Farm Pond Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Pond Scheme : नंबर लागूनही ३० हजार शेतकऱ्यांनी नाकारली शेततळी

Agriculture Scheme : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘महाडीबीटी’तून एकाच अर्जावर अनेक घटकांचा लाभ मिळतो.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘महाडीबीटी’तून एकाच अर्जावर अनेक घटकांचा लाभ मिळतो. त्यानुसार नगर जिल्ह्यातील ३७ हजार ४१४ शेतकऱ्यांची ‘मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजने’अंतर्गत शेततळ्यांसाठी सोडतीत निवड झाली खरी, मात्र गेल्या दोन वर्षांत २९ हजार ६८८ शेतकऱ्यांनी त्याचा लाभच घेतला नसल्याची स्थिती आहे.

एकाच वेळी अनेक घटकांसाठी अर्ज भरता येत असल्याने शेतकरी सहजच अन्य योजनांचीही नावे टाकतात. एखाद्या घटकाचा लाभ हवा असतो, मात्र सोडतीत हव्या त्या घटकाचा नंबर न लागता दुसऱ्याच घटकाचा लागतो.

हव्या त्या घटकाचा नंबर लागला, तर लाभ घेतला जातो, अन्यथा नाही, अशी स्थिती आहे. त्यातूनच गेल्या दोन वर्षांत नगर जिल्ह्यात केवळ २ हजार ८५२ लाभार्थ्यांनी शेततळ्यासाठीच्या अनुदानाचा लाभ घेतला आहे. तर २९ हजार ६८८ शेतकऱ्यांनी हा लाभ नाकारला आहे.

ग्रामीण भागात टंचाईच्या काळात शेतीपिकांना पाण्याचा आधार मिळाला आणि कमी पाण्यात पिके घेता यावीत यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ योजना राबविली जात होती. आता त्या योजनेचे नाव बदलून ‘मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना’ असे केले आहे.

शेततळ्यासह विविध कृषी विभागांच्‍या योजनांच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टल असून, या पोर्टलमधून आता एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेण्यासाठी मागणी करण्याची सुविधा आहे. त्यामुळे शेतकरी अर्ज भरताना अन्य योजनांचीही नावे टाकतात, मात्र सोडतीत अपेक्षित योजनेसाठी नाव आले नाही, की ज्या योजनेत लाभ मिळाला तो लाभ नाकारत आहेत.

नगर जिल्ह्यात शेततळ्याच्या अनुदानासाठी गेल्या वर्षी (२०२२-२३) मध्ये १३१४ व यंदा (२०२३-२४) मध्ये ३६ हजार १०० असे दोन वर्षांत ३७ हजार ४१४ शेतकऱ्यांनी मागणी केली होती. पात्र असून व सोडतीत निवड होऊनही शेततळे करण्याची गरज नसल्याने कृषी विभागाच्या नियमानुसार तीस दिवसांत कामे सुरू केली नसल्याने सुमारे २९ हजार ६८८ शेतकऱ्यांचे शेततळ्याचे लाभ रद्द झाले आहेत. १९६ शेतकऱ्यांची नावे प्रस्तावात त्रुटी असल्याने अपात्र केली. दोन वर्षांत २ हजार ८५२ कामे पूर्ण होऊन त्यांना २० कोटी ९४ लाख रुपयांच्या अनुदानाचे वितरण केले गेले. सात हजार २४३ शेततळ्यांची कामे जिल्ह्यात सुरू आहेत.

सोडतीत निवड आल्यानंतर पहिल्या आठ दिवसांत सातबारा, आठ ‘अ’ उतारा संकेतस्थळावर अपलोड करतात. त्यानंतर कृषी सहायकांकडून स्थळपाहणी, त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून मान्यता मिळाल्यानंतर कामासाठी पूर्वसंमती मिळते. तेथून पुढे तीस दिवसांत काम सुरू केले नाही तर लाभ रद्द होतो. वेळेत काम न झाल्याने अनेक लाभ रद्द होतात.

पात्रता कायम राहते

वेळेत लाभ न घेतल्याने लाभार्थ्यांचे नाव रद्द होते. मात्र त्यानंतर गरजेवेळी तो शेतकरी संबंधित योजनेचा लाभ घेऊ शकतो. पहिल्यांदा सोडतीत नाव येऊनही लाभ न घेतल्याने नाव रद्द झाले म्हणजे ते नाव कायम रद्द होत नाही. लाभासाठीची भविष्यासाठी पात्रता कायम असते, असे कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हवा होता ट्रॅक्टर, लागले शेततळे

‘‘मला ट्रॅक्टर हवा होता. त्यासंबंधी नोंदणी करताना मी शेततळ्याची सहज मागणी केली होती. मात्र ट्रॅक्टरसाठी सोडतीत नाव आले नाही. सोडतीत नाव आले तरी मी शेततळे केले नाही,’’ असे एका शेतकऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT