Jalna News : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीतील अडचणींमुळे शेतकऱ्यांना योजना सुरू झाल्यापासून लाभ घेता येत नाही. त्यामुळे त्यातील अडचणी तत्काळ प्रभावाने दूर करा, अशी मागणी विरेगावच्या सरपंच वर्षा सुरेश जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या संदर्भात सुरेश जाधव यांच्यासह ॲड. हरिदास लांडे व ॲड. गणेश सराटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी (ता. २०) निवेदन दिले.
निवेदनात म्हटले, की ही योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना लाभ घेता येत नाही. त्रुटी काढल्या जात असलेल्या त्रुटींमुळे शेतकरी वैतागून गेला आहे. आपल्या समस्या सोडविण्यासाठी शेतकरी सतत कृषी विभाग, महसूल विभाग व जागोजागी असलेल्या सीएससी सेंटरवर फेऱ्या मारत आहे.
काही शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून एकही हप्ता मिळाला नाही. पात्र असलेले शेतकरी सुद्धा राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर चुकीच्या पद्धतीने अपात्र केले आहेत. सातबारा किंवा लँड सीडिंगची समस्या, ई-केवायसीची समस्या, आधार व सातबारावर असलेली वेगवेगळे नाव, त्यात असलेला थोडा फरक, तसेच सतत सर्व्हर बंद अशा अनेक अडचणी समोर आल्या आहेत.
यामध्ये कृषी विभाग जबाबदारीने काम करत नाही. कृषी विभाग तहसीलकडे जा म्हणतात, तर तहसील विभाग कृषी कडे पाठवतात. नंतर कृषी विभाग बाहेर सीएससी सेंटरवर पाठवतात. या सर्व फेऱ्यात शेतकरी वैतागून गेला आहे.
ही जबाबदारी अधिकारी व्यवस्थित पार पडत नसतील तर ग्रामपंचायत संगणकचालकांना याची जबाबदारी द्यावी. त्यामुळे शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही. गावातच त्याची कामे होतील. हे शक्य नसेल तर ज्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्यांना प्रत्येक गावात जाऊन कॅम्प घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी सांगावे अशी नम्र विनंती ही निवेदनकर्त्यांनी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.