Kolhapur News : गेल्या काही दिवसांपासून नांदणी (ता. शिरोळ) येथील जैन मठातून गुजरातच्या ‘वनतारा’मध्ये नेलेल्या लाडक्या महादेवी (माधुरी) हत्तिणीच्या विरहात जिल्ह्यातील हजारो नागरिक रविवारी (ता. ३) रस्त्यावर उतरले.
महादेवीला परत आणावे या मागणीसाठी हजारो ग्रामस्थांनी रविवारी पहाटे नांदणी मठातून कोल्हापूरकडे पायी प्रयाण केले. ऊन, भुरभुर पावसाची पर्वा न करता लाडक्या हत्तिणीला परत आणण्यासाठी तब्बल ४५ किलोमीटर पदयात्रा काढली.
जनभावनेचा अनादर करून सुमारे चौतीस वर्षांची साथ सोडून महादेवीला गुजरातला नेण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा संतप्त बनला आहे. अनेक लोकप्रतिनिधीही या लढ्यात उतरले आहेत. सोशल मीडिया, माध्यमांतून जोरदार प्रतिसाद मिळाल्याने हत्तिणीचा प्रश्न देशभर चर्चेत आला आहे. याची दखल घेऊन दोन दिवसांपूर्वीच ‘वनतारा’च्या पदाधिकार्यांनी कोल्हापूरला भेट दिली.
परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही. लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन दिल्याने या आत्मक्लेश मूक यात्रेचे आयोजन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पदयात्रेची हाक दिली होती.
त्याला सर्वपक्षीय आणि सर्व धर्मीय नागरिकांनी प्रतिसाद देत हत्तिणीप्रती भावना प्रकट केल्या. महादेवीला परत आणण्यासाठी या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फच राष्ट्रपतींना विनंती केल्याचे श्री. शेट्टी यांनी या वेळी सांगितले.
सांगलीचे खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार विश्वजित कदम, आमदार राहुल आवाडे, बेळगावचे आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, उल्हास पाटील, राजू बाबा आवळे यांच्यासह अन्य पक्षांच्या प्रतिनिधींनी पदयात्रेत सहभाग घेतला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.