Mumbai News : पालघर जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी भातलावणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने साथ दिल्यामुळे बळीराजा भातशेती लावणी कशी पूर्ण होईल, यासाठी प्रयत्नशील आहे; परंतु जिल्ह्यामध्ये तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी (ता. २१) सकाळपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्याने लावणीचा वेग मंदावला आहे.
डहाणू तालुक्यात चार-पाच दिवसांपासून संततधार पाऊस होत असल्याने लावणीचा वेग वाढत चालला होता; परंतु शनिवार (ता. २०)पासून पावसाचा जोर वाढल्याने भात खाचरे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भातलावणी करणे अडचणीचे होत आहे. सद्य:स्थितीत तालुक्यात ७० टक्क्यांच्या जवळपास लावणीची कामे करण्यात आली आहेत.
जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली असली तरी त्यानंतर दडी मारल्याने तालुक्यात अनुकूल परिस्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे उशिरा पेरणी झाल्याने रोपे तयार होण्यास विलंब झाला. त्यामुळे लावणी उशिराने सुरू झाली. सध्या पावसाने जोर धरल्याने भातलावणीचा वेग मंदावला आहे.
भात खाचरात प्रमाणापेक्षा जास्त पाणी साचले आहे, त्यामुळे लावणी करणे अडचणीचे झाले. दोन-तीन दिवसांत लावणीची कामे पूर्ण झाली असती; परंतु पावसामुळे विलंब होत आहे.संजय पाटील, शेतकरी, डहाणू
अतिजोरदार पावसामुळे काही भागात बागायती व नवीन पिकांचे नुकसान होण्याची शक्यता टाळता येणार नाही. नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात नदीला पूर येऊ शकतो. शेतकऱ्यांनी भात खाचरातील अतिरिक्त साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी खोल चर करून घ्यावे.डॉ. विलास जाधव, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.