Pradhan Mantri Pik Vima Scheme : राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेत अर्ज करण्यासाठीची मुदत ३ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. यंदाच्या खरीप हंगामापासून राज्य सरकारने एक रूपयात पीक विमा योजना लागू केली आहे. या योजनेत अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै होती. अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊनसारख्या तांत्रिक अडचणी आणि अतिवृष्टीमुळे वाहतुक बंद असल्याने पीक विमा भरण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. अखेर केंद्र सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुदत तीन दिवसांनी वाढवली आहे.
‘‘केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विमा भरण्यासाठीची मुदत ३ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. केंद्र सरकारकडून तसे पत्र प्राप्त झाले आहे,'' अशी माहिती राज्याचे कृषी विस्तार संचालक दिलीप झेंडे यांनी ‘ॲग्रोवन'ला दिली.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सरू आहे. अधिवेशनात पीक विमा भरण्यासाठीची अंतिम मुदत वाढवण्याची मागणी अनेक आमदारांनी केली होती. परंतु कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ही मुदत वाढवता येणार नसल्याचे सांगितले होते. कृषी विद्यापीठांनी खरीप पिकांची पेरणी ३१ जुलै नंतर करू नये, अशी शिफारस केली असल्याने विमा भरण्याची मुदत वाढवता येणार नाही, असे मुंडे यांनी स्पष्ट केले होते. तसेच काही ठिकाणी विमा भरताना तांत्रिक अडचणी येत असल्या तरी राज्यात सर्वत्र तशी परिस्थिती नाही, यंदा विमा योजनेला विक्रमी प्रतिसाद मिळाला, असेही त्यांनी सभागृहात सांगितले होते.
दरम्यान, शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत विमा अर्ज भरला नाही, तर केंद्र सरकार त्यांच्या विमा हप्त्यासाठी अनुदान देणार नाही, असा नियम केल्यामुळे विमा भरण्याची मुदत वाढविण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली होती, असे सूत्रांनी सांगितले. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे व कृषी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार यांची बैठक घेतली. विमा भरण्याची मुदत वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना सचिवांना देण्यात आल्या. या पाठपुराव्याला यश आले असून विमा भरण्याची मुदत तीन दिवसांनी वाढविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यात दिवसाला सहा ते सात लाख शेतकरी विमा भरत आहेत. परंतु उत्तर महाराष्ट्र्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून सर्व्हर डाउनच्या तक्रारी येत आहेत. सर्व्हर डाउन होणे, गट व खाते नंबर टाकल्यानंतर पडताळणी न होणे या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. अर्ज भरण्यासाठी शेती कामे सोडून तासन् तास ताटकळावे लागल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. काही गावांमध्ये शेतकरी जनसुविधा केंद्रावर दोन-तीन दिवसांपासून चकरा मारत आहेत. अनेक ठिकाणी विमा संकेतस्थळ संथगतीने चालत आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे वाहतुक बंद असल्याने शेतकऱ्यांना जनसुविधा केंद्रांवर जाता आले नाही. त्यामुळे विमा भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.