Drought Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Crisis : खेडमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती

Team Agrowon

Pune News : शिरूर व दौड तालुक्यांसाठी खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून गेले काही दिवस दररोज एक हजार क्युसेकने पाणी सोडत असल्याने धरणातील पाण्याची पातळी अत्यंत घटली आहे.

त्यामुळे भर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागेल, अशी भीती धरण परिसरातील शेतकरी व नागरिक व्यक्त करीत आहेत. सध्याच्या कडक उन्हाळ्यामुळे धरणाच्या पश्चिम भागात पाण्याची पातळी अतिशय कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

साधारणपणे धरणात दर वर्षी एप्रिल महिन्यात सरासरी ५० टक्के पाणीसाठा शिल्लक राहातो, असा अंदाज धरण परिसरातील नागरिकांना असतो. पण या वर्षी धरणाच्या पश्चिम भागातील गावांतील नागरिकांचा अंदाज चुकल्याने उन्हाळी पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे उन्हाळी पिके अडचणीत आली आहे. गत वर्षी सुमारे ४४ टक्के पाणीसाठा भामा आसखेड धरणात होता.

त्यामुळे सुमारे २५ ते ३० किलोमीटरपर्यंत धरणाच्या पश्चिम भागातील नदीपात्रालगतच्या गावातून फुगवट्याचे पाणी होते; परंतु यंदा विसर्ग सातत्याने सुरू असल्याने पाण्याची पातळी कमी झाली. बाधित शेतकरीच अडचणीत आले तर काही धरणालगतचे धरण बाधित गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करीत आहेत.

खेड तालुक्यातील भामा आसखेड हे ८.१४ टीएमसीचे धरण आहे. परंतु त्याचा फायदा खेडपेक्षा शिरूर आणि दौंड तालुक्यालांच जास्त होतो. धरणग्रस्त, बाधित शेतकरी जमिनी देऊन, बेघर होऊनही सगळ्या सुविधांपासून कायम वंचितच राहिले आहेत. त्या शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे शासन दरबारी अद्यापही प्रलंबित असून या समस्यावर लवकर तोडगा निघावा असे मत बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

भामा आसखेड धरण हे चाकण औद्योगिक वसाहत, पुणे, पिंपरी-चिंचवड, आळंदी या शहरांसाठी महत्त्वाचे आहे; परंतु चाकण शहर आणि औद्योगिक वसाहतीला मे महिन्याच्या अखेरीस पाणी पुरेल का, असे चिंतचे वातावरण नागरिकांत आहे.

विहिरींनी गाठला तळ

पाण्याची पातळी खालावल्याने परिसरातील विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे धरणाच्या पश्चिम भागातील नागरिकांना मे महिन्याच्या मध्यात भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने या भागातील कोळीये, गडद, गाबरवाडी, आंभु, वांद्रा, वेल्हावळे आदी गावांत नदीपात्र कोरडे पडले आहे. तसेच काही गावांत पिण्यासाठी अत्यंत कमी पाणी असून वापरासाठी पाणी शिल्लक नसल्याने जनावरांचे हाल होत आहे.

२७.२६ टक्केच साठा

भामा आसखेड धरणात सध्या एकूण २.०९ टीएमसी उपयुक्त साठा आहे. परंतु २१ मार्चपासून आजतागायत (सुमारे २२ दिवस) १ हजार क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. दोन दिवसांपासून तो बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आजअखेर धरणात फक्के २७.२६ टक्के पाणीसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT