Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील पाणी तुट व सिंचन अनुशेषाबाबत शासनाकडे रेटा लावून धरण्यासाठी लढा उभारणीवर उपस्थित लोकप्रतिनिधींसह सर्वांनीच रविवारी (ता. १६) झालेल्या जलसंवाद - २०२४ अंतर्गत मराठवाडा पाणी प्रश्न विषयी विचार मंथन कार्यक्रमात एकमत दाखविले.
मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान टीम ऑफ असोसिएशन मसिआ, मराठवाड्यातील सर्व संलग्न संस्था साखर कारखाने व शेतकरी सहकारी पाणी वापर संस्था यांच्या पुढाकारातून मसीआच्या श्रीमती रत्नप्रभा बाळासाहेब पवार सभागृहात या मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल,
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार कल्याणराव काळे, खासदार संदीपान भुमरे, आमदार राजेश टोपे, आमदार प्रशांत बंब, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रकाश सोळंके, माजी मंत्री अनिल पटेल, आमदार मेघना बोर्डीकर, शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी, मसीआ अध्यक्ष चेतन राऊत आदींची या मंथन कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रास्ताविकात मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानचे सचिव रमाकांत पुलकुंडवार यांनी मंथन कार्यक्रम आयोजनामागील भूमिका व पुढची दिशा याविषयी मांडणी केली. या मंथन कार्यक्रमात मराठवाड्यातील सिंचनाची सद्यःस्थिती व जलसाठे खोलीकरण उच्च व सर्वोच्च न्यायालयातील दाखल व प्रलंबित दाब यांचे विश्लेषण मराठवाड्याला हक्काचे २६० टीएमसी पाणी मिळवण्यासाठीची मागणी मराठवाड्याची तूट भरून काढण्यासाठी इतर खोऱ्यातून पाणी कसे स्थलांतरित करता येईल
यासह मराठवाड्याचा सिंचन व आर्थिक अनुशेष भरून काढण्यासाठीचे उपाययोजना याविषयी मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंकरराव नागरे, सेवानिवृत्त सहाय्यक अधीक्षक अभियंता जयसिंग हिरे, के. एम. वडगावकर, अरुण घाटे आदींनी विस्तृत माहिती दिली. यावेळी आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले, की जायकवाडीच्या वरच्या भागात जर जायकवाडीसाठी धरण बांधले तर त्यावर धरण बांधलेल्या भागातील लोक हक्क कसा सांगू शकतात. त्या धरणाच्या पाण्याचे अधिकार मराठवाड्याकडे असायला हवे. खासदार भागवत कराड म्हणाले, की जे शक्य ते तातडीने करून प्रसंगी जागरूक राहून जल आंदोलन करावे लागेल. खासदार डॉ. काळे म्हणाले, की श्रेय कुणाला यात न पडता उद्याच्या पिढीची गरज ओळखून काम करावे लागेल.
प्रश्नोत्तरात पंडित शिंदे, वैजनाथ दराडे, गणेश बढे, राजेश मानधने, कचरूलाल कोठारी व इतर अनेकांनी सहभाग नोंदविला. शेवटी लोकप्रतिनिधींच्या मंथनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव वाघ यांनी केले.
मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानने मराठवाड्यातील पाणी प्रश्न व सिंचन अनुशासनाबाबत शासनाकडे मांडावायचा आठ महत्त्वाच्या मुद्दा संबंधात येत्या पंधरवड्याच्या आत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक लावली जाईल.अतुल सावे, मंत्री
मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी मिळून शासनावर दबाव आणावा लागेल.अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते
हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन करावे लागते हे दुर्दैव. पाण्यासाठी मराठवाडा स्पिरिटने लढावे लागेल.राजेश टोपे,आमदार
तापमान वाढीचे युग संपले होरपळण्याचे युग सुरू झाले. हवेतील कार्बन वाढल्याने जीवन मरणाचा प्रश्न उभा आहे. महिनो गणती पडणारा पाऊस काही तासात पडतोय. जागे व्हावे लागेल अन्यथा अवघड आहे.पाशा पटेल, अध्यक्ष, कृषी मूल्य आयोग.
लोकप्रतिनिधींना मराठवाड्याच्या प्रश्नांवर आपल्या पक्षाचे अजेंडे बाहेर ठेवावे लागतील. प्रसंगी जनआंदोलन उभे करावे लागेल. श्रेय कुणाला यात न पडता उद्याच्या पिढीची गरज ओळखून काम करावे लागेल.डॉ. कल्याण काळे, खासदार
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.