंवा लाकडी नांगराने पिकांच्या ओळीमध्ये (ठरावीक अंतरावर किंवा ठरावीक ओळीनंतर) उदा. कापूस, तूर या सारख्या जास्त अंतरावरील पिकामध्ये प्रत्येक एक ते दोन ओळींनंतर आणि तूर, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीनसारख्या कमी अंतरावरील पिकामध्ये प्रत्येक ४ ते ६ ओळींनंतर सऱ्या काढाव्यात.

२) १५ ते २० सेंमी खोलीच्या अरुंद सऱ्या पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संधारण होण्यास तसेच अतिरिक्त झालेल्या पाण्याचा निचरा होण्यासही मदत होते.

सरी वरंबा आणि बंदीस्त सरीचा उपयोग

१) हलक्या, मध्यम उताराच्या जमिनीवर ही पद्धत उपयुक्त ठरते. बळीराम किंवा सरीचा नांगर किंवा कोळप्याच्या साह्याने पेरणीपूर्वी पिकानुसार ५० ते ६० सेंमी अंतरावर सरी वरंबा तयार करून वरंब्यावर लागवड करता येते.

२) कोरडवाहू शेतीमध्ये आंतर मशागतीची सुरुवातीची कामे झाल्यानंतर सरी वरंबे तयार करून उताराच्या जमिनीमध्ये सरीच्या लांबीवर ५ ते ७ मीटर अंतरावर सऱ्यांमध्ये आडवे वरंबे तयार केल्यास सरीमध्ये जमा झालेले पाणी उताराच्या दिशेने न वाहता जमिनीत तेथेच मुरण्यास मदत होते.

रुंद वरंबा सरी पद्धत

१) ही पद्धत भारी जमिनीमध्ये जलसंधारण तसेच अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. जास्त अंतरावरील पिकाच्या एक ते दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळी वरंब्यावर घेता येतात. उदा. सोयाबीन पिकाच्या ३ ते ४ ओळी घेता येतात.

२) केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेने विकसित केलेल्या बीबीएफ यंत्राचा किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या बीबीएफ यंत्राचा पेरणीसाठी उपयोग करावा. याद्वारे वरंबे तयार करणे, पेरणी करणे, खते देणे अशी कामे एकाच वेळी करता येतात. याद्वारे बियाणे, खतामध्ये बचत होते, उत्पादनात वाढ होते.

बंदिस्त वाफे / बंदिस्त बांध

१) अल्प उतार तसेच छोट्या आकाराच्या क्षेत्रात परीघावर बांध टाकून मूलस्थानी जलसंधारण करता येते. यासाठी १ मीटर उंचीपर्यंतचा बांध आणि आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याकरिता सांडव्याची व्यवस्था करावी.

शेततळी व पाण्याचा पुनर्वापर

१) बऱ्याच वेळा मृद्‍ व जलसंधारणाच्या विविध उपायांचा अवलंब करूनही जमिनीत न मुरलेले पावसाचे अतिरिक्त पाणी पृष्ठभागावरून वाहून जाते. हे पाणी शेताच्या खोलगट भागात शेततळ्याद्वारे साठवून संरक्षित सिंचनाकरिता उपयोगात आणता येते.

२) तुरीमध्ये १ ते २ संरक्षित सिंचनामुळे उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ होते.

आच्छादनाचा वापर

१) सुरुवातीस पावसाच्या आगमनानंतर एक ते दोन खंड जुलै, ऑगस्ट महिन्यात दिसतात. अशावेळी जमिनीतील ओलावा कमी होऊन पिकांना पाण्याचा ताण बसतो.

२) जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. (उदा. सुबाभूळ, गिरिपुष्पाचा पाला, गव्हाचा भुसा, मातीची भर इत्यादी)

३) आधुनिक सिंचन पद्धती उदा. पिकानुसार ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा अवलंब करावा.

फवारणीद्वारे अत्रद्रव्यांचा वापर :

१) पाण्याचा ताण सहन करण्याच्या दृष्टीने पोटॅशिअम नायट्रेटची (१३:००:४५) साधारणपणे १ ते १.५ टक्का (१०० ते १५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) फवारणी करावी.

संपर्क : डॉ. आनंद गोरे, ९५८८६४८२४२, (अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat : ऑगस्ट, सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी ७ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मदत मंजूर;  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मदतीची रक्कम

Paddy Crop Damage : परतीच्या पावसामुळे हळवी भातशेती धोक्यात

Tawarja River : तावरजा नदीवरील चार बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर

Cotton Soybean Subsidy : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अर्थसाह्यासाठी ई-केवायसी करावी

Soybean Market : सोयाबीनसाठी लातुरात जिल्ह्यात चौदा खरेदी केंद्रे मंजूर

SCROLL FOR NEXT